Sunday, February 1, 2026

न.प. अध्यक्षपदी नव्या महिला नेतृत्वाला संधी मिळणार – डॉ योगेश क्षीरसागर

बीड — नगरपरिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीतील महिलेसाठी आरक्षित असल्याने आता नव्या महिला नेतृत्वाला संधी मिळणार आहे. ज्यांना पूर्वी संधी मिळाली नाही, त्यांचाही विचार केला जाईल. तसेच, ५० टक्के प्रतिनिधित्व तरुणांना दिले जाईल. गेली ३० वर्ष बीडकरांनी डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. ही विजयाची परंपरा पुढेही कायम राहणार आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत बीडमध्ये सौ.के.एस.के. महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (दि.१६) बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ.सारिकाताई क्षीरसागर, माजी नगरसेवक किशोर काळे, गणेश वाघमारे, भास्कर जाधव, नरसिंग नाईकवाडे, शिवाजी जाधव, संजय होळकर, शुभम धूत, अशोक वाघमारे, विकास जोगदंड, प्रकाश कानगावकर, प्रेम चांदणे, रवी जवेरी, राहुल गुरखुदे, बाळासाहेब जाधव, सुभाष सपकाळ, संगीता वाघमारे, शालिनी परदेशी, मुस्तफा भाई, नशीर अन्सारी, बाळासाहेब आंबेकर, महेश गर्जे, अमोल पवळ, साउद भाई, सतीश पवार, नबील जमा, बाळासाहेब गुंजाळ, दत्ता जाधव, संभाजी दुधाळ, रवींद्र कदम, जुनेद जहागिरदार, अशोक शेजवळ, बाबू अत्तार, मुजीब एवन, गुड्डू चाऊस, बिलाल, असरार, पिंटू माने, खमर, द्वारकादास फटाले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, नगरपरिषद निवडणूक ही आपल्यासाठी नवी नाही. परिस्थिती काहीही असो, शहरातील जनता आपल्या सोबत उभी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बीड नगरपरिषद निवडणुकीत मी माझ्या विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक ताकद लावणार आहे. कायम निष्ठेने सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनाच पक्षाकडून संधी दिली जाणार आहे. परंतु आपण उभे केलेले काही लोक आज पक्षातील नेत्यांकडेच आपली तक्रार करत आहेत, ही खेदजनक बाब आहे. प्रत्येकाने आपापले घर मजबूत करावे, इतरांकडे पाहू नये. ज्यांना आजपर्यंत स्वतःची नगरपरिषद ताब्यात घेता आली नाही, ते बीडमध्ये येऊन काय करणार? असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालून आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. अजितदादांनी बीड शहरासाठी सर्वाधिक निधी दिला आहे. सीट्रिपलआयटी, शासकीय इमारती, नदी सुशोभीकरण, डीपी रस्ते यांसारखे महत्वाचे विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. अनेक प्रस्तावांवर बसून चर्चा करून निधी मिळवला, परंतु त्याचे श्रेय आमदार घेत आहेत. आमदारांचा फंड नेमका कुठे गेला याबाबत मात्र कोणी बोलत नाही. माजी आमदारांच्या कामांचे बोर्ड दिसतात; मात्र निधी कोणत्या कामावर खर्च झाला याचा हिशोब कोणी देत नाही, असेही त्यांनी नमूद केले. बीडच्या विकासासाठी नगरपरिषद निवडणूक आपल्या ताब्यात येणे आवश्यक आहे. गेल्या तीन ते साडेतीन दशकांत मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. मात्र लोकसंख्या व क्षेत्रफळ वाढल्याने शहराच्या हद्दीबाहेरील भागात विकासकामे अद्याप अपूर्ण आहेत, असेही ते म्हणाले. या बैठकीत अनेकांनी मनोगत व्यक्त केले. तसेच, आगामी निवडणुकीची रणनीती, संभाव्य उमेदवारांबाबत प्राथमिक चर्चा झाली. नगरपरिषद निवडणूक नियोजनबद्ध पद्धतीने लढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांसाठी पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार : डॉ.सारिकाताई क्षीरसागर

डॉ.सारिकाताई क्षीरसागर मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, डॉ.योगेश क्षीरसागर हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. त्यांचा शांत स्वभाव आहे, याचा अर्थ आम्ही कमजोर नाहीत. डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड शहराचा विकास केला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉ.योगेश हे राजकारणात पुढे जात आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सोबत असलेल्या निष्ठावंत, विकासाभिमुख उमेदवारांना नगरपरिषदेत संधी दिली जाणार आहे. आता महिलांनी नेतृत्व करण्यासाठी सज्ज रहावे. आम्ही निवडणूक लढविणार की नाही, याबाबत निर्णय नाही. परंतु कार्यकर्त्यांसाठी मात्र पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार आहोत. शहरात वॉर्ड ५२ की ५० हे विरोधकांना ठाऊक नाही. त्यांनी शहरात नेमका विकास कुठे केला? हे दाखवून द्यावे, असा टोला विरोधकांना लगावला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles