बीड –निवडणुकाच्या तोंडावर राज्यातील पोलीस विभागाच्या बदल्या सुरु झाल्यानंतर बीडमधील एलसीबीचे उस्मान शेख यांची लातूरला बदली करण्यात आली. त्यांच्या जागी कोण हा प्रश्न अनेकांना पडला असताना आता एलसीबीला एसपी साहेब आपल्या कानाखाली राहणारा आणि स्वभावाने अतिशय शांत असणाऱ्या माणसाच्या शोधात असल्याची माहिती मिळत आहे. पण या अधिकाऱ्याच्या निवडीनंतर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळणार हे मात्र निश्चित आहे.
दरम्यान सध्या आयजी साहेब आणि एसपी यांच्यामध्ये बदल्याचे खलबते सुरु झाले असून थोडयावेळात नाव अंतिम होणार आहे.
एलसीबीत घनशाम पाळवदे यांच्यानंतर गुन्हेगारांना जरब बसावी अश्या एकाही अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही हे वास्तव आहे. आता पोलीस अधिक्षक खमक्या अधिकाऱ्याला या ठिकाणी नियुक्ती देतील असे वाटतं असताना एका दुसऱ्याच अधिकाऱ्याचे नाव आघाडीवर असल्याचे कळते.
बीडमध्ये जेंव्हा जाळपोळीची घटना घडली तेंव्हा सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.लोक घराबाहेर येताना भीत होते. यावेळी गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले. त्यावेळी काही पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वात पाहिले जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांचा ताफा पाहुन पळ काढला होता.एखाद्या मॅरेथॉन स्पर्धेला लाजवेल असं चित्र त्यावेळी निर्माण झालं होतं. पार्श्वभागाला पाय लावून पळणारे पोलीस अधिकारी बीडकरांनी इतिहासात पहिल्यांदाच पाहिले होते. पाय लावून पळणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आता एलसीबी साठी आघाडीवर घेतले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ढीला ढाला माणूस या पदावर बसवून बळीचा बकरा बनवण्याची खेळी खेळली जात आहे. ज्या पद्धतीने पोलीस अधीक्षकांनी आपली प्रतिमा जिल्ह्यात बनवली आहे. त्या प्रतिमेला मात्र ढिल्ल्या माणसामुळे तडा जायला देखील वेळ लागणार नाही.बीडमध्ये आधीच कायदा आणि व्यवस्था अस्तित्वात नसल्याच्या चर्चा आहेत.
उस्मान शेख यांची कारकीर्द देखील वांझोटीच राहिली हे वास्तव आहे. या जागेवर आता कानाखालचा माणूस पाहिजे म्हणून मेरिटच्या अधिकाऱ्यांना डावलंण्यात येणार असेल तर ते पोलीस दलासाठी चिंतेची बाब आहे. एलसीबीत आतापर्यंत वशिलेबाजी आणि लाळ घोटेपणावरच नियुक्त्या मिळाल्या होत्या. आता कुठे राजकीय पाठबळ नसणारे आणि आपल्या कामात अव्व्ल असणाऱ्या सामान्य अधिकाऱ्याला एलसीबीचे अधुरे स्वप्न पूर्ण होईल असे वाटतं असताना एसपी साहेब भ्रमनिरास करतायत की काय असे वाटू लागले आहे. शेवटी घटक प्रमुखांनीच अधिकारी निवडायचे असतात पण ते निवडताना जिल्ह्यात अप्पर पोलीस अधिक्षक यांची बदली, डीवायएसपी यांची बदली आणि ते स्वतः नवीन असताना कायदा योग्य हाताळणाऱ्या माणसाची निवड ही करणे महत्वाचे आहे. नाही तर कावळ्याच्या हाती दिला दरबार….! अशी स्थिती व्हायला वेळ लागणार नाही.

