बीड — संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी या व अशा प्रकारच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अनुदान तात्काळ वितरीत करण्याचे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड व शिरूर कासार तहसिलदार यांना दिले आहेत.
बीड विधानसभा मतदारसंघातील बीड शहर, बीड ग्रामीण व शिरूर कासार तालुक्यातील लाभार्थ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अनुदान मिळालेले नाही. या योजनेचे लाभार्थी म्हणजे गरजू, निराधार आणि दुर्बल असतात. त्यांचे जीवनमान या अनुदानावर अवलंबून असते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या योजनांचे लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदरील योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम तात्काळ वितरीत करा असे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड व शिरूर कासारचे तहसिलदार यांना दिले आहेत.

