बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह केज ऐवजी धाराशिव जिल्ह्यातील कळंबकडे नेण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे एका महिलेला तयार ठेवण्यात आले होते. महिलेची छेडछाड झाली, त्यातून संतोष देशमुख यांना मारहाण झाली असे सांगून त्यांना समाजातून उठवण्याचा प्लॅन होता, असा खळबळजनक आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.

धनंजय देशमुख म्हणाले, मृतदेह केजकडे घेऊन येत होते. तेव्हा गाडी कळंबकडे वळवण्यात आली होती. याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी हिवाळी अधिवेशनात सभागृहालाही दिली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, पोलिसांनी संतोष देशमुख यांचा मृतदेह उचलला आणि ते केजकडे निघाले होते. दरम्यान चिंचोली फाटा येथे एक मार्ग कळंबकडे जातो आणि एक केजकडे. तेव्हा गाडी कळंबकडे वळवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र पोलिसांच्या गाडीमागे गावातील एक-दोन गाड्या होत्या. हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा केजकडे वळवली, असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे.देशमुख म्हणाले की, गुन्हेगारी टोळीचा म्होरक्याचा प्लॅन होता की, सरपंचाची हत्या झाली आहे. त्याच्या मृतदेहाला एका महिलेकडे घेऊन जायचे. संतोष देशमुख यांना ठार केल्यानंतरही त्यांनी सोडले नाही. त्या महिलेकडे नेऊन सोडले जाणार होते. तिथे ती महिला कपडे फाडून घेणार, छेडछाड झाली म्हणणार, अंगावर जखमा करुन घेणार आणि हे सर्व या माणसाने केले असे सांगून त्याला समाजातून उठवण्याचा त्यांचा डाव होता. हा कट रचणारा टोळीचा मुख्य होता. कटकारस्थान रचणारे पोलिसांच्या गाडीत होते. त्या गाडीत कोण पोलीस होते हे समजू शकले नाही, असेही धनंजय देशमुख यांनी सांगितले.
महिलेची छेड काढली आणि त्यातून हत्या झाली, असे दाखवण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण गावातील दोन गाड्या पोलिसांच्या गाडीच्या मागे होत्या म्हणून हा प्लॅन फसला. आमदार सुरेश धसांनी ही माहिती सभागृहाला सांगितले होती. पहिल्या आठ दिवसांत काय-काय झाले याचा तपास झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. बीड आणि केज पोलिसांनी सीआयडी आणि एसआयटीला काय माहिती दिली, असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला.
त्या टोळीकडून सगळं प्री प्लॅन केलं जातं. विदाऊट प्री-प्लॅन ते काहीही करत नाहीत. त्यांच्या गाडीमध्ये हत्यारं आधीच ठेवली जातात. त्यात काही नवीन नाही. हे जर नवीन असतं तर दोन दिवसांत आरोपी सापडले असते. यांचे सर्व सीडीआर तपासले पाहिजे. त्यांचा म्होरक्याने पहिल्या दोन-तीन दिवसांत 50-60 वेळा फोन केले होते. ते कशासाठी आणि कोणासाठी केले होते? असे सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केले आहेत.

