बीड — जिद्द चिकाटी परिश्रमाच्या जोरावर पालात राहणाऱ्या आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील तरुणाने बहरिन येथे झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत 60 किलो गटात सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. सुवर्ण वेध घेणाऱ्या या मुलाचं नाव सनी फुलमाळी असं आहे. त्याच्या जीवन संघर्षाची कहाणीही आशियाई युवा स्पर्धेत झालेल्या कुस्ती इतकीच रोमहर्षक आहे.
सनी फुलमाळीचा परिवार आष्टीच्या पाटसरा गावातून पोट भरण्यासाठी पुणे या ठिकाणी गेला. गेल्या 15 वर्षापासून लोहगाव परिसरात एका झोपडीत वास्तव्य सुरू झालं. सनीच्या वडील सुभाष फुलमाळी यांना नंदीबैल घेऊन भविष्य सांगाव लागतं,तर आईला सुई-दाभण विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो.अशी खडतर परिस्थिती असतानाही सनीने ध्येय निश्चित करत परिस्थिती पुढे हार मानली नाही. आजोबा आणि वडिलांनाही कुस्तीची आवड होती, पण आर्थिक अडचणींमुळे ती थांबवावी लागली. वडिलांचे स्वप्न होते की मुलांनी पैलवान व्हावे. त्यांनी आपल्या तिन्ही मुल भैय्या, बादल आणि सनी यांना स्वतः प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. पैशांअभावी वडिलांनी झोपडी जवळच्या माळरानावर तात्पुरती मातीची तालीम उभारली आणि मुलांचा सराव सुरू केला. सध्या दहावीत शिकणाऱ्या सनीने महाराष्ट्र चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद आणि राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. आता आशियाई युवा स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेत देशाचा गौरव वाढवला आहे.
शेवटी इच्छा तिथे मार्ग सापडतोच याची प्रचिती ही आली सनीच्या जिद्दीला योग्य मार्गदर्शन मिळाले रायबा तालीमचे वस्ताद पै. सोमनाथ मोझे आणि सदाशिव राखपसरे यांनी त्याला सुरुवातीला मार्गदर्शन केले. पुढे लोणीकंद येथील जाणता राजा तालीममध्ये वस्ताद संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सनी परिपक्व झाला. वस्ताद भोंडवे यांनी सनीला दत्तक घेऊन त्याचा कुस्तीचा सर्व खर्च उचलला मागील आठ वर्षापासुन ते सर्व खर्च करीत आले. एकीकडे दररोजचा सराव सुरू होता. तर दुसर्या बाजूला आई वडिलांचे कष्ट दिसत होते. कुस्ती क्षेत्रामध्ये नाव कमवायचे हाच उद्देश डोळ्यासमोर होता. त्यानुसार दररोज सराव सुरू ठेवला. तर दुसर्या बाजूला शिक्षण देखील सुरू ठेवले. एकामागून एक स्पर्धां जिंकत गेल्यानंतर त्यांची बहरीन येथे होणार्या एशियन युथ गेमसाठी निवड झाली. बहरीन येथे झालेल्या एशियन स्पर्धेत इराक, इरान, जपान, कोरिया आदी देशातील खेळाडू सोबत कुस्ती केली. इराणच्या पैलवानासोबत कुस्ती झाली आणि ती कुस्ती जिंकली आणि सुवर्णपदक जिंकले.
पालातल्या आष्टीच्या सनी फुलमाळीने बहरीन मधील कुस्तीत घेतला सुवर्णवेध
स्वहितापेक्षा शेतकर्यांचे हित महत्त्वाचे- आ.संदीप क्षीरसागर
गजानन सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा संत-महंतांच्या हस्ते शुभारंभ
बीड – गजानन सहकारी साखर कारखान्याच्या, सन २०२५-२६ चा मोळीपूजन आणि गळीत हंगामाचा रविवारी (दि.९) रोजी शुभारंभ झाला. यावेळी, स्वहितापेक्षा शेतकऱ्यांचे हित साधणे महत्वाचे असून हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून १० वर्षांपासून बंद असलेला गजानन सहकारी साखर कारखाना अथक प्रयत्नांनी सुरू केला. परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी मी आणि गजानन साखर कारखाना कायम कटिबद्ध असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

श्री. गजानन सहकारी साखर कारखानाच्या मोळीपूजन व गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि.९) रोजी संत-महंतांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडला. याप्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प.शिवाजी महाराज, मंगलमूर्ती देवस्थान येथील ह.भ.प.अमृताश्रमजी महाराज, श्रीक्षेत्र ढेकळे महाराज संस्थान बेलखंडी पाटोदा येथील ह.भ.प. भक्तीदास महाराज, साधकाश्रम तिप्पटवाडी येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज आदी संत-महंत उपस्थित होते. यासोबतच माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह अनेक मान्यवर आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीड : वसुली कर्मचारी अविनाश धांडे यांचा मृतदेह न प इमारतीवर आढळला
बीड — नगरपालिकेच्या वसुली विभागात काम करणारे अविनाश धांडे यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आज सकाळी आढळून आला. ही घटना न.प.च्या इमारतीवर घडल्याने खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळच्या सुमारास काही कर्मचारी कामासाठी इमारतीत आले असता त्यांनी छतावर एका शिडीला लटकलेला मृतदेह पाहिला. तात्काळ ही माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच नगरपरिषद परिसरात मोठी गर्दी झाली. यावेळी पोलिसांनी इमारतीच्या छतावर कोणालाही प्रवेश न देण्याचे आदेश दिले. अविनाश धांडे हे नगर परिषदेच्या वसुली विभागात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. मात्र त्यांनी आत्महत्या का केली अथवा त्यांची हत्या झाली याबाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या घटनेमुळे नगरपरिषदेतील कर्मचारी वर्गात खळबळ माजली आहे. अविनाश धांडेच्या घटनेने संपूर्ण बीड शहरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
जमीन घोटाळ्यात “पार्थ”तर टॅंगो दारूत “जय”पवारांचा भ्रष्टाचारात दस नंबरी बाप “अजित” च ?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
मुंबई –उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीने 1800 कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप झाला आहे.आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या दुसरा मुलगा जय पवारवर टँगो दारू कंपनीशी संबंधित भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत आरोप करताना म्हणाले की, अजित पवार स्वतःची संपत्ती लपवण्यासाठी आणि तुरुंगवास टाळण्यासाठी भाजपात गेले आहेत. पण पक्ष बदलल्यानंतरही त्यांचे कारनामे सुरूच आहेत. दोन्ही मुलांना ते नंबर दोनचे धंदे करायला लावतात आणि स्वतः दस नंबरी बनून उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची घट्ट पकडून बसले आहेत. सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांच्या एका मुलाचे नाव भ्रष्टाचारात आलंय, तर दुसऱ्याचा दारू व्यवसायात. त्यांच्या एका मुलाची कंपनी पुण्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारात अडकली आहे, तर दुसऱ्याची टँगो नावाची दारू कंपनी आहे, ज्याला अजित पवार यांनी अबकारी मंत्री म्हणून निर्णय घेत संरक्षण दिलं, असा आरोप त्यांनी केला.
सपकाळ म्हणाले की, टँगो कंपनीला थेट फायदा मिळावा म्हणून अजित पवारांनी अबकारी खातं आपल्या ताब्यात ठेवलं आहे. या खात्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय ते स्वतः घेतात, ज्यामुळे टँगोला आर्थिक लाभ मिळतो. त्यामुळे राज्यात डबल गेम, डबल भ्रष्टाचार सुरू आहे. एकीकडे जमिनीचे व्यवहार, तर दुसरीकडे दारू कंपनीला मिळालेलं संरक्षण, हा डबल धमाकाच आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. त्यांनी अजित पवार यांना भस्म्या आजार झाला असल्याचं सांगत म्हटलं की, हा असा आजार आहे की कितीही खाल्लं तरी अजून खावंसं वाटतं. आधीच एवढं खाल्लंय, तरी अजून किती खाणार?
दरम्यान, पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन खरेदी प्रकरणानंतर विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, मुलगा पुण्यात 300 कोटी रुपयांचा व्यवहार करतो आणि वडिलांना काहीच माहिती नसते, हे कसं शक्य आहे? बाजारभावापेक्षा कमी दरात जमीन विकत घेतली गेली आहे, त्यामुळे या प्रकरणात चौकशी आवश्यक आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, खडसेंच्या काळात असाच आरोप झाला होता, आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मग अजित पवारांनीही नैतिकतेचा आधार घेत राजीनामा द्यावा. कोरेगाव पार्क प्रकरणात न्यायमूर्ती झोटिंग समितीप्रमाणे चौकशी समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमावी, अशी मागणी त्यांनी केली.
