अहिल्यानगर — जिल्ह्यातील स्वयंभू पाषाण रूपातील शनैश्चर देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिशिंगणापूर येथे भाविक भक्तांची नेहमीच गर्दी दिसून येते. दरवाजा नसलेला गाव म्हणून देखील हे देवस्थान प्रसिद्ध आहे. दरम्यान याच देवस्थानच्या मंदिर समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी एक मार्चपासून करण्यात येणार आहे.

शनी देवाची शिळा एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे. एका व्यापाऱ्याला नवस पूर्तीचा अनुभव आला त्यामुळे त्याने शिळेभोवती चौथरा बांधला, असे सांगितले जाते. या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका प्रचिलित आहेत. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. शनि शिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज होत आहे. शनि देवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास आणि ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला.
शनैश्वर देवस्थान मंडळाने कोणता निर्णय घेतला आहे?
शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मात्र, तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचे सांगितले जात आहे. शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी चौथऱ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचे, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला. हा बदल 1 मार्च 2025 पासून लागू करण्यात येत आहे. त्यामुळे 1 मार्चपासून शनिदेवाला सुट्या तेलाऐवजी भाविकांना ब्रँडेड तेलानेच अभिषेक करावा लागणार आहे. भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास असे तेल स्वीकारले जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.
दरम्यान, शनि शिंगणापूर हे श्रद्धेचे केंद्र मानले जाते. शनि कृपेची प्राप्ती होण्यासाठी येथे हजारो भाविक तैलाभिषेक करण्यासाठी येतात. शनिशिंगणापूर देवस्थानाने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर परिणाम होत आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य तेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात. अन्न व भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

