बीड — बैलजोडी चोरीला गेली आहे असा बनाव तयार करून पोलिसात खोटी तक्रार देणाऱ्या पिंपरखेड येथील दोन भावा विरोधात वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. जिल्ह्यात खोट्या तक्रारी देऊन पोलिसांना कामाला लावण्याचे प्रकार उघडकिस आल्यानंतर पोलिसांनीही फिर्यादीवरच गुन्हे दाखल केल्यामुळे अशा प्रकारांना आळा बसला होता. दरम्यान वडवणी पोलिसांमध्ये पुन्हा असाच काहीसा प्रकार घडला आहे. पिंपरखेड येथील संपत त्रिंबक निपटे व त्याचा भाऊ मदन निपटे यांनी दीड लाख रुपये किमतीची बैलजोडी चोरीला गेली असल्याची तक्रार दाखल केली. चोरीची घटना घडून इतके दिवस तुम्ही तक्रार देण्यासाठी का आला नाहीत तसेच बैल जोडी संदर्भात आर्थिक व्यवहार काही होता का? अशी विचारणा देखील एपीआय वर्षा व्हगाडे यांनी वारंवार तक्रारदाराकडे केली होती.
पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्र फिरवली असता सदर बैलजोडी ही श्रीकांत चंद्रकांत मगर, राहणार भावठाणा , तालुका आंबेजोगाई,बीड या शेतकऱ्याकडे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी त्यास समक्ष पोलीस ठाणे येथे बैल जोडीसह आणले. यावेळी श्रीकांत मगर यांनी ही बैल जोडी बाबाराव डाके, राहणार टकारवाडी, तालुका माजलगाव, याचे कडून विकत घेतल्याचे सांगितले, त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री टकारवाडी,येथे जावून बाबाराव डाके यांचेकडे चौकशी केली असता, त्याने ही बैल जोडी तक्रारदार संपत निपटे
राहणार पिंपरखेड,यास पैसे देऊन विकत घेतली, असे सांगितले त्यानंतर पोलिसांनी पुन्हा विश्वासात घेऊन तक्रारदाराची चौकशी केली असता त्यानेच हा बैलचोरीचा खोटा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे सदर तक्रारदार संपत नीपटे व त्यांचे भाऊ मदन निपटे यांचे विरोधात पोलीस ठाणे वडवणी येथे पोलीस अंमलदार नितीन काकडे यांचे सरकारतर्फे फिर्यादीवरून “सर्व परिस्थिती माहिती असताना देखील पोलिसांचे कायदेशीर अधिकाराचा गैरवापर करण्यासाठी पोलिसांना खोटी माहिती देवून त्यांची दिशाभूल करने या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी श्रीकांत मगर या शेतकऱ्यास ही बैलजोडी परत केल्याने त्याने त्यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी वडवणी पोलिसांचे आभार मानले व कोणत्याही नागरिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करू नये, असे आवाहन वडवणी पोलिसांनी केले आहेत.

