यंत्रणा सज्ज; कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी तयार राहण्याच्या प्रशासनास सूचना
परळी — गोदावरी नदी प्रवाहास प्रचंड पूर आलेला असून, परळी तालुक्यातील पोहनेर गावास पुराचा वेढा पडला आहे, याठिकाणी आज परळीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी चक्क होडीतून (चप्पू) जात गावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर व दिलासा दिला.
धनंजय मुंडे यांनी या संपूर्ण भागातील गावांच्या स्थितीचा प्रशासनाकडून आढावा घेत प्रशासनास कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी व सर्व प्रकारच्या यांत्रणांसह सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित होऊन संसारोपयोगी साहित्य, अन्न धान्य आदींचे नुकसान झाले असून, स्थानिक आपत्ती निवारण निधीतून तातडीने आर्थिक मदत करण्याच्या सूचना श्री मुंडे यांनी महसूल प्रशासनास केल्या आहेत.
पोहनेर सहित आजूबाजूच्या बऱ्याच गावांना पाण्याचा वेढा पडलेला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत काळजी घेण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी किंवा आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
दरम्यान राज्य सरकार या भीषण परिस्थिती मध्ये शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील व १००% नुकसानीची भरपाई दिली जाईल, अशी अपेक्षा देखील धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी ॲड गोविंदराव फड, राजाभाऊ पौळ, लक्ष्मणराव पौळ, प्रभाकर पौळ, विशाल श्रीरंग पाटील, चंद्रकांत कराड, माऊली तात्या गडदे, बाबासाहेब काळे, नितीन निर्मळ, राम किरवले यांसह ग्रामस्थ तसेच तहसीलदार व्यंकटेश मुंडे, सिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे यांसह महसूल, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आदी विभागाचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

