लातूर — सतत कोसळलेल्या अतिवृष्टीने दाना दान उडवलेली असतानाच पुन्हा नव संकट उभे राहत की काय? असा प्रश्न लातूरकरांना पडला आहे. पिक पाण्यात, घर पाण्यात, घरात बाहेर चिखल त्यातच आणखी भर म्हणून मंगळवारी रात्री लातूरमधील मुरूडला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
लातूर जिल्ह्यातल्या मुरुड अकोला परिसरात रात्री 8 वाजून 13 मिनिटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.3 रिश्टर स्केल असल्याची नोंद झाली आहे . दरम्यान भूकंपाचा केंद्रबिंदू हा लातूर शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या मुरुड आकोला परिसरात आहे. भूकंपाची खोली ही 5 किलोमीटर पर्यंत आहे. तर भूकंपाची सौम्य नोंद असली तरी नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आव्हान प्रशासनाच्या वतीने केलं आहे. त्याचबरोबर नागरिकांनी कच्च्या घरात न राहता सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही सांगण्यात आलं आहे.

