बीड — विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यातली लढत रंजक व चूरशीची बनत असताना निवडणूक रिंगणातून माघार घेतलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. यामुळे जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने पुतणे योगेश क्षीरसागर यांना एकादशीला पांडुरंग पावले असे म्हटले जाऊ लागले आहे.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र आज पत्रकार परिषद घेऊन जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,जाती जातीतील संघर्षाची दरी कमी करण आज काळाची गरज आहे.अंतर्मनाने जी हाक मला दिली त्यावरुन मी उमेदवारी अर्ज मागे घेतला.जनता माझा परिवार आहे.विस्तारीत परिवाराची जबाबदारी असून विकासाची घडी बसवण्यासाठी संघटीत होऊन योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही ही बाब लक्षात आली.त्यामूळे वाढप्या आपला असला की,शेलक ताटात पडत हे वाढप्याच काम योगेश करणार असल्याने त्यांच्या पाठीशी सर्व जनतेने मतदानाच्या रूपाने उभे राहावे असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले

