Home Blog Page 97

मुळूकवाडी जवळ कारचा अपघात ; मानवतच्या डॉक्टर बहीण भावाचा मृत्यू तर 3 जखमी

0

बीड — नवदांपत्यासह देवदर्शन करून परतणाऱ्या कुटुंबीयांची गाडी मांजरसुंबा जवळील मुळूकवाडी शिवारात पुलाला धडकली. गाडी धडकताच गाडीचे टायर निखळून पडले या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृतात मानवत तालुक्यातील वझूर बु. येथील डॉक्टर बहिण भावाचा समावेश आहे.

डॉ. ओम ज्ञानोबा चव्हाण व त्यांची चुलत बहिण डॉ. मृणाली शिंदे अशी मृतांची नावे आहेत. मानवत तालुक्यातील वझुर गावातील निवृत्त प्रा.माणिक चव्हाण हे सध्या पालम येथे राहतात. त्यांचा मुलगा डॉ. मंथन चव्हाण हे सोनपेठ येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. दि. 2 जानेवारीला डॉ. मंथन याचे सातोना येथील मुलीशी विवाह पार पडला. हे नवदांम्पत्य यात्रा म्हणून देवदर्शनासाठी कानसूर येथील त्यांची बहीण डॉ.मृणाली शिंदे व वझुर येथील त्यांचा चुलत भाऊ डॉ.ओम चव्हाण असे चारजण कारने (एम.एच.22, ए.एम.4571) जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी गेलेले होते.

तेथून ते परतीच्या प्रवासात सोनपेठकडे येण्यासाठी निघाले होते. दरम्यान, अहमदपूर ते अहमदनगर महामार्गावरील महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यानच्या मुळकवाडी येथील पुलाला कार धडकल्याने झाला. या अपघातात डॉ.ओम चव्हाण व डॉ.मृणाली शिंदे हे दोघे डॉक्टर बहीण – भाऊ जागीच ठार झाले. तर कारमधील नवदांम्पत्यातील डॉ.मंथन चव्हाण व त्यांची पत्नी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे मानवत तालुक्यातील वझुर व पाथरी तालुक्यातील कानसुर या दोन गावावर शोककळा पसरली. डॉ.ओम चव्हाण यांच्या पार्थिवावर वझुर येथे तर डॉ.मृणाली शिंदे यांच्यावर कानसूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आ.नमिता मुंदडांच्या निवडीला आव्हान; मुंदडासह निवडणूक आयोगाला खंडपीठाची नोटीस

0

छत्रपती संभाजीनगर — केज येथील आमदार नमिता मुंदडा यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेत मुंदडा यांच्यासह सर्व उमेदवार व निवडणूक आयोगास नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नमिता मुंदडा या केज विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर विजयी झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. या विरोधात उमेदवार पृथ्वीराज शिवाजी साठे यांनी खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मागणी करून देखील फॉर्म 17 सी ची प्रत त्यांनी दिली नाही. त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडिओ शुटींग, सीसीटीव्ही फुटेज यांची मागणी करून दिले नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवाराला झुकते माप दिले आहे.

केज विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने कुठलेही नोटिफिकेशन काढले नाही. ईव्हीएम (मतदान यंत्र) द्वारे निवडणूक घेतली, म्हणून लोकप्रतिनिधित्व कायद्याचे कलम 59 आणि 61 यांचे उल्लंघन झाले आहे. कलम 59 मध्ये निवडणुकीत मतदान करण्याची पद्धती ही मतपत्रिकेद्वारे मतदान केले जाईल याबाबतीत आहे.
सदरील निवडणुक याचिकेत पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम तसेच व्हिव्हिपॅट मशीन यांना अनुक्रमांक देताना कायदेशीर तरतुदींचे पालन केलेले नाही. ईव्हीएम मशीन तसेच बॅलेट युनिट्स आणि व्हिव्हिपॅटचे प्रिंटर्स यांना कायमस्वरूपी अनुक्रमांक न देत त्यावर स्टिकर लावण्यात आले होते.त्यामुळे ईव्हीएम मशीन यांची सुरक्षितता संशयास्पद असल्याने निवडणुकीचा निकाल हा प्रभावित झालेला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनवरील सील यावर स्वतः स्वाक्षरी केलेली नाही. म्हणून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 100 मधील ड (4) नुसार राज्यघटनेचे तसेच त्यामधील तरतुदी आणि नियमांचे व आदेशांचे अनुपालन न केल्यामुळे निवडणुकीवर विपरिणाम झाला आहे.

त्यामुळे नमिता मुंदडा यांची निवडणूक रद्दबातल घोषित करण्याची विनंती केली आहे. सुनावणीनंतर आमदार नमिता मुंदडा यांच्यासह 23 उमेदवार, निवडणूक आयोग यांना नोटीस बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. अर्जदारांतर्फे ॲड. रविंद्र गोरे, ॲड. सुस्मिता दौंड काम पहात आहेत

वाशी:ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची दीड महिन्यानंतर सुटका

0

वाशी(धाराशिव) — तालुक्यातील कोठावळे पिंपळगाव मध्ये उत्तर प्रदेश मधील 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांना पोलीस ठेवले गेले होते.तब्बल 45 दिवसापासून गायब असलेल्या या मजुरांच्या टोळीची तीन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर सुखरूप सुटका करण्यात आली.

उत्तर प्रदेश मधील ऊस तोडी साठी आलेले 19 मजूर 15 मुलांसह अचानक एका एकी गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. तर 3 दिवसाच्या शोधानंतर मजूरांची माहिती मिळाली आणि आता त्यांची सुटका करण्यात आली आहे.या प्रकरणी मजुरांना घेऊन येणाऱ्या दोन ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यातील हे मजूर असून या मजुरामध्ये 11 पुरुष, 8 महिलांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यासह 15 मुलांची यातून आता सुटका करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, थेट उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या बाबत तक्रार दिली असता ही सुटका करण्यात आली आहे.ललितपूर जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र येताच धाराशिवच्या जिल्हाधिकारी यांनी कामगार विभागाला या मजूरांना शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या हालचालींना वेग आला आणि अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

आ. संदीप क्षीरसागरांमुळे बीडच्या औद्योगिक विकासाला येणार गती: जमिन पाहणी;मुख्यमंत्र्यांशी केला पत्रव्यवहार

0

आ.संदीप क्षीरसागर यांची एमआयडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत व्यापक बैठक

बीड — जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड येथील औद्योगिक वसाहत अर्थात एमआयडीसीच्या विकासाला गती मिळावी त्यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा व औद्योगिक विकासात बीड जिल्हा पुढे यावा यासाठी बीड विधानसभेचे आमदार संदीपभैय्या क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत शुक्रवारी (दि.७) त्यांनी एमआयडीसी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बीड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेत चर्चा केली. जमिन पाहणी करण्यात आली असल्याचे सांगत याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, यांच्याकडे रीतसर पत्रव्यवहार केला आहे
बीड येथील एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या या बैठकीला एमआयडीसी विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी अधिकारी अमित भामरे व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थित होते. बैठकीत बीड शहरातील एमआयडीसीचा विकास याबाबत व्यापक चर्चा करण्यात आली. ही बैठक सकारात्मक ठरली. दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. बीड एमआयडीसीचा विकास व्हावा या ठिकाणी मोठे उद्योग यावेत, यातून रोजगार निर्मिती व्हावी यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. एमआयडीसीसाठी जमिनीची पाहणी देखील झाली असून यापुढील काळात बीड जिल्ह्याचा औद्योगिक विकास होईल अशी भावना व्यक्त करण्यात आली.

