Home Blog Page 75

ऊसाला 4 हजार रुपये भाव द्या बीडमध्ये शेतकरी संघटना आक्रमक

0

24 नोव्हेंबर पासून बेमुदत चक्काजाम

बीड — पश्चिम महाराष्ट्रानंतर बीड जिल्ह्यातही ऊस दरवाढ करावी यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून 24 नोव्हेंबर पासून बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 4000 रुपये प्रति टन असा भाव देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
माजलगाव येथील बाजार समितीत जिल्हाभरातील सर्व शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांची व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी आंदोलनातील विविध टप्प्यांचा आढावा घेण्यात आला.याबाबत शेतकरी नेते अजित नवले म्हणाले की, साखर उतारा हाच अंतिम ऊस दराचा निकष न राहाता रेव्हन्यू शेअरिंग फॉर्मुल्यानुसार साखर उताऱ्यासाठी 70:30 व इतर उपपदार्थावर 75:25 हा शेतकरी व कारखानदारांचा वाटा लक्षात घेऊन उसाला किमान चार हजार रुपये अंतिम ऊस दर मिळायलाच हवा. अशी मागणी करण्यात आली आहे. साखर संचालकांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची गंभीर दखल न घेतल्यास 24 नोव्हेंबर पासून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाची व्याप्ती पूर्ण जिल्हाभर करण्यात येणार असून महसूल प्रशासन, साखर कारखानदार, साखर संचालक यांनी सकारात्मक पहावं अन्यथा उग्र आंदोलन करण्यासाठी शेतकरी कारखान्यावर चालून जाणार असल्याचं शेतकरी संघटनांनी सांगितला आहे.या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट, ॲड. अजय बुरांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ॲड. ढगे, युवा शेतकरी संघर्ष समितीचे अजय राऊत, जगदीश फडताळे उतरणार आहेत.

अधिकाऱ्यांना गोठ्यातलं शेण ही पुरेना; हजार रुपयाची लाच घेताना अभियंता पकडला

0

बीड — गाय गोठ्याची फाईल करण्यासाठी गेवराई पंचायत समितीतील अभियंत्याने शेतकऱ्याकडे हजार रुपयाची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या अभियंत्यास जाळ्यात पकडले. विनायक राठोड असं या लाचखोर  अभियंत्याचं नाव आहे.
अधिकाऱ्यांनी किती खालचा दर्जा गाठला आहे याचं उदाहरण पुढे आला आहे.विनायक राठोड या अभियंत्याने बुधवार दि. 19 नोव्हेंबर रोजी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्याच्या बीड शहरातील अंबिका चौकातील एका प्रायव्हेट कार्यालयात केली होती. संबंधीत तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीडच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची खात्री पटल्यानंतर एसीबीने त्याच्याविरोधात सापळा लावला. परंतु राठोडला संशय आल्यानंतर त्यानं तक्रारदाराला टाळायला सुरूवात केली. मात्र लाचेची मागणी केल्यावरून विनायक राठोड यास एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी सोपान चित्तमपल्ले यांनी शनिवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक, पती-पत्नीसह दोन मुली जखमी

0

बीड — उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा परभणीवरून धारूर मार्गे केज कडे जात असताना ताफ्यातील वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये एकाच कुटुंबातील चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना धुनकवड फाट्याजवळ घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उपमुख्यमंत्री अजित पवार धारूरवरून केजकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाडी क्र. MH 02 GH 5732 या गाडीच्या चालकाने धूनकवड फाटा परिसरात निष्काळजी पण एक गाडी चालवत दुचाकी स्वाराला जोराची धडक दिली. ताफा मार्गक्रमण करत असताना दुचाकीला धडक बसल्याने मोटार सायकल स्वारासह त्याची पत्नी व दोन मुली गंभीररित्या जखमी झाल्या.भोगलवाडी येथील विष्णू सुदे यांच्या दुचाकी क्र. MH 44 V 1518 ला ही धडक बसली.अपघात एवढा जबरदस्त होता की दुचाकी चुरुडा झाली आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून सर्व जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.या भीषण अपघातात विष्णू सुदे त्यांची पत्नी कुसुम सुदे त्यांच्या दोन लहान मुली हे गंभीर जखमी झाले मात्र,दोघांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

केज मध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण; कॉफी शॉप मध्ये नेऊन केला अत्याचार

0

केज — केज मध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसून येत आहे. दररोज घडणाऱ्या घटनांनी खळबळ माजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान केज मध्ये तरुणाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला कॉफी शॉप मध्ये घेऊन गेला. या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना केज शहरात घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तरुणाने २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एका चौदा वर्षीय मुलीचे अपहरण केले. यानंतर शहरातील एका कॉफी शॉपमध्ये घेवून जात तिच्यावर अत्याचार केले.
दरम्यान, हा प्रकार कुटूंबीयांना समाजताच त्यांनी तातडीने केज पोलीस ठाण्यात धाव घेवून घडलेला प्रकार सांगितला. केज पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तसेच या प्रकरणाचा आधीक तपास केज पोलीस करत आहे. मात्र या घटनेनंतर पोलिसांनी केज शहरातील कॉफी शॉपवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे.

