शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो;एकवेळ मला संधी द्या — अजितदादा पवार

राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बीडच्या बशीरगंजमध्ये विराट जाहिर सभा

बीड — मी तुम्हाला समजून सांगायला आलोय, तुम्हाला ऐकायचे असेल तर एैका, मी बारामतीत करून दाखवले आहे, मी पिंपरी चिंचवडमध्ये करून दाखवले आहे ते मला बीडमध्ये करायचे आहे. तुमची साथ असेल तर मी बीडमध्ये विकास करून दाखवेन, हा अजित पवारचा शब्द आहे आणि मी शब्दाला पक्का आहे, मी करून दाखवतो, मला फक्त संधी द्या. इथल्या सत्ताधाऱ्यांनी 35 वर्षे आपल्या लोकांना वाऱ्यावर सोडून इथले मुलभूत प्रश्न रखडत ठेवले, आत्मपरिक्षण करा, डोळे उघडा, आता चांगली संधी आलेली आहे. माझ्या विचाराच्या माणसाला निवडून द्या, काळजी करू नका स्वतः उभे आहात असे समजून सद्सद्‌‍ विवेक बुध्दीने मतदान करून मला बीडचा चेहरा-मोहरा बदलण्याची संधी मला द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना-शिवसंग्राम-सपा व मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी विराट संख्येने उपस्थिती असल्यामुळे राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे.

बीड नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना-शिवसंग्राम-सपा मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह नगरसेवक पदाच्या 52 उमेदवारांच्या प्रचारार्थ ना.अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बशीरगंज चौक येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजीमंत्री नवाब मलिक, आ. विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक संजय दौड, शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती ज्योतीताई मेटे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष बळीराम गवते, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, अल्पसंख्यांक आघाडीचे शेख निजाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर नाईकवाडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत, माजी नगरसेवक फारुक पटेल, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.प्रज्ञाताई खोसरे, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा प्रिया डोईफोडे, रेखा फड, माजी नगराध्यक्ष मोईन मास्टर, दिलीप गोरे, झुंजार धांडे, सुहास पाटील, भागवत तावरे, पांडुरंग आवारे, सुनिल मगरे, गोरक्ष लोखंडे यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. अजितदादा पवार म्हणाले की, बीड शहरात अनेक प्रश्न रखडत पडलेले आहेत. रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब आहेत, मुला-मुलींना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही, उद्यान नाही, आलेला निधी खर्च केलेला नाही, रस्त्याच्या बाजूला झाडे लावलेली नाहीत असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विरोधकांनी 35 वर्षे बीडची अवस्था बकाल करून टाकली, बारामती, पिंपरी चिंचवडचा विकास होवू शकतो मग बीडचा का नाही होवू शकत नाही ? असा प्रश्न उपस्थत करून तिकडे व्हिजन असणारे लोक आहेत आणि इकडे लोकांना वाऱ्यावर सोडून स्वतःचे घर भरणारे लोक असल्यामुळे आपली अवस्था अशी झालेली आहे. या भागातील खासदार झाले, आमदार झाले यांनी आत्तापर्यंत काय केले ? झोपा काढल्या का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ज्ञानराधा, साईराम, माँसाहेब आणि छत्रपती अशा पतसंस्थांच्या कुटे, परभणे, शिंदे आणि भंडारी या लोकांनी सामान्य लोकांचा पैसा लुटला. त्यातल्या तिघांना आम्ही जेलमध्ये पाठवले, एक फरार आहे. चुकीला माफी नाही, काम करत असताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तेंव्हा सुधारणा होतील आणि सुधारणा करण्यासाठी आपल्या विचाराची माणसं नगर परिषदेत पाठवावी लागतील. तुम्ही कचरा निर्माण करणाऱ्या माणसाला निवडून द्याल तर या बीडचा कचरा होईल स्वच्छता करणाऱ्या स्वच्छ विचाराच्या माझ्या माणसांना विजयी करा असे सांगून हावसे-नवसे-गवसे येतील, रात्रीतून गडबड करतील त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, येणाऱ्या 2 तारखेला घडी आणि धनुष्यबाण या चिन्हासमोरचे बटन दाबून मला काम करण्याची संधी द्या असे कळकळीचे आवाहन ना. अजितदादा पवार यांनी केले.
यावेळी बोलताना माजीमंत्री नवाब मलिक म्हणाले की, ही निवडणुक बीडचे भविष्य बदलणारी निवडणुक आहे, मनात किंतु-परंतु न ठेवता, प्रशासकीय अनुभव असणाऱ्या प्रेमलता पारवे यांच्यासह मित्रपक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करा. ना. अजितदादा पवार यांच्यासारखा विकास पुरुष आपल्या पाठिशी आहे, त्यांच्या माध्यमातून बीडची बारामती करा, सर्व धर्म समभाव विचार घेऊन आम्ही, सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करत आहोत, तेंव्हा आपल्या विचाराची माणसं सत्तेत पाठवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना डॉ.ज्यातीताई मेटे म्हणाल्या की, विरोधकाने नगर पालिकेचा वापर स्वार्थी राजकारण करण्यासाठी केला, अटल अमृत योजनेचा निधी कुठे गेला ? याचा जबाब तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. विकासाचा ताळेबंद घेऊन चर्चा करा, बीड नगर परिषदेमध्ये परिवर्तन करण्याची संधी चालून आलेली आहे. त्यासाठी घड्याळ चिन्हासमोरचे बटन दाबून सर्व उमेदवारांना विजय करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी दिलीप गोरे व भागवत तावरे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच सतिष क्षीरसागर, गौतम मोरे, आरेफ खान, फेरोज खान यांनी ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.

अजित पवार यांच्या माजलगाव, धारुर येथील जाहिर सभा झाल्यानंतर त्यांनी बशीरगंज चौकात जाहिर सभेच्या ठिकाणी आगमन होताच लगेच भाषणाला सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी बीडमध्ये काय करायचे आहे याचा विकास आराखडाच मांडला. त्यांच्या या सभेला महिला, पुरुष मतदार व कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सभास्थळी मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद आणि उत्साह राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाच्या सर्व उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles