Home Blog Page 96

बीड शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सत्येंद्र पाटील,उपाध्यक्षपदी हाजी नसीम इनामदार

0

बीड  — बीड शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते सत्येंद्र पाटील यांची तर उपाध्यक्षपदी हाजी इनामदार यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वागत सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी राजेंद्र मस्के, प्रा.विजय पवार, मिरगणे सर, माजी प्राचार्य अनंत नखाते सर, ज्येष्ठ शिक्षक नेते कल्याण वाघमारे सर, रामनाथ डाके सर, अप्पासाहेब रसाळ सर बाळासाहेब गोरे, अशोक रोमण, बंडु कदम, झुंजार धांडे, राजेंद्र साळुंके, जयमल्हार बागल, विशाल तांदळे, दिपक हजारे, मिठ्ठन कोटुळे, दत्ता साळुंके, अभय बीडकर, सचिन हरनमारे, वल्लभ चिरके, गणेश लोंढे, अभिजीत मसकर, पप्पू लांडे, दत्ता कशिद, सुरेश खुर्णे, वामन घोडके, महेंद्र शिराळे यांच्यासह अनेक शिवप्रेमींची उपस्थिती होती.
बीड शहरात गेल्या काही वर्षापासून अत्यंत उत्साहात सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. सबंध बीडकर नागरिक या शिवजयंती सोहळ्यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी होत असतात. यंदाही बीडचा हा सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा आ. संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व सहकारी, पदाधिकारी, मित्र परिवाराच्या वतीने अत्यंत आनंददायी वातावरणात उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड तसेच शिवजयंतीच्या अनुषंगाने चर्चा व विनिमय करण्यासाठी आणि शिवजयंती उत्सवामध्ये यावर्षीच्या आयोजित कार्यक्रमासंबंधी निर्णय घेण्यासंदर्भात दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील शासकीय विश्रामगृहात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कार्यकारिणीच्या व्यापक बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. आ. संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते सत्येंद्र पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी हाजी नसीम इनामदार यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला शिवप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित होते.

माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतच्या मुलाचे अपहरण

0

पुणे — शिवसेना नेते माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मूलगा ऋषिकेश सावंत यांचे पुणे विमानतळावरून आज (दि. १०) अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे. तो नऱ्हे येथील सावंत यांच्या कॉलेजचे काम सांभाळतो.

आज अचानक दुपारी तीन नंतर ऋषिकेश चा फोन बंद आला. बराच वेळ संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी आणि अपहरणाची तक्रार दाखल केली.

दरम्यान, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे समोर येत आहे. ऋषिकेश प्रायव्हेट चार्ट विमानाने बँकॉक कडे जात असल्याचे यंत्रणांना समजले. संबंधित पायलटशी बोलून अंदमान निकोबार पर्यंत पोहोचलेल्या ऋषिकेश ला परत बोलावले आहे. त्यामुळे ही घटना अपहरण की ऋषिकेश स्वतःहून गेला. याबद्दल अजूनही संभ्रम वाढला आहे.

ग्रामसेवकांवर लाडकी बहीण योजनेची नवी जबाबदारी?

0

मुंबई — मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्यास त्या महिलेचा लाभ कसा बंद करायचा, हे आता राज्य सरकार पुढचे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवकावर याची माहिती देण्याची जबाबदारी देण्याचा शासन विचार करीत आहे.

त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभाग, प्राप्तिकर विभाग, महसूल विभाग यांच्या बरोबरच ग्रामविकास विभागाचाही सहभाग या योजनेत घेण्याचा शासनाचा विचार आहे. सरकारी नोकरीचे निवृत्तिवेतन घेणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हयातीचा दाखल सादर करावा लागतो. त्याआधारे संबंधित निवृत्तिवेतन धारकाचे निवृत्तिवेतन सुरु ठेवायचे किंवा बंद करायचे याचा निर्णय घेतला जातो. मात्र तशी तरतूद या योजनेसाठी केल्यास या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अनावश्यक रीत्या महिलांना धावपळ करावी लागेल. त्यापेक्षा ग्रामसेवकांना ही जबाबदारी देण्याचा विचार शासन स्तरावर सुरु असल्याचे समजते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरून अभिनेते राहुल सोलापूरकर चे वादग्रस्त वक्तव्य

0

पुणे — छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं वादग्रस्त विधान अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. सोलापूरकर याच्या या विधानावरून राज्यभरात पडसाद उमटले होते.

