बीड — बीड जिल्ह्यात कधी काय घडेल याचा नेम नाही.चोरीचा नवा धक्कादायक पॅटर्न उघडकीस आला असल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे. एका शेतकऱ्याच्या विहिरीतील सहा टँकर पाणी चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जनावरांना पाणी कोठून आणायचं? आंब्याची झाड कशी जगवायची? असा प्रश्न शेतकऱ्यांने विचारला आहे. ही घटना साक्षाळ पिंपरीत घडली आहे.
चोरीच्या घटना सामान्य बनलेल्या आहेत. पैसे दाग दागिने किमती वस्तू चोरीला गेल्याचे प्रकार आजपर्यंत ऐकल्या गेले. मात्र बीडच्या साक्षाळ पिंपरीत त्रिंबक काशीद या शेतकऱ्याच्या विहिरीमधील चक्क सहा टँकर पाणी चोरीला गेलं आहे. जिल्ह्यामध्ये भयंकर दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची भासत असलेली टंचाई या अनुषंगाने त्रिंबक काशीद या शेतकऱ्याने गेल्या दोन महिन्यांपूर्वी आपल्या शेतातील असलेल्या विहिरीमध्ये अडीच परस पाणी साठवून ठेवलं होतं.हे पाणी त्यांच्या गुरा-ढोरांसाठी त्याचबरोबर त्यांनी वीस गुंठ्यामध्ये आंब्याचे झाड लावले आहेत, ते जगवण्यासाठी साठवून ठेवलं होतं. मात्र पाणी चोरण्याचा उद्योग काही चोरट्यांनी केला आहे. तसेच काही पाणी शेतामध्ये वाया घालवले आहे.
शेतकरी त्रिंबक काशीद व पत्नी रंभा काशीद हे दोन दिवस आपल्या नातेवाईकांकडे लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. याचाच फायदा घेऊन हे कृत्य केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. घटना घडल्यानंर महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. जाणून-बुजून कोणीतरी खोडसाळपणा केल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे.
”मला पाणी मागितलं असतं तर आम्ही दिला असतं. मात्र कोणीतरी जाणून-बुजून हे केलं आहे. आमचे जनावर त्याचबरोबर आंब्याची झाडं आम्ही जगवायची कशी? असा प्रश्न रंभा काशीद यांनी उपस्थित केला. संबंधित पाणी चोरणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान पाण्याची चोरीला गेल्याची चर्चा जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आहे.

