बीड — दहा लाख रुपये घेऊन लग्न केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत नवरी मुलगी पसार झाली. माहेरी गेलेल्या मुलीला परत आणण्याचे प्रयत्न केले, मात्र तिने नकार दिला. पोलिसांत प्रकरण गेले, तक्रार निवारण केंद्रात समुपदेशन झाले तरीही मुलगी नांदायला आली नाही.अखेर या प्रकरणात 3 वर्षांनंतर नवरी मुलगी, तिचे आई-वडिल व लग्नात मध्यस्थी करणाऱ्यासह सात जनाविरोधात बीड शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अभय अरुणराव खोडसकर वय 39, रा. सारडा संकुल, बीड यांनी तक्रार दिली आहे. लग्न जमत नसल्यामुळे ते मानसिक तणावात होते. याच परिस्थितीचा फायदा घेत, रामकृष्ण उपाध्ये, रजनी उपाध्ये, उदय उपाध्ये, पल्लवी उपाध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यातील उंदरी येथील प्रकाश व संगीता मैदाने यांनी अभय यांना त्यांच्या गावातील मुलगी कोमल हिच्याशी लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवले. लग्नासाठी आरोपींनी एकूण 15 लाख रुपये घेण्याचे निश्चित केले होते. यापैकी लग्नापूर्वी आणि लग्नानंतर फिर्यादीकडून एकूण 10 लाख रुपये स्वीकारण्यात आले.या व्यवहारा अंती, 5 जुलै 2022 रोजी बीड येथे हा विवाह संपन्न झाला. मात्र, लग्नानंतर नवरी मुलगी कोमलने 2 महिन्यांनी घरातील काही दागीने घेऊन पसार झाली. सुरुवातीला ती मोहरी नसल्याचे सांगितले गेले. त्यामुळे बीड शहर पोलिसांत मिसींगची नोंद केली गेली.काही दिवसांनी ती मोहरी असल्याची माहिती मिळाल्याने शहर पोलिस व मुलाचे कुटुंबिय बुलढाणा जिल्ह्यात मुलीच्या गावी गेले. तिथे मुलीने नांदायला यायला नकार दिला. यानंतर पोलिसांनी मिसिंग अर्ज निकाली काढला. मुलाने बीडच्या तक्रार निवारण केंद्रात अर्ज केला. तिथेही मुलीने नांदायला यायला नकार दिला. दरम्यानच्या काळात मुलाकडे लग्नातील राहिलेले 5 लाख रुपये देण्याची मागणी झाली. 5 लाख दिल्यास मुलगी नांदायला येईल असे सांगितले. मात्र मुलाने मुलगी नांदत नसल्याने 10 लाख परत द्या अशी मागणी केली.या फसवणूक, धमकी आणि अपहार प्रकरणी वधू कोमलसह सात जणांविरुद्ध आता बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

