माजलगाव — जळगाव जिल्ह्यातील सुमारे 30 ऊसतोड मजुरांना माजलगाव तालुक्यातील कवडगावथडी येथे डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मजुरांकडून जबरदस्तीने वेठबिगारी करून घेतली जात होती आणि त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे
जळगावच्या मजुरांना डांबून ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळताच त्यांच्या निर्देशानुसार तातडीने मोहिम राबवून सर्व मजुरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात तक्रारदार सखाराम तुकाराम सोनवणे वय 25 वर्ष, रा. धरणगाव जि. जळगाव, सध्या रा. कवडगावथड यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ते पत्नी, दोन मुली, आई यांच्यासह मजुरी करून उपजीविका चालवतात. दसऱ्यानंतर दोन दिवसांनी ऊसतोड मुकादम बाळु मगरे रा. पाथरवाडा, जि. जालना यांनी त्यांचा भाऊ देवाजी सोनवणे याला ऊसतोडीसाठी नेले. त्यानंतर सखाराम यांना फोन करून “तुम्ही कवडगाव येथे लगेच या, नाही आलात तर तुमचा भाऊ सोडणार नाही.”अशी धमकी दिली. यानंतर सखाराम यांच्यासह कुटुंबातील ज्योती, संगीता, पद्माबाई, दिपाली, रुपाली सोनवणे यांसह इतर 8-10 जणांनी 6 ऑक्टोबर रोजी कवडगावथडी गाठले. तिथे आधीपासून देवाजी सोनवणे आणि इतर 20-22 जणांसह एकूण तीस मजूर डांबून ठेवलेले होते.तेथे सोमेश्वर आबा आणि त्याचा मुलगा गणेश यांनी “ट्रॅक्टर भरा, काम करा, नाही तर हातपाय बांधून गंगेत फेकून देऊ.” अशा धमक्या देत शिवीगाळ केली. मजुरांना जेवणही दिले नाही. फड मालकांनी दिलेलेच जेवण खाऊन त्यांना काम करावे लागत होते. मुकादम बाळु मगरे उचल रक्कम न देता मजुरांना सतत कामाला लावत होता. सोबत असलेल्या लहान मुलांनाही ऊसतोडीचे काम करायला लावण्यात आले.
दरम्यान 14 नोव्हेंबर रोजी काम सुरु असताना तहसिलदार, पोलीस अधिकारी, जळगावमधील अधिकारी तसेच महिला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तीसही मजूरांची सुटका करून तहसील कार्यालयात सुरक्षितपणे हलवले.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात मुकादम बाळु मगरे, ट्रॅक्टर मालक सोमेश्वर आबा, त्याचा मुलगा गणेश अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर करीत आहेत.