महावितरण: मद्यधुंद ऑपरेटरचे महिला अभियंत्याशी गैरवर्तन, गुन्हा दाखल

0

केज — महावितरणच्या महिला अभियंत्यासोबत मद्यधुंद ऑपरेटरने हुज्जत घालून गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कानडी माळी येथील उपकेंद्रात घडली. तपासणीसाठी ही महिला अभियंता या ठिकाणी गेली होती.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता सौ. शीतल वाजेद अली सय्यद या 14 नोव्हेंबर रोजी रोजी रात्री 10.45 वा. च्या सुमारास कानडी माळी येथे महावितरण उपकेंद्र तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी तेथे कर्तव्यावर असलेले ऑपरेटर शंकर ठोंबरे वय 46 वर्षे यांनी त्यांच्या अधिकारी तथा कनिष्ठ अभियंता सौ. शितल सय्यद या महिला अधिकाऱ्या सोबत विनाकारण विनाआवश्यक गोष्टींसाठी वाद घालून जोरजोरात ओरडू लागले. ऑपरेटरने दारू पिल्याचा वास येवू लागला. त्यामुळे श्रीमती सय्यद यांनी त्यांना दारू पिले आहात का ? असे विचारले असता ते मला म्हणाले की, मी दारू पिलेलो नाही. त्यांना दारू पिण्याच्या संशया वरून वैद्यकीय तपासणी करून घेण्याबाबत सांगितले असता वैद्यकीय तपासणी करण्यास त्यांनी विरोध केला. ही माहिती कनिष्ठ अभियंता शितल सय्यद यांनी त्यांचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता यांना दिली.त्या नंतर दि.15 नोव्हेंबर रोजी शंकर ठोंबरे यांना दारु पिल्याच्या संशयावरुन वैद्यकीय तपासणीचे पत्र दिले. त्यांचे उपजिल्हा रुग्णालय केज येथे रक्त नमुने घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणी अहवाल 20 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला. त्या अहवालानुसार ते नशेच्या अमंलाखाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्या नुसार सय्यद यांनी केज पोलिस ठाण्यात शंकर ठोंबरे यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारी नुसार त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाचे कलम 85 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकऱ्यात जास्त प्रमाण असताना मराठा आरक्षणाची गरज काय? उच्च न्यायालयाची पुढील सुनावणी 11 डिसेंबरला

0

मुंबई — मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) अंतर्गत दिलेल्या 10 टक्के आरक्षणाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांनी कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद केला.जर शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील मुलांचे प्रमाण अधिक असेल तर मग त्यांना आरक्षणाची गरज काय? असा सवाल याचिकाकर्त्यांच्या वकिलाने केला. त्यांचा हा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता होईल, असे सांगितले
या याचिकेवरील सुनावणीवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती एन.जे. जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांनी मराठा आरक्षणाला विरोध करताना प्रामुख्याने मागासलेपणाचे निकष आणि आरक्षणाची आवश्यकता यावर लक्ष केंद्रित केले. यावेळी प्रदीप संचेती यांनी आकडेवारीचा दाखला कोर्टाला दिला. मराठा समाज स्वतःला मागास समजत असला तरी, शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या अधिक आहे. आरक्षणाची गरज कशासाठी आहे? तर ती मुख्यतः नोकऱ्यांसाठी आहे. जर मराठा समाजातील मुलांकडे नोकऱ्यांचे प्रमाण अधिक असेल, तर मग त्यांना आरक्षणाची गरज कशासाठी आहे?” असा थेट सवाल संचेती यांनी उपस्थित केला.
यानंतर संचेती यांनी जयश्री पाटील यांच्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करताना दिलेल्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे कोर्टासमोर वाचून दाखवले. त्यांनी जयश्री पाटील यांच्या याचिकेत मांडलेला महत्त्वपूर्ण मुद्दा पुन्हा अधोरेखित केला. “स्वत:ला स्वतःच एखादा समाज मागास ठरवू शकत नाही.” असे संचेती यांनी म्हटले.या युक्तिवादातून, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे इंदिरा साहनी निकालाने निर्धारित केलेल्या 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन करणारे आहे आणि मराठा समाज सामाजिक-शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करणारे ‘असाधारण व अपवादात्मक परिस्थितीचे’ निकष पूर्ण करत नाही, यावर भर दिला. याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता पुढील सुनावणीत राज्य सरकार आणि आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या याचिकाकर्त्यांचे वकील आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे.

