मुंबई — वाढत्या कर्जाच्या बोजामुळे महाराष्ट्र सरकार काही योजना बंद करण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे. लाडकी बहिण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत आहे. या योजनेमुळे सरकार इतर योजना बंद करण्याची तयारी करत असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे.
याशिवाय आमदारांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या बजेट बॅगचा आदेशही रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिवभोजन थाळीचा घेणार आढावा
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळी ही लोकप्रिय ठरली होती. या योजनेत केवळ १० रुपयांत प्रत्येकाला जेवण देण्यात येत होते. मात्र आता ही योजना बंद करण्याचा विचार सरकारच्या पातळीवरुन सुरु असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सुचना दिल्याची माहिती मिळत आहे.
थाळीवर २६७ कोटींचा खर्च
शिवभोजनाच्या दोन लाख थाळींसाठी वार्षिक २६७ कोटींचा खर्च येतो. त्यामुळे तिजोरीवरील भार वाढत आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्यात येणार होत्या. ८८६ हार्ड टाँप, चार चाकी बॅग खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी ८२ लाखांचा अंदाजित खर्च ठेवला होता. मात्र आता तो निर्णयही रद्द करण्यात येणार असल्याचे समजते.
आनंदाचा शिधाही बंद?
सणासुदीच्या काळात स्वस्त धान्य दुकानांतून राज्य सरकार आनंदाचा शिधा वाटप करत होते. दिवाळी, गुढीपाडवा, डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यासारख्या सणाच्या दिवशी लाभार्थ्यांना सहा वस्तूंचे वाटप होत होते. त्यात एक किलो साखर, एक लिटर तेल, अर्धा किलो रवा, अर्धा किलो हरबरा डाळ, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो पोहे यासारख्या सहा वस्तू दिल्या जात होत्या. ही किट फक्त १०० रुपयांमध्ये
दिली जात होती. त्यासाठी वार्षिक १६१ कोटींचा बोजा सरकारवर पडत होता. या वस्तूंमध्ये कमी करण्याचा किंवा ही योजनाच बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचे, काही माध्यमांनी वृत्त दिलं आहे

