तक्रारी असलेल्या मार्गावर तात्काळ पाहणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना
बीड — बीड मतदारसंघातुन जाणाऱ्या रेल्वे मार्गावर नागरिकांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. रेल्वे मार्गाच्या कामात अनेक त्रुटी असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच काही ठिकाणी अपघात होत आहेत. या भागातील नागरिकांनी यासंदर्भात अनेकवेळा रेल्वे विभागाशी अनेकवेळा संपर्क केला आहे. परंतु रेल्वेकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद नागरिकांना मिळाला नाही. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवार (दि.२३) रोजी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्यक्ष, सविस्तर चर्चा करून तक्रारी असलेल्या ठिकाणांची तात्काळ पाहणी करून येथील अडचणी दूर करण्यासंदर्भात सत्वर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
बीड मतदारसंघातून नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग मोठ्या प्रमाणात गेलेला आहे. याचे कामही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. परंतु या कामांमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे पुलांच्या खाली पावसामुळे नेहमीच खूप जास्त पाणी साचून राहते. त्यामुळे येथून वाहतूक करणे अवघड होते. ऊस वाहतूक करणारी वाहने याठिकाणाहून जाऊ शकत नाही. वाहतुकीची अडचण होत असल्याने या परिसरात रहिवाशी असलेले १५ ते २० हजार लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी रोड तिरका झाल्याने अपघात होत आहेत. या होत असलेल्या अडचणींमुळे येथील नागरिकांनी आतापर्यंत रेल्वे विभागाकडे अनेकवेळा संपर्क केला. परंतु नागरिकांना याबाबत रेल्वेकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२३) शासकीय विश्रामगृह, बीड येथे रेल्वे विभागाचे संबंधित अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या अडचणी संदर्भात अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून अडचणी दूर करण्यासाठी संबंधित ठिकाणच्या प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय स्तरावर तात्काळ कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना आ.क्षीरसागर यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीस आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, रेल्वे विभागाचे सर्व संबंधित अधिकारी व या भागातील नागरिक उपस्थित होते.