दरम्यान, राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मुलाखतीत राहुल सोलापूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी राहुल सोलापूरकर यांच्या माफीची मागणी केली आहे. माफी न मागितल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशाराही खरात यांनी दिला आहे.

रामजी सकपाळ नावाच्या या एका बहुजना घरात जन्माला आलेले भीमराव जो आंबावडेकर नावाच्या गुरुजीकडून दत्तक घेतला जातो. त्याच नावावरून पुढे भिमराव आंबेडकर म्हणून मोठे होतात. त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जस म्हटलं आहे, तसं ते अभ्यास करून मोठे झाले आहेत त्या आर्थाने वेदांमध्ये भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर याने केलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेतलं म्हणणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळे फासू, असा इशारा रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी दिला आहे. राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात हे विधान अत्यंत निषेधार्थ वक्तव्य केलं असल्याचे खरात यांनी म्हटले. राज्य सरकारने तात्काळ सोलापूरकर यांच्यावर कारवाई सरकारने करावी, आणि राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत मी एका मुलाखतीत मत व्यक्त केले होते. वेदांमधल्या चातुवर्णाचे वितरण सांगितल्याप्रमाणे मी ते मत मांडले होते. मात्र त्यातलीच दोन वाक्ये काढून काही लोकांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न आज पुन्हा केला जातोय, असे सांगत कुणाची मने दुखावली असतील तर माफी मागतो, असे वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर म्हणाला. त्याआधी राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले.

जालन्यातून नऊ जण तडीपार, मनोज जरांगे यांच्या मेहुण्याचाही समावेश

0

जालना — विविध गुन्ह्यांचे आरोप असलेल्या अंबड तालुक्यातील सात आणि घनसावंगी तालुक्यातील दोन, अशा नऊ जणांवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई केली. यामध्ये मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर यांचाही समावेश आहे.

दरम्यान, सर्व समाजच आपला पाहुणा आहे. परंतु एखाद्या वेळेस आपले तोंड बंद करण्यासाठी हे षडयंत्र असेल, असा आरोप जरांगे याांनी यासंदर्भात केला आहे.अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करून विक्री करणे, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, इत्यादी गुन्हे तडीपार केलेल्यांवर दाखल आहेत. त्याचप्रमाणे यापैकी एकावर ऑनलाईन जुगार खेळविणे, धमक्या देणे आदी गुन्हेही दाखल आहेत. पोलिसांनी अंबड उपविभागीय कार्यालयाकडे तडीपारीचे 20 प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी नऊ प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांनी तडीपारीची कारवाई केली.

तडीपार करण्यात आलेल्यां पैकी सात जण अंबड तालुक्यातील असून जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेले आंतरवली सराटी गाव याच तालुक्यातील आहे. अंबड, घनसावंगी, गोंदी, पोलीस ठाण्याच्या वतीने तडीपारीच्या कारवाईचे हे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले होते.जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय. वामन मसुरराव तौर, रामदास मसुरराव तौर (दोन्ही रा. शिवनगाव ता. घनसावंगी), संदीप सुखदेव लोहकरे (रा. अंबड), गोरख बबनराव कुरणकर (रा. कुरण), अमोल केशव पंडित (रा. अंकुशनगर), गजानन गणपत सोळुंके, संयोग मधुकर सोळुंके (रा. गोंदी), विलास हरिभाऊ खेडकर (रा. गंधारी) आणि केशव माधव वायभट (रा. अंकुशनगर, ता. अंबड) अशी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या 9 आरोपींची नावं आहेत.मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास हरिभाऊ खेडकर, सुयोग सोळुंके, गजानन सोळुंके या तिघांचाही या यादीत समावेश असून, हे मनोज जरांगे यांच्यासोबत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. या आरोपींवर अवैध वाळू उत्खनन, जाळपोळ, धमकावणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, या अनुषंगाने माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, पाहुणे-रावळे आपल्याला समजत नाही. सर्व मराठा समाजच आपला पाहुणा आणि मायबाप आहे. मराठा आंदोलक म्हणून कुणाला नोटिसा देण्यात येत असतील तर ते चुकीचे आहे. मला बदनाम करण्यासाठी किंवा बोलणे बंद करण्यासाठी एखाद्या वेळेस हे षडयंत्र असू शकेल.

राज्यातील सहा कोटी मराठा समाज आपला पाहुणा आहे. समाजासाठी आपण कुटुंबालाही जवळ करती नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माहित आहे. इतर पाहुण्यांनाही जवळ सुद्धा उभे राहू देणार नाही. राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. एकीकडे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन द्यायचे आणि दुसरीकडे आंदोलकांना नोटिसा देण्याचे काम करायचे, असा आरोपही जरांगे यांनी सरकारवर केला.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला आ.संदीप क्षीरसागर आले धावून!

0

हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी तत्काळ मुदतवाढ द्यावी

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह पणन मंत्र्यांशी आ.संदीप क्षीरसागरांचा पत्रव्यवहार

नाफेडकडे नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा विचार करण्याची मागणी

बीड — बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऐनवेळी आ.संदीप क्षीरसागर धावून आले आहेत. मतदारसंघासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या खरेदीसाठी नाफेडकडे नावनोंदणी केली, मात्र मुदत संपल्यानंतर आता ही खरेदी कधी होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असून शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी तत्काळ मुदतवाढी द्यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पणण मंत्री जयकुमार रावल व राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे. याबाबत लेखी पत्रही आ.क्षीरसागर यांनी दिले आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अन् त्यांच्या संवादातून लक्षात आलेल्या समस्या लक्षात घेवून आ.संदीप क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांच्या भावना पत्र लिहून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यापयंत पोहचवल्या आहेत. हंगाम २०२४-२५ मधील हमीभावाने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्यास सर्व शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी होवू शकते याकडे लक्ष वेधत आ.संदीप क्षीरसागर यांनी याबाबतच्या पत्रात नमूद केले आहे की, केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या संदर्भीय धोरणानुसार सुरूवातीला दि.३१ जानेवारी २०२५ पर्यंत त्यानंतर दि.६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सोयाबीन खरेदीच्या बाबतीत मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील नोंदणीधारक शेतकरी ४४ हजार ७०० च्या वर आहेत. त्यापैकी दि.६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत किमान २१ हजार शेतकरी बांधवांककडून सोयाबीन खरेदी झालेली आहे.

बीड मतदार संघासह जिल्ह्यातील किमान ४० टक्क्याच्यावर शेतकरी बांधवांची खरेदी अजूनही शिल्लक आहे. त्यामुळेच या सर्व शेतकरी बांधवांच्या सोयाबीनची खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी व त्यातून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी महत्वाची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. निवेदनातच्या प्रती राज्याचे मुख्य सचिव व अवर सचिवांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आ.संदीप क्षीरसागर यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न राज्य शासनापर्यंत पोहचवले आहेत. आता शासनाकडून मुदतवाढीचा निर्णय कधी होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

शेतकऱ्यांना रेशन ऐवजी थेट पैसे, नवीन शासन निर्णयास मंजुरी

0

मुंबई — छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्न धान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता नवीन लेखाशिर्ष मंजूर करण्याबाबत शासन निर्णयास मंजुरी देण्यात आली आहे.

