पालघर — कोरोना काळात 2020 मधील एप्रिल महिन्यात पालघरच्या गडचिंचले येथे काही साधूंचा मारहाणीत मृत्यू झाला आणि संपूर्ण देश या घटनेने हादरला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपने हे प्रकरण चांगलेच लावून धरले होते. यावेळी काशिनाथ चौधरी यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते. या साधू हत्याकांडमध्ये काशिनाथ चौधरी हे मुख्य आरोपी असल्याचे आरोप भाजपकडून करण्यात येत होते. पण, आता त्याच काशिनाथ चौधरी यांनी रविवारी (16 नोव्हेंबर) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण आता भाजपनेच केलेल्या आरोपांचे काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उपस्थित करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते काशिनाथ चौधरी यांच्यावर भाजपने गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात गंभीर आरोप केले होते. यावेळी भाजपने तत्कालीन ठाकरे सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप केले होते. त्यानंतर साधू हत्याकांड सहन झाले नसल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षफुटी केली. असे असतानाही रविवारी पालघर जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत चौधरी यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. खासदार हेमंत सावरा आणि भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या उपस्थितीत डहाणू येथे चौधरी यांनी शक्तिप्रदर्शन करत कमळ हाती घेतले. काशिनाथ चौधरी यांच्यासोबत 3 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.