चिमुकली अत्याचार प्रकरण : मालेगावात जनतेच्या संतापाचा कडेलोट आंदोलकांनी कोर्टाचं गेट तोडलं

0

मालेगाव — डोंगराळे गावातील तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या नराधम विजय खैरणार विरोधात मालेगावकरांचा संताप उसळून आला.मालेगाव मध्ये आज कडकडीत बंद पाळत मोर्चा काढला होता. मोर्चेकर्‍यांनी मालेगाव कोर्टाचे गेट तोडून कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केल्याने तणाव वाढला होता.

संशयित आरोपी विजय खैरणार याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांना कळताच आक्रमक आंदोलकांनी कोर्टाचे गेट तोडून थेट कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला. कोर्टाचे गेट तोडून आंदोलक आतमध्ये शिरले. यावेळी पोलिसांना सौम्य स्वरुपाचा लाठीचार्ज करावा लागला.

राज्यभरात या घटनेमुळे संतापाची लाट आहे. मालेगावकरांनी आज या घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक दिली होती. आरोपीला तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. संतप्त आंदोलक गेट तोडून कोर्टात घुसल्याने मालेगाव कोर्ट परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
मालेगावपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळे गावात गेल्या रविवारी ३ वर्षाच्या चिमुरीडीवर अत्याचार करुन हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणात विजय खैरणार या २४ वर्षीय संशयिताला पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. न्यायालयाने सुरुवातीला त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्याने त्याला शुक्रवारी दि.२१ मालेगाव येथील अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होतं.

परंतु नागरिकांना यासंदर्भात कुणकुण लागताच नागरिकांचा मोर्चा कोर्टाकडे वळाला. न्यायालय परिसरात जमलेला मोठा जनसागर व त्यांच्या संतप्त भावनांचा अंदाज घेऊन पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आरोपीला कोर्टात आणलच नाही. पोलिसांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आरोपीला न्यायालयापुढे हजर केलं.पण तोपर्यंत आंदोलकांच्या संतापाचा कडेलोट झाला होता. या आंदोलनात महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग दिसला. महिला आणि तरुणांनी कोर्टाचे गेट तोडत आत धाव घेतली. त्यामुळे कोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली.

आमदार आणि खासदारांशी सौजन्याने वागा.!अधिकाऱ्यांना सरकारचे निर्देश

0

मुंबई — आमदार आणि खासदारांशी अत्यंत आदराने आणि सौजन्याने वागण्याचे निर्देश आराध्या सरकारने सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. अधिकाऱ्यांना त्यांच्या पत्रव्यवहाराचे दोन महिन्यांच्या आत उत्तर देण्यास आणि दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेण्यास, तसेच त्यांना प्रमुख सरकारी कार्यक्रमांना आमंत्रित करण्यास सांगितले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने सर्व राज्य विभाग, निमसरकारी कार्यालये आणि सरकार नियंत्रित संस्थांना निर्देश जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांना विधानसभेचे आमदार आणि खासदारांशी अत्यंत आदराने आणि सौजन्याने वागण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट राज्यात सुशासन, पारदर्शकता आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे आहे.या परिपत्रकात अधिकाऱ्यांना आमदार आणि खासदार सरकारी कार्यालयांना भेट देताना आदराने स्वागत करण्याचे, त्यांच्या चिंता काळजीपूर्वक ऐकण्याचे आणि संबंधित सरकारी नियमांनुसार मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे की या प्रतिनिधींशी दूरध्वनी संभाषणे देखील सभ्य आणि सौजन्याने केली पाहिजेत.

“दोन महिन्यांच्या आत प्रतिसाद द्या आणि दर तीन महिन्यांनी पत्रव्यवहाराचा आढावा घ्या.”
जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी, प्रत्येक कार्यालयाला आमदार आणि खासदारांकडून प्राप्त झालेल्या सर्व पत्रव्यवहारांसाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवण्याचे आणि दोन महिन्यांच्या आत प्रतिसाद देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जर वेळेवर प्रतिसाद देणे शक्य नसेल, तर हे प्रकरण विभाग प्रमुखांकडे पाठवावे आणि संबंधित आमदाराला अधिकृतपणे कळवावे. विभाग प्रमुखांना दर तीन महिन्यांनी अशा सर्व पत्रव्यवहारांचा आढावा घेणे देखील आवश्यक असेल.

