Sunday, February 1, 2026

निवडणुका येताच लोकहिताचा पुळका ग्रामीण रस्त्यासाठी धरणे आंदोलन

बीड — जि.प‌. पंचायत समिती निवडणुका तोंडावर येताच लोकांच्या प्रश्नाची आठवण पुढार्‍यांना येऊ लागली आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आज
नाळवंडी, पालीसह इतर जिल्हा परिषद गटातील ग्रामीण रस्त्यांची कामे आ.संदीप क्षीरसागर यांनी अडविल्याचा आरोप करत अनेक गावच्या सरपंच, पदाधिकाऱ्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन केले.

हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, नाळवंडीचे सरपंच ॲड.राजेंद्र राऊत, भाजपचे जिल्हा सचिव शांतीनाथ डोरले यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. यावेळी विधानसभा निवडणूक झाल्यापासून गायब झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, युवा नेते महेश धांडे, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.लक्ष्मण जाधव, महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.सतीश शिंदे, भाऊसाहेब डावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे बीड तालुकाध्यक्ष नंदकुमार कुटे, पंचायत समितीचे माजी सदस्य उत्तरेश्वर सोनवणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुमित कोळपे, अरुण लांडे, प्रदीप गायकवाड, सरपंच धनेश्वर खेत्रे, दत्ता जाधव, रोहित जाधव, सिद्धार्थ जाधव, राजाभाऊ नवले, लकी कंडेरे, राजू टाक, सुमंत राऊत, नामदेव म्हेत्रे, सखाराम राऊत, सचिन उनवणे यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.ॲड.राजेंद्र राऊत यांनी म्हटले की, आ.संदीप क्षीरसागर यांच्या दबावतंत्रामुळे अधिकारी रस्त्याचे मार्क आऊट देत नसून रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे आमदारांसह अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करत असल्याचे सांगितले. बीड तालुक्यातील नाळवंडी, पालीसह इतर जिल्हा परिषद गटातील नाळवंडी ते मौज व्ही.आर.क्र. २४३ काळेगाव हवेली ते लमाण तांडा रस्ता व्ही.आर. ३५४, ओडीआर ५० ते मानकुरवाडी रस्ता व्ही.आर. ३७, पाली ते वरवटी इजिमा १२७, पाली ते वरवटी इजिमा १२७ यांसह इतर अनेक रस्ते सुधारणा अंतर्गत कामे आहेत. सदर रस्ते हे जिल्हा नियोजनमधून सन २०२४ या वर्षामध्ये मंजूर आहेत. सदर रस्त्याचे कार्यारंभ आदेश ६ महिन्यांपूर्वी झालेले आहेत. या रस्त्याचे काम सन २०२४ मध्ये जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर झाले असून, डिसेंबर २०२४ मध्ये कामाचे कार्यारंभ आदेश निघाले आहेत. मात्र, बीडमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता, उपअभियंत्यांकडून अद्यापही कामाचे मार्कआऊट देण्यात आलेले नाहीत. आ.संदीप क्षीरसागर यांना ज्या भागातून अल्प मतदान झाले, त्या त्या भागातील कामे थांबवण्यात येत असल्याचा आरोप सरपंच ॲड.राऊत यांनी केला आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक विकासकामात खोडा घातला, परंतु यापुढे त्यांची मनमानी सहन केली जाणार नाही, त्यांच्याविरोधात वेळोवेळी आवाज उठविला जाईल, असा इशाराही ॲड.राऊत यांनी दिला आहे. दरम्यान, मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना देण्यात आले. यावेळी बीड तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध

वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेतली जात नाही. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले, असे सांगत आंदोलकांनी प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला. धरणे आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.

रास्ता रोकोचा इशारा कायम

आजच्या आंदोलनातूनही प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर सोमवार, १६ जून रोजी जरुड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सरपंच ॲड.राजेंद्र राऊत यांनी दिला आहे. जबाबदार अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहेपर्यंत रास्ता रोको मागे घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काम रखडल्याने ग्रामस्थ हैराण

सदरील रस्ता रहदारीचा असून, काम रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ मार्कआऊट करून काम सुरू करण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या आंदोलनाची प्रत पालकमंत्री ना.अजित पवार, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांना देण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles