Monday, February 2, 2026

संतोष देशमुख हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन फेटाळला

छ.संभाजीनगर — संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या संतोष देशमुख खून खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मोठा धक्का देत जामीन अर्ज फेटाळून लावला, त्याला तुर्त दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांनी बुधवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
या प्रकरणातील सुनावणी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. शुक्रवारी ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी कराडच्या वतीने तब्बल सहा तास प्रदीर्घ युक्तिवाद केला होता. त्यांनी पोलिसांच्या तपासावर आणि अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, मंगळवारी मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि फिर्यादीचे वकील ॲड. नितीन गवारे यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. त्यांनी पुराव्यांच्या आधारे आरोपीचे सर्व दावे खोडून काढले आणि ‘मकोका’ अंतर्गत झालेली कारवाई योग्य असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. बुधवारी झालेल्या सुनावणीत कराडच्या वकिलांनी 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या दोष निश्चितीला स्थगिती देण्याची विनंती बीडच्या विशेष न्यायालयाला करावी, अशी मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हे प्रकरण जामीन देण्या योग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने कराडच्या वकिलांना विचारले की, “तुम्ही जामीन अर्ज मागे घेता की आम्ही आदेश पारित करू?” वकिलांनी आदेश देण्याची विनंती केल्यानंतर, न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. या निकालानंतर आता बीडच्या विशेष न्यायालयात 19 डिसेंबर रोजी या प्रकरणातील दोष निश्चितीची प्रक्रिया पार पडणार असून, वाल्मीक कराडचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles