सचिन उबाळेंच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांचा मोर्चा
बीड — ज्ञानराधासह दिवाळखोरीत निघालेल्या मल्टीस्टेट पतसंस्थांच्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर उन्हात मोर्चा काढून शासन आणि प्रशासनाला जाब विचारला.
अर्चना कुटेंसह फरार असलेल्या इतर मल्टीस्टेटच्या अध्यक्ष व इतर संचालकांना
तात्काळ अटक करावी, मल्टीस्टेट आणि पतसंस्थांच्या तपासाची माहिती ठेवीदारांना द्यावी अशी मागणी यावेळी ठेवीदारांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. ठेवीदारांचा जीव घेणाऱ्या व्यवस्थेचा यावेळी ठेवीदारांनी धिक्कार केला.
बीड येथे ठेवीदार संघर्ष कृती
समितीचे राज्य मुख्यप्रवर्तक तथा स्वाभीमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाभरातील ठेवीदारांनी मोर्चा काढला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा माळीवेस, सुभाष रोड, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे
चौक, छत्रपती शिवाजी चौक-नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ज्ञानराधा, साईराम, राजस्थानी मल्टीस्टेटसह जिजाऊ मल्टीस्टेट, शुभकल्याण, लक्ष्मीमाता, मातोश्री अर्बन, मराठवाडा अर्बन (माजलगाव) या आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या मल्टीस्टेट आणि पतसंस्थांमुळे ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या ठेवीदारांच्या ठेवी तात्काळ मिळाव्यात, फरार असलेल्या अर्चना कुटेला तात्काळ अटक करावी यासह अन्य मल्टीस्टेटच्या अध्यक्ष, संचालकांना बेड्या ठोकाव्यात आणि मल्टीस्टेट, पतसंस्थांच्या तपासाची माहिती ठेवीदारांना द्यावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली. प्रचंड उन्हात जिल्हाभरातील ठेवीदार मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.