मनोज जरांगे यांना धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नको आहे – धनंजय मुंडे
परळी — मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपल्यावर माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्यामार्फत घातपात केला जात असल्याचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यास प्रत्युत्तर देत थेट आरोप करणारे जरांगे, आरोपी आणि माझी स्वतःची देखील थेट सीबीआय मार्फत चौकशी केली जावी, त्याचबरोबर अशा प्रकारच्या आरोपांची सत्यता पडताळून सत्य महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर यावे यासाठी ब्रेन मॅपिंग व नार्को टेस्ट करावी, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे.
मनोज जरांगे यांनी जे आरोपी म्हणून पुढे केले आहेत, ते त्यांचेच अनेक वर्ष जुने सहकारी आहेत. त्यातल्या एकावर मागील वर्षी एप्रिल महिन्यात हल्ला झाला तेव्हा जरांगेंनी त्याला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती, म्हणजे आपलेच जवळचे लोक पाठवायचे त्यांना कुणाच्या तरी मार्फत ओळख करून घ्यायला लावायचे, काहीतरी फेक रेकॉर्ड वगैरे बनवायचे आणि आरोप करून खळबळ उडवून एखाद्याची प्राणांतिक बदनामी करायची, हा कावा आता ओळखला आहे, त्यामुळे जरांगे यांनी केलेले आरोप म्हणजे निव्वळ थोतांडगिरी आहे असाही प्रत्यारोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
मी मागील 30 वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणामध्ये सक्रिय आहे. माझ्या समाजापेक्षा मराठा समाजात माझे मित्र व सहकारी जास्त आहेत, पहिल्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रत्येक लढ्यात मी बरोबरीने सहभाग घेतला. मात्र प्रथमच ओबीसी महा एल्गार मेळाव्यातून मी इडब्लूएस आरक्षण कसे अधिक फायद्याचे आहे यावरून बोललो तसेच ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या बाबतीत बोललो, तेव्हापासून मला कामापेक्षा जास्त टार्गेट केले जात आहे. ओबीसींच्या न्यायाची आणि गरजू व गरीब मराठा विद्यार्थ्यांची वैचारिक बाजु मांडली म्हणून मला संपवायला निघालेत, असा थेट आरोप धनंजय मुंडे यांनी केला
छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला गावगाडा, सामाजिक विन विस्कटनार नाही यासाठी अनेकवेळा आरोप होऊन देखील मी गप्प राहिलो, जरांगे यांना सरकारचा प्रतिनिधी म्हणून दोनदा भेटलो, पण कधीच त्यांना कुठे विरोध केला नाही, विरोध हा केवळ आरक्षणाच्या विचारापुरता मर्यादित होता मात्र मनोज जरंगे या व्यक्तीला धनंजय मुंडे हा व्यक्ती पृथ्वीतलावर जिवंत नको आहे असे वाटते असे धक्कादायक विधान धनंजय मुंडे यांनी केले. त्याचबरोबर मनोज जरांगे आणि त्यांच्या वाळू माफिया टोळी कडून आपल्याही जीवाला धोका असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले.
मनोज जरांगे यांना काही नेत्यांनी झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी केली आहे, मी तर या पत्रकार परिषद व्दारे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याबरोबरच देशातील सर्वात सेफ समजली जाणारी एसपीजी सुरक्षा जरांगेना द्यावी, अशी मागणी सरकारकडे करतो, राहिला विषय मला संपवायचा तर इथल्या मातीतील लोकांच्या पदरी माझ्या आई वडिलांनी मला वाहिलेले आहे, त्यामुळे लोकांच्या मध्ये राहून माझा जीव गेला तरी मला फरक पडत नाही, असे भावनिक विधान धनंजय मुंडे यांनी केले आहे.
दरम्यान तुमचेच लोक प्लॅन करून पाठवून त्यांनी ओळखी करायच्या काहीतरी कामे सांगायची, गाड्या तर मला अनेकजण मागतात, अनेक आंदोलने झाली तेव्हा मी अनेकांना गाड्यांची व्यवस्था करून दिली आहे, त्याचा अर्थ जीव घेण्याची प्लॅनिंग? म्हणजे निव्वळ थोतांडगिरी आहे, असे सांगताना आजकाल ए आई तंत्रज्ञानाने काहीही बनावट केले जाते, त्यामुळे काही बनावट रेकॉर्डिंग, व्हिडीओ किंवा काही तयार करून माझ्यावर एका समाजाकडून हल्ले घडवून आणण्याचा व मला संपवण्याचा हा कट असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आता या प्रकरणातील संपूर्ण सत्य बाहेर यावे, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि बसुही देणार नाही, असेही धनंजय मुंडे यांनी ठासून सांगितले.
यावेळी माजी आ. संजय भाऊ दौंड, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, युवक नेते अजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस परळीचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे, परळीचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शकील कुरेशी, सूर्यभान नाना मुंडे, पिंटू मुंडे, प्रा. मधुकर आगाव, विनोद जगतकर, राजाभाऊ पोळ, लक्ष्मण पोळ, अय्युब भाई, माणिक भाऊ फड, अनंत इंगळे यांसह पदाधिकारी आदी उपस्थित होते.
नवी गाडी नाही जुनी गाडी देऊ शकतो… !;जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंची ऑडिओ क्लिपच ऐकवली
जालना — मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच वृत्त समोर आलं होतं जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही याला उत्तर देत हे आरोप फेटाळले होते. त्यानंतर आता पुन्हा मनोज जरांगे पाटलांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली आहे.तसेच ब्रेन मॅपिंग, सीबीआय चौकशी, नार्को टेस्ट करायला मी तयार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं.
जरांगे पाटलांनी ऑडिओ क्लिप ऐकवली
मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीला दोन अटक करण्यात आलेल्या आरोपींची ऑडिओ क्लिप ऐकवली, नंतर त्यांनी धनंजय मुंडे आणि आणखी एका आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली. या ऑडिओ क्लिपमध्ये आरोपी म्हणतो की, साहेब तुम्ही आले का परळीला? धनंजय मुंडे म्हणतात, नाही, अजून पुण्याला आहे, गरबड करू नका. आरोपी विचारतो, गाडीचं काय झालं यावर धनंजय मुंडे म्हणतात की, मी आता नवीन गाडी देऊ शकत नाही, जुनी गाडी देऊ शकतो.
माझ्या अंगावर गाडी घालायची होती
ही ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर गाडीचं काय प्रकरण आहे असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडेंना ही गाडी आमच्या ताफ्यात द्यायची होती. त्यानंतर ती गाडी आमच्या अंगावर घालायची होती. हा तो प्रकार आहे. ही क्लिप खोटी असं धनंजय मुंडेंचं म्हणणं असेल तर सीडीआर काढण्यात यावा. कोण कुठं होतं, कोण कुणाला भेटलं? जे दोघेजण सध्या अटक आहेत ते कुठे भेटले? त्यावेळेसचे लोकेशन काढा. सगळं समोर येईल, तुमचं आणि माझं वैर नाही. भाषणा पर्यंत ठीक आहे, पण तुम्ही माझ्या मुळावरचं लोकं उठवले.
मी सगळ्या गोष्टींना तयार
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मी सगळ्या गोष्टीला तयार आहे. असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी, धर्मासाठी घातक आहे. त्याच्यावरील संकट टाळण्यासाठी आता ओबीसी ला ओढणार का? अजित दादा असे लोक पाळणार का? अजित दादांना सुद्धा शॉक बसला असेल. फडणवीस साहेबाला आता याचा छडा लावावा लागणार आहे, शिंदे साहेबाला सुद्धा लक्ष घालावं लागणार आहे. मराठा समाजाला सांगतो, मी सगळं व्यवस्थित करतो तुम्ही फक्त शांत रहा, मला तुम्हाला मोठं करू द्या. असा आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
जरांगेंनी धनंजय मुंडे च नाव घेत माजवली होती खळबळ
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत दावा केला की, मुंडेंनी त्यांच्या हत्येचा कट रचला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, हा कट रचण्यासाठी प्रथम खोटे रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात यश न मिळाल्याने, हत्येचा कट रचण्यात आला आणि नंतर औषध किंवा गोळ्या देऊन घातपात करण्याचा विचार झाला.मनोज जरांगे पाटील यांनी या कटात बीड जिल्ह्यातील एका कार्यकर्त्याचा किंवा पीएचा समावेश असल्याचा उल्लेख केला, ज्याने काही आरोपींना परळी येथील एका रेस्ट हाऊसमध्ये धनंजय मुंडेंकडे नेले. तिथे ही बैठक भाऊबीजेच्या दिवशी झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. या कथित कटामध्ये एकूण १० ते ११ जणांचा समावेश असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन करत, या प्रकरणाचा मुळापासून तपास करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी तपास यंत्रणांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आवाहन केले होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधीची किंमत असणारी व्हेल माशाची उलटी बीडमध्ये जप्त
सव्वा किलो उलटी किंमत आहे सव्वा कोटी; बीड मध्ये पहिल्यांदाच अशी कारवाई
बीड — आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यापेक्षाही जास्त किंमत असलेल्या व्हेल माशाची उलटी ची तस्करी करणाऱ्या दोन जणांना उलटी सह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले. या कारवाईत सव्वा कोटी ची उलटी जप्त करण्यात आली. ही बीड जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे.
व्हेल माशाची उलटी ची तस्करी होणार असल्याची माहिती सपोनी बाळराजे दराडे यांना त्यांच्या खबऱ्यांकडून मिळाली. ही खळबळ जनक खबर मिळताच पोलीस अधीक्षकांशी त्यांनी संपर्क साधून माहिती सांगितली. पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश शिवाजीनगर पोलिसांना दिले. बाळराजे दराडे यांनी खबऱ्या मार्फत लक्ष ठेवले. त्यानुसार च-हाटा फाट्यावरून तस्कर कार मधून बीड शहरात येत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार एका हॉटेलजवळ शैलेश प्रभाकर शिंदे वय- 38 वर्ष,रा .हवेली, पुणे व विकास भीमराव मुळे वय-30 वर्ष रा. शिखरवाडी, ता. पाटोदा या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी या दोघांकडून सव्वा किलोच्या घरात उलटी जप्त केली आहे. ज्याची किंमत 1 कोटी 21 लाख 50 हजार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या उलटी ची तपासणी करण्यात येतं असून पोलिसांना ही उलटी व्हेलं माशाचीच असल्याचा संशय आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवाजीनगर पोलिसांना व्हेलं सारख्या तस्करीत मोठी कारवाई करण्याची संधी मिळाली आहे. पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक एम. एस. सोन्ने, रवी आघाव आदींनी केली आहे.
व्हेल माशाची उलटी काय असते?
व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो.
शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक भाषेत याला अॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. स्पर्म व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असून हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. व्हेलचे आवडतं खाद्य म्हणजे, म्हाकुळ होय. म्हाकुळचा तोंडाचा भाग पोपटाच्या चोचीसारखा असतो. तो पचन नाही. तसेच व्हेल कोळंबी खातो. ज्याचा भाग कडक असल्यामुळे तो पचत नाही. न पचलेला भाग व्हेल उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायनेही असतात. उलटी लाटांवर तरगंत राहिल्यामुळे आपसूक त्यावर प्रक्रिया होते आणि ती मेणासारखी बनते. समुद्राच्या लाटाबरोबर ती तरंगत किनार्याला लागत असल्याचं अभ्यासक सांगतात.
एम्बरग्रीसच्या व्यापारावरील कायदेशीर निर्बंध
भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये व्हेल माशाच्या उलटीच्या व्यापारावर बंदी आहे, कारण स्पर्म व्हेल एक संरक्षित प्रजाती आहे.
त्यामुळेच एम्बरग्रीसची तस्करी केली जाते आणि अनेकदा पोलिस किंवा इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडून त्याची जप्ती होते.
अजित दादांचा पोरगा ही घोटाळेबाज निघाला
पार्थ पवारांकडून अठराशे कोटींची जमीन 300 कोटींना 500 रुपयांच्या मुद्रांक शुल्कात खरेदी?
मुंबई –उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केला आहे. पार्थ पवारांनी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 1800 कोटींच्या जमिनीच्या व्यवहारात मोठा गैरव्यवहार केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या व्यवहारात पार्थ पवारांच्या कंपनीने फक्त 300 कोटींमध्ये जमीन विकत घेतल्याचा, तसेच केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क (स्टँप ड्युटी) भरल्याचा दावा दानवेंनी केला आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे डील 300 कोटीचे दाखवून, त्यावरचे 21 कोटी देखील माफ… ही माफी फुकट नव्हती का?, असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, मेवाभाऊंच्या राज्यात… 1800 कोटींची जमीन, 300 कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये! उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं.