छपरी दादांना पोलीस अधीक्षकांची तंबी

0

बीड — अवैध वाळू उपसा प्रकरणातील आरोपींना समज दिल्यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत समज दिली आहे. यापुढे गुन्ह्यांमध्ये नाव आले तर एमपीडीए ,मकोका सारख्या कारवाया करण्यात येतील अशी तंबी देखील देण्यात आली आहे. एस पी नवनीत कांवत यांनी गुन्हेगारांना बोलावून सज्जड दम दिल्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात वारंवार उद्भवणार्‍या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस दल अलर्ट मोडवर आले आहे. आठ दिवसांपूर्वी पोलिस अधिक्षकांनी जिल्ह्यात अवैध वाळू उपशा संदर्भात गुन्ह दाखल असलेल्या 51 जणांना पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावून घेत यापुढे अवैध वाळू उपसा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला होता. यानंतर शुक्रवारी राजकीय, सामाजिक व इतर गुन्हे दाखल असलेल्या 80 जणांना पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते.

या सर्वांना प्रारंभी अपर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर यांनी सूचना केल्या. यामध्ये जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी पोलिस दल कठोर पावले उचलत असून यापुढे तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्यास यापुर्वीच्या गुन्ह्यांच्या आधारावर मकोका, एमपीडीए तसेच हद्दपारीसारखी कठोर कारवाई केली जाईल असा इशारा या 80 जणांना देण्यात आला. यानंतर स्वतः पोलिस अधिक्षक नवनित कावत यांनीही या 80 जणांना अशाच पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा भरात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेले हे सर्वजण होते. आता पोलिस अधिक्षकांनी थेट अशा पद्धतीने कारवाईचा इशारा दिल्याने या 80 जणांसह इतर गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या मंडळींमध्येही जरब निर्माण होत जिल्ह्यात शांतता नांदेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बस्ता बांधण्यासाठी निघालेल्या जीपचा अपघात; वधुपित्यासह महिला ठार

0

केज — आपल्या मुलीचा विवाह जवळ आल्यामुळे लग्नासाठी कपड्याचा बस्ता बांधण्यासाठी जीपने वधू पिता नातेवाईकांसह अहिल्यानगर कडे जात होते. दरम्यान सांगवी सारणी पुलावरील वळणावर समोरून येणाऱ्या टेम्पोची जीपसोबत धडक झाली.या अपघातात वधू पित्यासह लग्न जुळविण्यात मध्यस्थी असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान अहमदनगर – अहमदपूर राष्ट्रीय महामार्गांवर सारणी शिवारात झाला.

केज तालुक्यातील कासारी येथील रामेश्वर शाहूराव डोईफोडे यांच्या मुलीचा विवाह बोरदेवी ता. बीड येथील इंजिनियर मुलासोबत 23 फेब्रुवारी आहे. दोन्ही बाजूच्या नातेवाईकांना सोयीचे म्हणून अहिल्यानगर येथे बस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता एका जीप क्र.एम एच 16 ए टी 0016 ने मुलीचे वडील, नवरी मुलगी व इतर नातेवाईक अहिल्यानगरकडे निघाले. सकाळी 8 वाजेच्या सुमारास अहमदपूर -अहमदनर राष्ट्रीय महामार्गवरील सारणी – सांगवी पुलावरील वळणावर समोरून येणाऱ्या टेम्पो क्र. एम एच 01 / यु सी 5502 आणि जीपची जोरदार धडक झाली. यात वधू पिता रामेश्वर शाहूराव डोईफोडे वय 50 वर्षे, रा कासारी आणि उर्मिला उर्फ उमा श्रीराम घुले वय 45 वर्षे, रा कोरेगाव ह मू शिक्षक कॉलनी केज या दोघांचा मृत्यू झाला. गाडीतील अन्य 6 जण जखमी झाल आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैभव पाटील, जमादार दत्तात्रय बिक्कड, शिवाजी कागदे, प्रकाश मुंडे, चालक दराडे यांनी अपघातस्थळी भेट दिली. मृत व जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले.

बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू 

0

पाटोदा —  तालुक्यातील मेंगडेवाडी गावातील उखारा शिवारात  दि.६ गुरूवार रोजी दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात श्रीमती सोजरबाई धोंडीराम बोबडे वय ६५ वर्षे या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला असुन या परीसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभाग आणि पोलिस प्रशासनाला याची फोनवरून भगवान शिंदे यांना कळविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,

भगवान शिंदे यांच्या म्हणण्यानुसार श्रीमती सोजरबाई धोंडीराम बोबडे या दुपारी १२ वाजता शेतातील जनावराच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे जात असतात. आज दुपारी ३ वाजता बिभिषण दासु शिंदे यांनी शेतातील जनावरे आणण्यासाठी जात असताना त्यांच्या गोठ्याशेजारी शेतात सोजरबाई यांचे प्रेत पाहीले.त्यांच्या अंगावरील जखमावरून बिबट्याने नरडीचा घोट घेतल्याचे दिसून आले. शेतात बिबट्याचे ठसे दिसुन आले.त्यांनी सोजरबाई यांच्या नातु जगन्नाथ बबन बोबडे यांना फोनवरून कल्पना दिली.त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. भगवान शिंदे यांनी पाटोदा वनविभागाचे अधिकारी आरएफओ श्रीकांत काळे  व पोलीस प्रशासन पोलिस निरीक्षक जाधव यांना फोन वरून कल्पना दिली. सायंकाळी पाटोदा पोलीस प्रशासनाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ भडके व बीट अंमलदार बाळासाहेब वाघ पाटोदा यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थळ पंचनामा केला. वनविभागाचे आरएफओ श्रीकांत काळे घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रेत शवविच्छेदनासाठी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

कराड-मुंडे विरोधातील बातम्या का पाहतोस म्हणून मारहाण करणारे दोन्ही आरोपी कर्नाटकात पकडले

0

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा मिळण्याची शक्यता?

किल्लेधारूर – वाल्मीक कराड, धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बातम्या का पाहतोस असं म्हणत लोखंडी राॅड सह कोयत्याने बेदम मारहाण करणाऱ्या वैजनाथ बांगर व अभिषेक सानप या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
केज तालुक्यातील धारूर पोलीस स्टेशन हद्दीमधील तरनळी या गावांमध्ये, वाल्मीक कराडच विरोधातील बातम्या का बघतोस? असं म्हणत अशोक मोहिते यास वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी
लोखंडी रॉडने जबर मारहाण केली होती. या मारहाणीत अशोक मोहिते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता गुरुवारी संध्याकाळी पर्यंत तो शुद्धीत आला नाही. जखमी असलेला अशोक मोहिते हा होमगार्ड म्हणून देखील काम करत होता.
याप्रकरणी मावसभाऊ बालासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशन मध्ये वैजनाथ बांगर, अभिषेक सानप या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी फरार होते. मात्र येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी या गुन्ह्याचा तपास हाती घेतला.या दोन्ही फरार आरोपींचा पाठलाग करत कर्नाटक येथून दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोघांकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे चा ठाव ठिकाणाला लागण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. कृष्णा आंधळे याच्या वाढदिवसाच्या दिवशी पकडलेल्या दोन्ही आरोपींनी कृष्णा आंधळेला दिलेल्या शुभेच्छाचे स्टेटस ठेवले होते असं सांगितलं जात आहे

विद्युत पुरवठा सुरळीत करा;महावितरण विरोधात शेतकरी आक्रमक

0

बीड — खांडे पारगाव परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने वैतागलेल्या शेतकरी, नागरिक महिला, विद्यार्थी यांच्या वतीने महा वितरण विरोधात शेतकरी आक्रोश मोर्चा, व जाहीर निदर्शने आंदोलन शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या पुढाकाराने अधीक्षक अभियंता विभागीय महावितरण कार्यालय जालना रोड बीड येथे करण्यात आले

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याच्या पिकाची राख रांगोळी होत आहे. विहिरीत पाणी असतानाही महावितरण कंपनी मुळे डोळ्या देखत पीक करपून चालली आहेत, इ 10 वी 12 वी बोर्डाच्या परीक्षा जवळ या महिन्यात आहेत विद्यार्थांना अभ्यास करता येते नाही, माणसाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांना टँकर ने पाणी विकत घ्यावे लागत आहे हा सर्व दुर्दैवी प्रकार महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे होत आहे
या मुळे खांडे पारगाव परिसरातील खांडे पारगाव, अंथरवान प्रिंपी, नागपूर खुर्द, उमरद खालसा, नागपूर बुद्रुक, उमरी, अंथरवान प्रिंपि तांडा येथील सात गावातील शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढून जाहीर निदर्शने आंदोलन करून अधीक्षक अभियंता विभागीय कार्यालय जालना रोड बीड येथे निवेदन देऊन शेतकऱ्यांचा तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करा, शासन नियमनुसार शेतकऱ्यांना दिवसाची लाईट द्या , सात गावांसाठी मजूर 5 M.v.p. ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसावा, नवीन सबस्टेशन मंजूर करा, इंजि. भागा नगरे यांची तत्काळ बदली करा, विद्युत पुरवठा सुरळीत होई पर्यंत पूर्वी प्रमाणे एम.आय. डी. सी. मधून विद्युत पुरवठा करा, या वरील मागण्यासाठी सात गावातील शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढून जाहीर निदर्शनं आंदोलन करून अधीक्षक अभियंता विभागीय कार्यालय जालना रोड बीड येथे निवेदन देण्यात आले या वेळी शेतकऱ्याने आक्रमक भूमिका घेत तत्काळ मागण्या करण्यात यावी असे शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, जालिंदर सोळुंके, खाजाभाई पठाण,……. आदी सह शेकडो शेतकरी उपस्थित होते

लाडक्या बहि‍णींचा तिजोरीवर ताण; आनंदाचा शिधा, शिव भोजन थाळी होणार बंद?

0

मुंबई — वाढत्या कर्जाच्या बोजामुळे महाराष्ट्र सरकार काही योजना बंद करण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे. लाडकी बहिण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत आहे. या योजनेमुळे सरकार इतर योजना बंद करण्याची तयारी करत असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे.

याशिवाय आमदारांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या बजेट बॅगचा आदेशही रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिवभोजन थाळीचा घेणार आढावा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळी ही लोकप्रिय ठरली होती. या योजनेत केवळ १० रुपयांत प्रत्येकाला जेवण देण्यात येत होते. मात्र आता ही योजना बंद करण्याचा विचार सरकारच्या पातळीवरुन सुरु असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सुचना दिल्याची माहिती मिळत आहे.

थाळीवर २६७ कोटींचा खर्च

शिवभोजनाच्या दोन लाख थाळींसाठी वार्षिक २६७ कोटींचा खर्च येतो. त्यामुळे तिजोरीवरील भार वाढत आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्यात येणार होत्या. ८८६ हार्ड टाँप, चार चाकी बॅग खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी ८२ लाखांचा अंदाजित खर्च ठेवला होता. मात्र आता तो निर्णयही रद्द करण्यात येणार असल्याचे समजते.

आनंदाचा शिधाही बंद?

सणासुदीच्या काळात स्वस्त धान्य दुकानांतून राज्य सरकार आनंदाचा शिधा वाटप करत होते. दिवाळी, गुढीपाडवा, डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यासारख्या सणाच्या दिवशी लाभार्थ्यांना सहा वस्तूंचे वाटप होत होते. त्यात एक किलो साखर, एक लिटर तेल, अर्धा किलो रवा, अर्धा किलो हरबरा डाळ, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो पोहे यासारख्या सहा वस्तू दिल्या जात होत्या. ही किट फक्त १०० रुपयांमध्ये
दिली जात होती. त्यासाठी वार्षिक १६१ कोटींचा बोजा सरकारवर पडत होता. या वस्तूंमध्ये कमी करण्याचा किंवा ही योजनाच बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचे, काही माध्यमांनी वृत्त दिलं आहे