Home क्राईम नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास 6 अधिकाऱ्यांची एसआयटी टीम करणार

नसरापूर अत्याचार प्रकरणाचा तपास 6 अधिकाऱ्यांची एसआयटी टीम करणार

0
7

पुणे — जिल्ह्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. एका 65 वर्षीय व्यक्तीने चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सहा अधिकाऱ्यांची एस आय टी टी करणार आहे

एसआयटी  SIT मार्फत तपास सुरू

या गंभीर प्रकरणाचा तपास आता स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) मार्फत केला जाणार आहे. राज्य सरकारने सहा अधिकाऱ्यांची टीम तयार केली असून त्यात दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पुणे ग्रामीण पोलिसांतील वरिष्ठ अधिकारी या तपासात सहभागी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

1 मे रोजी दुपारी, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला आरोपीने “वासरू दाखवतो” असं सांगून गोठ्यात नेलं. तिथे तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आला.
चिमुकली बराच वेळ दिसली नाही म्हणून शोधाशोध सुरू झाली आणि शेवटी गोठ्यात तिचा मृतदेह आढळला. सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपी मुलीला घेऊन जाताना स्पष्ट दिसल्याने गुन्हा उघडकीस आला.

ग्रामस्थांचा संताप, रस्तारोको

या घटनेनंतर नसरापूरमध्ये प्रचंड संताप उसळला. संतप्त नागरिकांनी पुण्यातील नवले पूल परिसरात रस्तारोको आंदोलन केलं. आरोपीला पकडून ग्रामस्थांनी त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं.

कोर्टातही आरोपीचे धक्कादायक वर्तन

आरोपीला कोर्टात हजर केल्यावर त्याने “ही किरकोळ मारामारीची केस आहे” असा दावा केला, ज्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पूर्वीही दोन गुन्हे, पुराव्याअभावी सुटका

हा आरोपी यापूर्वीही दोन वेळा अशाच गंभीर गुन्ह्यांमध्ये संशयित होता, मात्र पुरावे न मिळाल्यामुळे तो निर्दोष सुटला होता. त्यामुळे या वेळेस कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी अधिक तीव्र झाली आहे.

पीडित कुटुंबाची भूमिका

पीडित मुलीवर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या वडिलांनी स्पष्ट भूमिका घेत, “मुलीला न्याय मिळेपर्यंत कोणत्याही नेत्यांनी भेटायला येऊ नये,” असं सांगितलं. “राजकारणासाठी फोटो काढण्यापेक्षा न्याय महत्त्वाचा,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here