गंमत तर पुढे आहे.. एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल!
अवघ्या 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ
दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या 48 तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे 27 दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या 40 एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये 500! फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र, असे म्हणत अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांवर गंभीर आरोप केला आहे.
11 वर्षीय मुलीने हिमतीने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून करून घेतली सुटका
केज — तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची मालिका सुरू झाली असून वडिलांना शेतात जेवण देऊन घरी परतणाऱ्या अकरा वर्षीय मुलीचं दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं. मात्र या मुलीने हिम्मत दाखवल्याने तिला रस्त्यातच सोडून अपहरण कर्त्यांना पळून जावं लागलं. ही घटना जीवाची वाडी येथे घडली
जीवाचीवाडी येथील ११ वर्षीय मुलगी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारात शेतात वडिलांना जेवण देऊन पायी घराकडे परत येत होती. रस्त्यात तिला एकटी जात असल्याचे पाहून दुचाकीवरून आलेल्या अनोळखी इसमाने तिला अडवले. “तुझ्या वडिलांकडे माझे पैसे आहेत, मला त्यांना भेटायचे आहे,” असे खोटे सांगून मुलीला विश्वासात घेतले. या निष्पाप मुलीने त्याला वडिल असलेल्या शेतात घेऊन जाण्याचे कबूल केले. याच संधीचा फायदा घेऊन त्या विकृत व्यक्तीने मुलीच्या नाकासमोर पावडरचा वास देऊन तिचे तोंड दाबले आणि तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून तिला अपहरण कर्त्याने जीवाची वाडी येथून केजच्या दिशेने घेऊन निघाला. सुमारे २५ किमी प्रवासानंतर, केज जवळ असलेल्या कानडी रोड लगतच्या वीटभट्टीजवळ आल्यावर या हिंमतवान मुलीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मुलगी ओरडत असल्याचे पाहताच, घाबरलेल्या अपहरणकर्त्याने तिला रस्त्यातच सोडून दुचाकीवरून पोबारा केला. अपहरण कर्त्याच्या तावडीतून आरडा ओरडा केल्यामुळे सुटलेली मुलगी पायी चालत केज बस स्थानकावर पोहोचली. तिथे तिची भेट एका नातेवाईक महिलेशी झाली. त्यांनी तातडीने मुलीच्या वडिलांना फोन करून माहिती दिली. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अज्ञात अपहरण कर्त्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी लहूरी आणि कानडीमाळी मार्गे केजला आल्यामुळे येवता चौक, लहूरी आणि कानडीमाळी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचा दुचाकी नंबर व ते कैद झाले असून त्या आधारे आरोपीला लवकरच जेरबंद करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
मनोज जरांगेंना संपवण्याचा कट उघड; बीडच्या मोठ्या नेत्याचा हात
जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन पुरावे देणार
जालना — मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या हत्येचा एक गंभीर आणि धक्कादायक कट उघडकीस आला आहे. या कटाच्या तक्रारीनंतर जालना पोलिसांनी तातडीने कारवाई करत बीडमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.जरांगे यांना जीवे मारण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
बीड येथील एका कार्यकर्त्याने यासंदर्भात जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतलेल्यांमध्ये दादा गरुड आणि जरांगेंचाच पूर्वीचा सहकारी अमोल खुणे यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बीड शहरात कट रचण्यासाठी गुप्त बैठका झाल्या होत्या, ज्यात एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव समोर आल्याचे सूत्रांकडून कळते.मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. गंगाधर काळकुटे स्वतः बीड पोलिस अधीक्षकांना भेटून निवेदन देणार आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी या कटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “हा कट खूप मोठ्या व्यक्तीने रचला आहे,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले, “हे सत्य आहे. लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.” जरांगे पाटलांनी कट रचणाऱ्यांना ‘तू खूप चुकीच्या ठिकाणी हात घातलास’ असा इशारा दिला आहे.
ते उद्या (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजता या संदर्भात सविस्तर पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती आणि पुरावे सादर करणार आहेत. जरांगेंच्या या गौप्यस्फोटाने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.