केंद्रीय आणि राज्यमंत्री, पालकमंत्री, स्थानिक आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगरपालिका अध्यक्षांसह सर्व संबंधित मान्यवरांना सर्व प्रमुख सरकारी कार्यक्रमांना आमंत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये योग्य बसण्याची व्यवस्था पाळली पाहिजे.खासदार, आमदार आणि नागरिकांशी भेट”
याव्यतिरिक्त, विभाग प्रमुखांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी दोन तास विशेषतः खासदार, आमदार आणि स्थानिक नागरिकांशी भेटण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

14 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची नव्यानं सोडत; निवडणूक आयोगाच्या मोठ्या हालचाली सुरू

0

मुंबई — राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये 44 नगरपरिषदा, 11 नगरपंचायती, 20 जिल्हा परिषद आणि 2 महापालिकांमध्ये (नागपूर, चंद्रपूर) 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे.याबाबत येत्या (25 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.मात्र त्यापूर्वीच जिथे 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण झाले आहे, ते कमी करण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने दाखवली आहे. त्याचवेळी जिथे 50 टक्क्यांच्या आत आरक्षण आहे अशा 233 नगरपरिषद-नगरपालिकांमध्ये जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार (2 डिसेंबर) निवडणुका होऊ देण्यासाठी राज्य निवडणूक आयोग  प्रयत्नात असल्याचे समजते.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश होते. मात्र ही मर्यादा ओलांडली असल्याचा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात  दाखल झाली आहे. यावर सोमवारी (17 नोव्हेंबर) सुनावणी पार पडली. यात न्यायालयाने अधिकारी आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले.यानंतर आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश न्यायालयाने आयोगाला दिले आहेत. तसेच बांठिया आयोगाच्या पूर्वी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसे आरक्षण होते आणि आता जाहीर झालेले आरक्षण कसे आहे याची तौलनिक माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती आयोग सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे.
20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणात वाढ :

राज्यातील एकूण 20 जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढले असल्याची माहिती आहे. एकूण 34 जिल्हापरिषदांमध्ये जाहीर झालेल्या 2011 जागांमध्ये एकूण 54 टक्के आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामध्ये खुल्या वर्गासाठी 934 जागा, अनुसूचित जातीसाठी 246 जागा, अनुसूचित जमातीसाठी 306 जागा आणि ओबीसीसाठी 526 जागांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
एकूण आरक्षित जागा 1077 असून हे प्रमाण 54 टक्के इतके आहे. यामध्ये आदिवासीबहुल नंदुरबार 100 टक्के, पालघर 93 टक्के, गडचिरोली 78 टक्के, नाशिक 71 टक्के, अमरावती 66 टक्के, यवतमाळ 59 टक्के यांचा समावेश आहे. मात्र या जिल्ह्यांमध्ये आदिवासींची लोकसंख्या अधिक असल्याने या जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू आहे.मात्र, धुळे 73 टक्के, चंद्रपूर 63 टक्के, अकोला 58 टक्के, नागपूर 57 टक्के, ठाणे 57 टक्के, गोंदिया 57 टक्के, वाशिम 56 टक्के, नांदेड 56 टक्के, हिंगोली 56 टक्के, वर्धा 54 टक्के, जळगाव 54 टक्के, भंडारा 52 टक्के, लातूर 52 टक्के, बुलडाणा 52 टक्के या जिल्हा परिषदांमध्येही 50 टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने परळीत सव्वा लाखाचा गांजा पकडला

0

बीड  — परळी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून स्थानिक गुन्हे शाखेने कापसाच्या शेतात लावलेला गांजा जप्त केला आहे. या धाडीत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करून एकावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज आंधळे यांची हेळंबमध्ये गट क्रमांक 746 मध्ये शेती असून त्यांनी आपल्या शेतात कापसासोबत गांज्याची देखील लागवड केली होती.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांना पेट्रोलिंग करत असताना याबाबत माहिती मिळाल्यावरून त्यांनी शेतात जात पाहणी केली. यावेळी शेतात कापसासोबतच गांज्याची देखील लागवड झाल्याचा प्रकार समोर आला.पोलिसांनी छापा मारून 25.950 ग्रॅम गांजा जप्त केला.या कारवाईत 1 लाख 29 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.परळीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके,उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड,परळी ग्रामीणचे प्रभारी सय्यद,पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने,अंकुश निमोणे,रियाज शेख, केकाण, जोगदंड, भताने, आंधळे, घोडके, मराडे यांच्यावतीने करण्यात आली.