यानुसार संबंधित केशरी रेशनधारक शेतकऱ्यांना थेट पैसे मिळणार आहेत.
सदर योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी, २०२३ पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच विभागाच्या दि. 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देव असलेल्या रक्कमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील विपत्तीग्रस्त केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम दिली जात आहे. त्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट पैसे ट्रान्सफर केले जातात. या अनुषंगाने यंदाही या योजनेच्या लेखाशिर्षास मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान हे 14 जिल्हे एपीएल (केशरी) शेतकरी (डीबीटी) योजनेसाठी अनिवार्य ऐवजी कार्यक्रमांतर्गत लेखाशिर्ष प्रस्तावित करणेबाबत वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयास सूचित करण्यात आले आहे. त्यास अनुसरुन नवीन लेखाशिर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थीना संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्ज द्यावा लागतो व अर्जाचा नमुनादेखील तेथेच मिळतो. अर्जासोबत बैंक पासबुकच्या पहिल्या पानाची व रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत जोडावी लागत असल्याची माहिती आहे.

विष्णू चाटेसह सुदर्शन घुले चा मोबाईल डेटा रिकव्हर; वाल्मीक कराडवर खुनाचाच गुन्हा

0

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका दाखल झालेला आहे. मात्र त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला की नाही, याबाबत स्पष्टता नव्हती.धनंजय देशमुख यांनी यावर माध्यमांशी संवाद साधत सर्वच आरोपींवर खुनाचा गुन्हा आणि मकोका दाखल झाल्याचं सांगितलं.

धनंजय देशमुख यांनी शुक्रवारी 7 फेब्रुवारी रात्री सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दोन-तीन दिवसाला मी सीआयडी ऑफिसला येत असतो, आपल्याकडे काही माहिती असेल तर ती पुरवली जाते आणि तपासाबद्दल माहिती घेतली जाते. तपासाचा आढावा घेणं आपलं काम आहे. सीआयडीचे अनिल गुजर यांच्यासोबत चर्चा झाली.धनंजय देशमुख यांना विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेच्या मोबाईल डेटा संदर्भात विचारण्यात आलं, त्यावेळी ते म्हणाले, मोबाईलचा सर्व डेटा रिकव्हर झाला आहे, हा डेटा तपास यंत्रणांकडे आहे. विष्णू चाटेच्या मोबाईलचा डेटाही रिकव्हर केला आहे. तसेच सुदर्शन घुलेच्या मोबाईलचा डेटा पोलिसांना मिळाला आहे. काही गोष्टी गोपनीय आहेत, त्याची माहिती तपास यंत्रणा देत नाहीत. जोपर्यंत तपास पूर्ण होणार नाही, तोपर्यंत माहिती मिळणार नाही. तपासाला अडथळा नको म्हणून काही माहिती दिली जात नाही.वाल्मिक कराडवरील खुनाच्या गुन्ह्याबद्दल धनंजय देशमुख यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, तुम्ही रिमांड कॉपी बघितलं तर सगळं स्पष्ट होईल. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला, ही गोष्ट स्पष्ट आहे. 302 चं नवीन कलम 103 लागलं आहे. खुनाच्या गुन्ह्यातच मकोका लागलेला आहे. तसेच 120 ब कटकारस्थान रचल्याचं कलम लागलं आहे आणि मकोका; हे चार गुन्हे सर्व आरोपींवर लागलेले आहेत. यात कुठलाही आरोपी सुटलेला नाही.
दरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अद्याप थेटपणे देशमुख कुटुंबियांनी केलेली नाही. त्याबद्दल विचारलं असता, धनंजय देशमुख म्हणाले की, ज्यांनी आरोपींना पोसलंय, ज्यांनी पाठबळ दिलंय, ज्यांचे आरोपीसोबत संबंध आहेत, त्या सगळ्यांवर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांकडेही आम्ही तीच मागणी केलेली आहे. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आणि जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनीच या प्रकरणात आम्हाला न्याय द्यावा आणि ठोस पावलं उचलावीत. मागच्या सात तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांकडे हीच मागणी केली होती. आज महिना लोटला आहे. आमची त्यांना पुन्हा विनंती असून तपासामध्ये येणारा कुठलाही अडसर, याबाबत विचार करा आणि आम्हाला न्याय द्या.

