बीड — ऊसदर वाढवून देण्याच्या मागणीसाठी बीड सह परभणी जिल्ह्यात शेतकरी आंदोलने होत असून, शनिवारी पाथरीमध्ये रास्तारोको तर आंदोलनाला पाठिंबा म्हणून ऊसतोड कामगारांनी कोयता बंद ठेवला असून, वाहनधारकांनी वाहतूक करण्यास नकार दिल्याने हंगामाच्या नमनालाच अनेक साखर कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील असंख्य गावातील शेतकरी यांनी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीला पाठींबा देत शेतकऱ्यांनी आपली ऊस तोड व ऊस वाहतूक थांबवली आहे. यातच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने समितीत सामील होऊल पेक्षा अधिक वाहनाद्वारे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदारांना भेटी देत आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कारखानदारांनी कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली. ऊस दर बाबत कोणताही निष्कर्ष निघाला नसल्याने ऊस आंदोलन चिघळले आहे. बीड जिल्ह्यात शुक्रवारी शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वाहनांच्या ताफ्याद्वारे जिल्ह्यातील ओंकार शुगर्स पांगरी, अंबा साखर अंबाजोगाई, येडेश्वरी शुगर्स केज, गंगा माऊली शुगर्स केज या ठिकाणी ल शेतकरी समितीने भेटी देऊन सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने ऊसासाठी प्रत्येक टनासाठी ३ हजार ५५५ रुपये दर १०.२५ रिकव्हरीला जाहीर केला आहे. आपणाकडे ११ किंवा त्यापेक्षा जास्त सरासरी रिकव्हरी लागत आहे, असे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अजय बुरांडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च लक्षात घेता प्रती टन ३ हजार रू. पहिली उचल तर ४ हजार रु. अंतिम दर मिळाला पाहीजे ही मागणी निवेदने करून केली. याबाबत जिल्हाधिकारी, बीड व साखर सहसंचालक छ. संभाजीनगर विभाग यांना देखील कळवण्यात आले आहे, असे ॲड. बुरांडे म्हणाले.
ऊस उत्पादक संयुक्त कृती समितीने सुरू केलेल्या या आंदोलनास विविध ऊस तोड कामगार संघटना, विविध गावातील ग्राम पंचायत, सेवा सहकारी सोसायटी यांनी ठराव मंजूर करत पाठिंबा दिला असून ऊस प्रश्नी पेटलेले हे आंदोलनाबाबत साखर कारखानदारांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास हे आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र स्वरूप घेऊन जन आंदोलन होईल असे कृती समितीकडून सांगण्यात येत आहे.

