Home Blog Page 75

पत्नी पीडितांकडून कावळा पूजनाने पिंपळ पौर्णिमा साजरी!

0

छ‌.संभाजीनगर — वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी छत्रपती संभाजीनगर येथे पत्नी पीडित पुरुषांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने पिंपळपोर्णिमा साजरी केली. सात जन्म हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना सुवासिनी करतात.मात्र त्रास देणारी पत्नी नकोच असं म्हणत कावळा पूजन देखील केलं.


सुवासिनी महिला पतीला दीर्घायुष्य मिळाव तसेच हाच पती सात जन्म भेटावा यासाठी वडाची पूजा दरवर्षी करतात.मात्र पत्नीपीडित पुरुषांची संख्या वाढली आहे.कायदेही महिलांच्या बाजूंनी आहेत.पत्नींकडून होणाऱ्या त्रासामुळे पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळाच्या झाडाभोवती फेऱ्या मारल्या आणि कावळ्याची पूजा केली. वैवाहिक जीवनातील त्रासातून सुटका मिळावी, ही त्यांची या मागची प्रतीकात्मक मागणी होती.पुरुषांनी पत्नींकडून होणारा त्रास आणि पतींना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत असलेल्या पुरुषांसाठी जागरूकता आणि समर्थनाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महिलांकडून होणारे अत्याचार आणि त्रास पुरुष कुठेही व्यक्त करू शकत नाहीत, आणि अशा घटना वाढत असल्याचा दावा पत्नीपीडित पुरुषांनी केला आहे. दरम्यान, कावळ्याचे पूजन करत, “त्रास देणारी बायको सात जन्म तर काय, सात सेकंदही नको!” अशी अजब प्रार्थना करून बायकोच्या त्रासाला विरोध करत या आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपली व्यथा मांडली. या ‘कावळा पूजन’ कार्यक्रमाने वैवाहिक संबंधांमध्ये पुरुषांना येणाऱ्या आव्हानांवर आणि समस्यांना सहानुभूतीपूर्वक समजून घेण्याच्या गरजेवर चर्चा सुरू झाली आहे..ज्या पद्धतीने महिलांसाठी चळवळी झाल्या, तशाच पुरुषांसाठी सुद्धा गरज आहे. पुरुषांचा आवाज दबवण्याऐवजी त्यांना ऐकून घेणे, कायद्यात बदल घडवणे आणि सामाजिक मानसिकता सुधारणे यासाठी हे एक पाऊल ठरेल. “देव तरी आमचे म्हणणे ऐकेल,” या भावनेने पिंपळ वृक्षासमोर साकडे घालून पुरुषांच्या अश्रूंना आवाज देण्यात आला आहे अस अध्यक्ष अ‍ॅड. भारत फुलारे म्हणाले.

केज-कळंब महामार्गावर धावती बस पेटली; 22 प्रवाशांचा जीव वाचला !

0

केज — कळंब आगाराची बस केजहून कळंब कडे जाताना तिने अचानक पेट घेतला चालक व वाहकाच्या प्रसंगावधानाने 22 प्रवाशांचा जीव वाचला. या दुर्घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन च्या सुमारास घडली.
कळंब बस आगाराची बस एम एच 11/ बी एल 9374 केज येथून दुपारी 3:20 वाजण्याच्या दरम्यान २२ प्रवाशांना घेऊन कळंबकडे निघाली. केज साळेगाव दरम्यान बोबडेवाडी शिवारातील शेख फरीद बाबा दर्ग्याजवळ बस आली असता बसच्या बोनटने अचानक पेट घेतला.ही बाब चालक बारकुल यांच्या निदर्शनास येताच प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबवत प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. यावेळी बस मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या गर्दीने तीन वृद्ध महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.
केज व कळंब येथील अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. काहीवेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. बस चालक बारकुल व वाहक भांगे यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. यात 22 प्रवाशांचा जीव वाचला आहे. दरम्यान याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वाल्मीक कराड मकोकातून दोष मुक्त होणार?17 जूनला होणार सुनावणी

