बीड — आज धनंजय देशमुख आणि मस्साजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत. सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाद्वारे हत्येतील सर्व आरोपींना अटक करण्याची आणि कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येला 77 दिवस उलटून गेले आहेत, आणि या प्रकरणात कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे.
धनंजय देशमुख म्हणाले की, केज पोलिसांच्या तपासात सुरुवातीला असमाधानकारक निष्कर्ष आले होते. त्यांनंतर पोलीस अधीक्षकांसोबत झालेल्या चर्चेत तपासाची असमाधानकारक कार्यशैली उघड झाली, तसेच पोलिसांनी आरोपींना अभय दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
या हत्येच्या पहिल्या दिवशीच ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर वाल्मीक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली, जी धनंजय देशमुख यांच्या आंदोलनामुळे पूर्ण झाली. आता तिसऱ्यांदा ग्रामस्थ आणि धनंजय देशमुख अन्नत्याग आंदोलन करीत आहेत, आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांनी एल्गार पुकारला आहे.
धनंजय देशमुख यांचे प्रमुख मागणी आहे की, कृष्णा आंधळे याला अटक करून त्याच्या समर्थकांवर कारवाई केली जावी, कारण ते प्राणघातक हल्ले करत आहेत. कृष्णाचे समर्थक अजूनही त्याचे स्टेटस ठेवतात, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. याशिवाय, सरकारकडून सरकारी वकिलांची नियुक्ती करून या प्रकरणाला फास्ट ट्रॅक न्यायालयात न्याय मिळवावा अशी मागणी धनंजय देशमुख आणि मसाजोग ग्रामस्थ यांच्याकडून केली जात आहे.

