बीड — शासनाने तलाव बांधकामासाठी जागा संपादित केल्या गावकऱ्यांचे स्थलांतर करण्यात आले. कर्जनी गावाच्या पुनर्वसनासाठी त्यावेळी ग्रामस्थांना गायरान जमिनीवर घरे बांधण्यास सांगण्यात आले होते. या घटनेला अर्ध शतकाचा काळ उलटून गेल्यानंतर वन विभागाला आता जाग आली आहे. घर बांधलेली जमीन वनविभागाची असून घर इतरत्र हलवा अन्यथा कारवाई करण्यात येईल असं ग्रामस्थांना सांगितलं जात आहे. ग्रामस्थ ही आता आक्रमक झाले असून तलाव फोडून पूर्वीच्या जागी आम्ही घर बांधणार असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

तलावाला गावकऱ्यांची जागा संपादित केल्यानंतर शासनाने पुनर्वसनासाठी नवी जागा उपलब्ध करून दिली. गावकऱ्यांनी आपली जुनी घरे सोडून डोंगराचा भाग समतल करून स्वतःच्या मेहनतीने घरे उभारली. या प्रक्रियेला सुमारे ५० ते ५५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी येऊन ग्रामस्थांना घरे पाडण्याच्या सूचना देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. “ही जमीन वन विभागाची असून येथे केलेले बांधकाम काढून टाका, अन्यथा कारवाई केली जाईल,” असा इशारा अधिकाऱ्यांकडून दिला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