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान आज कोर्टात सुनावणी पार पडली. सरकारी वकील उज्वल निकम यांचा युक्तिवाद पार पडला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजूनही आरोप निश्चितीसाठी पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी, असे उज्वल निकम यांनी कोर्टाला सांगितले. दरम्यान वाल्मीक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
सरकारी पक्षाने अजून डिजिटल पुरावे सादर झाले नसल्याचे वाल्मीक कराडच्या वकिलांनी सांगितले. यावर आता 17 जून रोजी कोर्टात पूढील सुनावणी होणार आहे. आज कोर्टात जवळपास एक तास सुनावणी पार पडली. आज डिस्चार्ज अर्जावर सुनावणी होणे अपेक्षित होते, त्यावर आज सुनावणी झाली नसल्याचे समजते आहे. आज किरकोळ अर्जावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले गेले.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात वाल्मीक कराडचा हात असल्याचा आरोप आहे.वाल्मीक कराडला मकोला लागू होणार की नाही हे 17 जूनच्या सुनावणीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कोर्ट निर्णय देईल.

या खटल्यातून आणि मकोकामधून मला दोषमुक्त करावे असा अर्ज वाल्मीक कराडने कोर्टासमोर केला आहे. यावर 17 तारखेला सुनावणी होणार आहे. केवळ वाल्मीक कराडने दोषमुक्तीचा अर्ज केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 17 तारखेला होणाऱ्या सुनावणीत कोर्ट कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या; पंधरा दिवसाची मुदत वाढ!

0

मुंबई — जून महिन्याची सुरुवात झाली, तरी अजूनही सरकारी अधिकारी-कर्मचारी, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. सर्वसाधारणपणे मे महिन्यात या बदल्या होतात.परंतु, यंदा तुरळक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या वगळता, इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या अजूनही झालेल्या नाहीत.

मे महिन्याच्या अखेरीस राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासन कामात गुंतले असून, त्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांची मुदतवाढ देण्याबाबत सरकार निर्णय घेणार असल्याचे कळते.

बदलीस पात्र असलेले राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत दर वर्षी केल्या जातात. नियमित बदल्यांबरोबरच विनंती बदल्याही यावेळी केल्या जातात. परंतु, या वर्षी आतापर्यंत सरकारी विभागांतील केवळ १५ ते २० टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांच्याच बदल्या झाल्याचे चित्र आहे. बदलीस पात्र कर्मचाऱ्यांचे ३१ मेआधी समुपदेशन करून नियुक्तीपत्रे लवकरात लवकर द्यावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या होत्या. राज्य पोलिस दलात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्यात करण्यात आल्या. तसेच, मुंबईतील अंतर्गत बदलही नुकताच करण्यात आला. मात्र, तरीही राज्य सरकारच्या काही विभागांमध्ये बदल्या अजूनही प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.दरम्यान, याविषयी एका सनदी अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बदल्यांना मे महिन्यात सुरुवात झाली होती. परंतु, प्रशासकीय कारणे, मुसळधार पावसामुळे कर्मचारी विविध कामांत गुंतल्याने त्यास काहीसा विलंब झाल्याचे दिसते. परंतु, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून बदल्या करण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.

पाल्यांच्या शिक्षणावर परिणाम नको’
सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या बदलीनंतर त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठीच ३१ मेपूर्वीच त्या व्हाव्यात, असे संकेत आहेत. परंतु, करोनाकाळापासून यात अनियमितता आली आहे. यंदाही विविध पदांच्या संवर्गातील खूप कमी बदल्या आतापर्यंत झाल्या असून त्या लवकरात लवकर झाल्यास अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना स्थिरस्थावर होण्यास अधिक वेळ मिळेल, असे मत महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी मांडले.

वैद्यकीय योजनेतील सुधारणेसह 53% महागाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार!

0

मुंबई — एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी येण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून थांबलेला महागाई भत्ता अखेर जाहीर होण्याची शक्यता आहे निर्माण झाली असून, सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 53% महागाई भत्ता लागू करण्याचा विचार सुरू आहे. इतकंच नव्हे, तर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय योजनेतही ऐतिहासिक बदल होणार असून ओपीडीसारख्या दैनंदिन खर्चासाठीही आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी काही सकारात्मक घडामोडी घडताना दिसत आहेत. 2018 पासून थकीत असलेला महागाई भत्ता आता अखेर जाहीर होण्याच्या टप्प्यावर आहे. सध्या 46% असलेला भत्ता थेट 53% वर नेण्याची तयारी सुरू असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात लक्षणीय वाढ होणार आहे.

राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता लागू केला आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनीही समान न्याय देण्याची जोरदार मागणी केली होती. यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आपली बाजू मांडली.

महागाई भत्त्याच्या वाढीबरोबरच आणखी एक महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे – वैद्यकीय योजनेत मोठा बदल. सध्या ही योजना फक्त काही निवडक उपचारांपुरती मर्यादित आहे. मात्र, नव्या प्रस्तावित योजनेत ओपीडीसाठीही खर्चाची परतफेड होणार असल्याने कर्मचाऱ्यांना दररोजच्या आरोग्य गरजांमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय, ही योजना ‘कॅशलेस’ पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

कर्मचाऱ्यांचा रोष आणि अपेक्षा

एसटी कर्मचारी संघटनांनी वेळोवेळी आपले प्रश्न आणि मागण्या शासनापुढे ठामपणे मांडल्या आहेत. महागाई भत्ता थकीत असणे, पगार वेळेवर न मिळणे, आणि वैद्यकीय सुविधांची अपुरी अंमलबजावणी या बाबींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. त्यामुळे यावेळी केवळ घोषणा न करता ठोस निर्णय घेतले जाणे अत्यावश्यक ठरणार आहे.

महागाई भत्ता वाढ आणि वैद्यकीय सुविधांमधील सुधारणा या दोन निर्णयांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत सकारात्मक बदल होऊ शकतो. सरकारकडून लवकरच यावर अंतिम घोषणा होण्याची शक्यता असून, अनेकांचे लक्ष या निर्णयांकडे लागलेले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आता तरी “अच्छे दिन” येणार का? हे पाहणं गरजेच आहे.

मतदारसंघातील रस्त्यांसह विविध विषयी आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली बैठक

0
बीड — बीड मतदारसंघातील रस्ते तसेच विविध विषयांच्या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत नगर रोडवरील डिव्हायडर व रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करणे, राजुरी ते खरवंडी रस्त्यावरील पुलाचे रखडलेले काम, लिंबागणेश-मांजरसुंबा रस्त्यावरील जाधव वस्तीजवळ साठत असलेले पाणी, बिंदुसरा नदीवरील पूल कम बंधार्‍याचे संथगतीने होत असलेले काम, बीड शहरातील बार्शी रोडवर असलेला राष्ट्रवादी भवन समोरील मोठा खड्डा दुरूस्त करणे तसेच नगरपरिषदेकडून शहरात सुरू असलेल्या स्वच्छता काम व पाणीपुरवठा या विविध विषयांचा आ.संदीप क्षीरसागर यांनी आढावा घेतला.
                  मतदारसंघातील बीड शहर आणि ग्रामीण भागातील रस्ते, पूल आणि विविध त्यासंबंधित विविध विषय तसेच शहरातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांच्या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२) रोजी बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत नुकत्याच नवीन झालेल्या नगर रोडवरील दुभाजकांवर आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करणे, नवगण राजूरी येथे खरवंडी ते राजूरी रस्त्यावरील पूलाचे रखडलेले काम, लिंबागणेश ते मांजरसुंबा रस्त्यावर जाधववस्ती जवळ पाणी साठते यावर मार्ग काढणे, बीड शहरात बिंदुसरा नदीवर बंधारा कम पुलाचे काम संथगतीने सुरू आहे या कामाची गती वाढवणे, बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवन समोर पडलेला मोठा खड्डा दुरूस्त करणे तसेच बीड शहरात सुरू असलेल्या स्वच्छता काम आणि पाणी पुरवठ्याच्या कामांचा आ.संदीप क्षीरसागर यांनी आढावा घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी माजी आ.सय्यद सलीम तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
नगर रोडवर रस्ता क्रॉंसीगसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात बैठक
नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा न्यायालयाकडे जाण्यासाठी रस्ता क्रॉसिंग असणे नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सर्व स्तरांतून मागणी होत आहे. यासंदर्भात आ.संदीप क्षीरसागर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. काही दिवसांपूर्वीच आ.क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती‌‌. त्यानंतर आता मा.जिल्हाधिकारी यांच्या दालनात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने नगर रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा न्यायालयासमोर रस्ता क्रॉसिंग करण्याची आग्रही मागणी आ.क्षीरसागर यांनी केली.

