मुंबई -मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले.काही महिन्यां पूर्वीच ते कँसरसारख्या आजारातून बरे झाले. या कठीण काळात त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्या जिद्दीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. मात्र,आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली. अतुल परचुरे यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी छाप पाडली होती.
अतुल परचुरे यांनी पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा व्यक्ती आणि वल्लीमध्ये हुबेहुब साकारली होती. अतुल परचुरे यांचं ‘नातीगोती’ हे नाटक चांगलंच गाजलं. यावेळी त्यांच्याबरोबर दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू असे दिग्गज कलाकार होते.
अनेक मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. ‘वासूची सासु’, ‘प्रियतमा’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केलं. ‘सलाम-ए-इश्क’, ‘पार्टनर’, ‘ऑल द बेस्ट: फन बिगिन्स’, ‘खट्टा मीठा’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली.अलिबाबा आणि चाळीशीतले चोर हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा मराठी चित्रपट होता. याशिवाय ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं.दरम्यान, अतुल यांनी एका मुलाखतीद रम्यान सांगितलं होतं की, त्यांच्या यकृतामध्ये 5 सेंटीमीटर लांबीची कर्करोगाची गाठ असल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. त्यावर डॉक्टरांनी त्यांची तब्येत ठीक होईल असं सांगितलं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला. सुरुवातीला आजार न दिसल्यामुळे त्यांच्या स्वादुपिंडावर परिणाम झाला आणि चुकीच्या उपचारांमुळे आणखीनच त्यांची परिस्थिती बिकट झाली होती. अशातच डॉक्टरांनी त्यांना दीड महिना वाट पाहायला सांगितली होती. मात्र, अतुल यांनी डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार सुरू केले होते.अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी समोर येताच कलाविश्व हादरून गेलं आहे.

