बिंदुसरा नदीवरील पूल कम बंधारा आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्ता कामाला लवकरच सुरूवात
बीड — बीड शहरातील बिंदुसरा नदीवर पूल कम बंधारा तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका पर्यंतचा मुख्य रस्ता होण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया झाली असून आता निवड झालेल्या कंत्राटदार कंपनीला विभागाकडून स्वीकृती पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे.
मागील टप्प्यातच जरूड ते बार्शी नाका व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिरापूर धुमाळ या रस्त्यांसाठी तब्बल २१३ कोटी रूपयांचा निधी आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून मंजूर होऊन कामदेखील जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु शहरातील मुख्य असलेला बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंतचा रस्ता नव्याने व्हावा याकरिता आ.क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होते. याबाबत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, महामार्ग विकास प्राधिकरण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा, मागणी करून शेवटी या आ.क्षीरसागरांच्या प्रयत्नातून या कामाला मंजुरी मिळाली आहे. महामार्ग NH 361 F (CH 47+000 To CH 49+500 To Four Lane) २.५ (अडीच) किलोमीटर लांबी अंतर असलेल्या महामार्गाचे चौपदरीकरण, आणि नाली बांधकाम व बार्शी नाक्याजवळील बिंदुसरा नदीवर पूल कम कोल्हापूरी बंधारा बांधणे अशा स्वरुपातील हे काम असणार आहे. राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्याकडून याकामासाठी ४८ कोटी ८५ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरील कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) कोकण भवन, मुंबई यांच्याकडून कंत्राटदार कंपनीला स्वीकृती पत्र देण्यात आले आहे. यानंतर लवकरच कार्यारंभ आदेश होऊन कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. या रस्त्यामुळे रहादारीसाठी तर बिंदुसरा नदीवरील बंधार्यामुळे बीड परिसरात सिंचन आणि पाणी उपलब्धतेसाठी मोठा फायदा होणार आहे. आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांतून बीडसाठी अतिशय फायदेशीर असलेले हे काम लवकरच होणार आहे.
पूल कम बंधार्याचा सिंचन आणि पाणी साठवण्यासाठी मोठा फायदा
बिंदुसरा नदीवरील पूल कम कोल्हापूरी बंधार्यामुळे बीड शहर आणि आजूबाजूच्या साधारण ५ किलोमीटर पर्यंतच्या परिसरात पाणी पातळीत वाढ होणार असा तांत्रिक अंदाज आहे. बीड जिल्ह्यात पावसाची अनियमितता असल्याने प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होते. परंतु या कोल्हापूरी बंधार्यामुळे पाणी साठवणूक होईल. परिणामी पाणी उपलब्धता आणि शेती सिंचनासाठी याचा खूप मोठा फायदा परिसरात होणार आहे. बिंदुसरा नदीवर बंधारा कम पूल ही संकल्पना मोठी दूरदर्शी होती. ती आ.संदीप क्षीरसागर यांनी डोळ्यासमोर ठेवून हे काम होण्यासाठी निरंतर प्रयत्न केले. शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. अनेकवेळा अधिवेशनातही हा मुद्दा मांडला. दरम्यान आता आ.संदीप क्षीरसागरांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच हे काम पूर्ण झालेले असेल.