पावसाने कांद्याचे नुकसान; आर्थिक संकटातील शेतकऱ्याची आत्महत्या

0

आष्टी — अवकाळीने पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काढणी केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे . यातूनच एका शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना लिंबोडी येथे रविवार एक जून रोजी सायंकाळी घडली. गोविंद रंगनाथ आंधळे वय 42 वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचं नाव आहे.

आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील शेतकरी गोविंद रंगनाथ आंधळे वय 42 वर्ष यांनी आपल्या दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. मान्सूनपूर्व अवकाळी पावसामूळे हाताशी आलेला कांदा वाहून गेला. एकीकडे नुकसान तर दुसरीकडे आर्थिक संकट ओढवल्याने डोक्यावरचे उसनवारी कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत आंधळे होते. यातूनच शेतकऱ्यांनी रविवारी सायंकाळच्या दरम्यान शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

आयशर ची रिक्षाला धडक, चार ठार तर रस्त्यावरच्या भेगांनी घेतला एकाचा बळी

0

बीड — मेहकर-पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर रविवारी रात्री 11 वाजेदरम्यान अपघात होऊन त्यात चार जण ठार तर काही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना माजलगाव येथील रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. मयतांमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, आयशरने ऑटोला जवळपास 50 ते 60 फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. घटनास्थळी दिंद्रुड पोलीस तात्काळ दाखल झाले.
यासंदर्भात समजलेली माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील कांही लोक ऑटो क्र. एमएच 23 एन 0273 ने रविवारी अकरा ते साडे अकरा वाजेदरम्यान तेलगावकडून माजलगावकडे जात असताना सदरील ऑटो नित्रुड जवळील एका पेट्रोल पंपासमोर आला असता समोरून येणार्‍या आयशर क्र एमएच 23 एम 9255 ने ऑटोला जबरदस्त धडक दिली. आयशरने धडक देताच ऑटो जवळपास 50 ते 60 फूट दूर अंतरापर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात ऑटोमधील तीन जण जागीच ठार झाले असून, मयतात एका महिलेचा समावेश आहे. याशिवाय आणखी एकाचाही मृत्यू झाला आहे. सर्व जखमी गंभीर आहेत. त्यांना तेलगाव येथील रूग्णवाहिकेने माजलगाव येथील रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. यात फारूक चॉद सय्यद, त्यांच्या पत्नी सय्यद शबाना फारूक, शेख नोहिद एजाज आणि फैजान रफिक सय्यद अशी चौघांची नावे आहेत.
मयताच्या जवळ असलेल्या आधारकार्डवरून त्यांची ओळख झाली. अपघातातील इतर मयत व जखमींचे नावे उपलब्ध होऊ शकले नाहीत. आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश साळुंखे, खलील मोमीन, सचिन गायकवाड, कानदास बनसोडे, चामनर आदि तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

रस्त्यावर पडलेल्या भेगांनी घेतला आणखी एक बळी

तेलगाव तालुका धारूर येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यात नोकरी असलेले महारूद्र भिमराव लोंढे (रा. खालापुरी ता. जि. बीड ह. मु. सुंदरनगर तेलगाव) हे दुचाकी क्र. एम. एच. 23- 7424 ने रविवार (1 जून 2025) रोजी दुपारी तेलगावकडून माजलगावकडे जात असताना तेलगाव- माजलगाव रस्त्यावर टालेवाडी नजीक रोडला पडलेल्या भेगा चुकवताना समोरून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रक क्र. एम. एच. 44- 7371 जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की महारूद्र लोंढे यांची गाडी ट्रकच्या समोरच्या भागात अडकली, तर या अपघातात महारूद्र लोंढे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बीडचं भयान वास्तव:843 ऊसतोड मजूर महिलांचे गर्भाशय काढले, ऐन तारुण्यात मरण यातना

0

बीड — ऊसतोड कामगारांचा जिल्हा असलेल्या बीडच्या महिलांचं भयान वास्तव समोर आल आहे. 30 ते 35 वयोगटातील तब्बल 843 महिलांचे गर्भाशय काढण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या महिलांना ऐन तारुण्यात मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून ऊसतोड महिलांचे गर्भाशय काढण्याचे प्रकार समोर येत आहेत. दरम्यान सरकारने या महिलांना मानधन देण्याची मागणी ऊसतोड कामगार संघटनेने केली आहे.

बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या जिल्ह्यातून दीड लाखाहून अधिक ऊसतोड मजुरांचं राज्याच्या इतर भागात स्थालांतर होतं. ऊस तोडणी हंगाम सुरू झाल्यानंतर मजूर दिवाळी दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात ऊस तोडणीसाठी जातात. सहा महिने ऊस तोडणी करून मार्च महिन्यापर्यंत त्यांचा परतीचा प्रवास असतो. आरोग्य विभागाकडून ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि परत आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते.मात्र याच स्थलांतरा दरम्यान 843 ऊसतोड महिला कामगाराचे गर्भाशय काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे यात ३० ते ३५ वयोगटातील महिलाचा अधिक समावेश आहे. गर्भाशय काढल्याने अनेक महिलांना आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मासिक पाळीत रक्तस्त्राव होणे, जंतु संसर्ग, पोटात दुखणे अशा गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. त्यामुळे गर्भाशय काढण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. गर्भाशय काढल्यानंतर मात्र असंख्य आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

गर्भवती असूनही फडावर हजेरी

1523 गर्भवती महिला ऊस फडावर काम करत असल्याचंही या अहवालातून समोर आलं आहे. याचा अर्थ गर्भधारणेच्या काळात त्या कोणत्याही आरोग्य सुविधा न घेता उन्हातान्हात शारीरिक श्रम करत आहेत. यामुळे आई व बाळ दोघांच्या आरोग्याला गंभीर धोका संभवतो.

अपुरे पोषण, वाढता रक्तक्षय आणि दुर्लक्षित आजार

उन्हातान्हात राबणाऱ्या या महिलांमध्ये 3415 जणींना रक्तक्षयाचा त्रास असल्याचेही निष्पन्न झाले आहे. यामध्ये लोहतत्त्वाची कमतरता, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन B-12 अभाव, थॅलेसेमिया, इतर जनुकीय विकारही कारणीभूत ठरत आहेत. आरोग्य विभागाच्या तपासणीत ही बाब स्पष्ट झाली आहे आणि याची नोंद माता व बाल संगोपन पोर्टलवर करण्यात आली आहे.
ज्या महिला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ऊस तोडणी करतात, त्या महिलांना दहा ते पंधरा वर्षांपूर्वी गर्भाशय काढले आहेत, त्यांना आता मरण यातना सहन कराव्या लागत असल्याचं स्वत: महिलांनी सांगितलं. यावर आता ऊसतोड मजूर महिलांच्या कल्याणासाठी सरकार कोणती पावलं उचलते याकडे लक्ष लागले आहे.

वैद्यनाथ मंदिराच्या नवीन दर्शन मंडपातच शिजवले मांसाहारी अन्न

0

परळी — वैद्यनाथ मंदिर परिसरात सध्या तीर्थक्षेत्र विकासाची बांधकामे सुरु आहेत. मात्र वैद्यनाथाच्या पूर्व प्रवेशद्वारावरच कंत्राटदाराकडे कामाला असलेल्या कामगारांनी नियोजित दर्शन मंडपातच चुल मांडून आम्लेट आणि मांसाहारी अन्न शिजवल्याचा प्रकार समोर आला असल्याने खळबळ माजली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी योगेश पांडकर यांनी हा सर्व प्रकार कॅमेरात कैद केला आहे.मंदिर परिसरात कामे करतांना ऐतिहासिक, धार्मिक महत्व लक्षात घेवून कामे करावी अशा वारंवार सुचना लोकप्रतिनिधी देत असतात. मात्र, तरीही दर्शन मंडपातच चुल मांडून आम्लेट आणि मांसाहारी अन्न शिजवल्याचा प्रकार प्रकार समोर आला आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याच इमारतीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांबाबत सबंधित गुत्तेदाराला खडे बोल सुनावले होते. आता तर वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच मांसाहार शिजवल्याचा प्रकार पुढे आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली असून या विरोधात काय कारवाई होते याकडे लक्ष लागलेले आहे.