डोळ्यात मिरची पूड टाकून कात्रीने छातीवर केले सपासप वार

0

बीड — तुझ्या भावाने माझ्यावर केस का केली?” असा जाब विचारत डोळ्यात मिरची पूड टाकून, केस कापण्याच्या कात्रीने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील लोणगाव येथे घडली.

या घटनेत अनिल आत्माराम गायके हा तरूण जखमी झाला त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहे.

अनिल आत्माराम गायके हा तरुण गावातील चौकातून घरी चालत जात असताना सोनकांबळे यांच्या किराणा दुकानासमोर असताना गावातीलच गोपाळ पांडुरंग राऊत याने पाठीमागून येऊन अडवले. “तुझा भाऊ ज्ञानेश्वर याने माझ्यावर केस का केली?”असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच हातातील फोन हिसकावून घेत मोबाइल जमिनीवरच फोडला. तसेच खिशातील मिरचीची पूड डोळ्यात टाकून कात्रीने त्याच्या छातीवर जोराने वार केले.
अनिल याने आरडाओरडा करताच त्याचा भाऊ ज्ञानेश्वर गायके पळत आला. मात्र त्याच्याही मानेवर राऊत याने कात्रीने वार केले. गावातील दोन तरुण रस्त्याने जात असताना ते भांडणाकडे धावल्याने गोपाळ राऊत तेथून पळून गेला. अनिल गायके याच्या तक्रारीवरून गोपाळ राऊत याच्या विरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगणवाडीतील खिचडीतून अकरा मुलांना विषबाधा

0

माजलगाव — तालुक्यातील टाकरवन जवळील फुलसिंग नगर तांडा येथे अंगणवाडीत शनिवारी सकाळच्या सुमारास खिचडी खाल्ल्याने 11 बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या बालकांवर माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

टाकरवन जवळ असलेल्या फुलसिंग नगर तांडा या ठिकाणी असलेल्या अंगणवाडीत 29 बालक असून त्यापैकी 7 बालके शनिवारी उपस्थित होते. या अंगणवाडीतील मुलांबरोबर शेजारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थी या ठिकाणी खिचडी खाण्यासाठी आले होते. खिचडी खाऊन ही मुलं आपापल्या घरी गेली. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास अंगणवाडीतील 7 तसेच जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या 4 मूलांना अचानक मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला.अंगणवाडी सेविका कविता राठोड यांनी सरपंच सुनील तर व उपसरपंच दयानंद बोबडे यांना याची माहिती दिली.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका पाठवून बालकांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सर्वांवर उपचार करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. घुबडे यांनी सांगितले.अंगणवाडीत शिकणारी श्रावणी नवनाथ राठोड वय 3 वर्ष, संध्या लखन राठोड वय 5 वर्ष पल्लवी अतुल राठोड वय 5 वर्ष, प्रीतम रवींद्र राठोड, देवांश अजय राठोड (वय 18 महिने रा. फुलसिंग तांडा त्याचबरोबर आर्यन परमेश्वर राठोड वय 4 वर्ष, आरव परमेश्वर राठोड वय 3 वर्ष रा. टाकरवन येथील बालके आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे अक्षर लहू चव्हाण, देवांश अजय राठोड वय 7 वर्ष रा. वारोळा, इशिता देविदास धनगाव वय 7 वर्ष, प्रथमेश दिलीप पवार वय 7 वर्ष व प्रांजल दिलीप पवार वय 8 वर्ष हे सर्व रा. फुलसिंग तांडा येथील रहिवासी आहेत.