Home Blog Page 36

आरटीई प्रवेशांसाठी सोमवारी सोडत ; ६ हजार ३२२ अर्ज दाखल 

0

बीड —  शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ०६ एप्रिल रोजी सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी  RTE २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी (६ एप्रिल) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे शिक्षण आयुक्तांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. सोडत काढल्यानंतर प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी जाहीर केली जाणार आहे.

यंदा आरटीई प्रवेशांसाठी जिल्ह्यात २१४ शाळांमध्ये २ हजार ४२२ जागा उपलब्ध आहेत. अर्ज भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये ८ हजार ८४८ अर्ज दाखल झाले होते. यापैकी २ हजार ५२६ अर्ज अनकन्फर्म असल्यामुळे ६ हजार ३२२ अर्ज पात्र ठरले आहेत. आता या पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे भवितव्य सोमवारी होणाऱ्या लॉटरी पद्धतीने ठरणार आहे.

गैरप्रकारांबाबत तक्रार करण्याचे आवाहन

‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांना पाल्यांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारची प्रलोभने दिली जात असल्यास अशा प्रलोभनांना बळी पडू नये. प्रवेशाबाबत कोणतेही गैरप्रकार निदर्शनास आल्यास जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय (depmah2@gmail.com) तसेच शिक्षण आयुक्त (educommoffice@gmail.com) यांच्याकडे समक्ष किंवा ई-मेलद्वारे पुराव्यासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

तालुका निहाय आकडेवारी

तालुके (शाळा) (प्रवेशाच्या ) (दाखल अर्ज)
जागा
अंबाजोगाई   — ३४ — ३००. — १०३२
आष्टी.             — १०—  १०२ — ९३
बीड.            —  १७ — २३१ —  १५५१
धारुर.     — ०८ — १३१ — २४४
गेवराई       —  ३६ —  ३८७– ९९३
केज    —  २२ — २१६ — ३८७
माजलगांव    — २७ — २६८ — ७४९
परळी.     —  २३ — २९४ — ८०७
पाटोदा        –०३  — ३३ — १०२
शिरूर.   — ०७ — ७७ –१९१
बीड शहर  — २० –३२० –११३
वडवणी   — ०७ — ६३ — ६०

एकूण     –२१४   — २४२२ — ६३२२

लिंबागणेश पाणीपुरवठा विहिरीच्या मोटारची वायर दीड महिन्यात २ वेळा चोरी

0

लिंबागणेश — बीड तालुक्यातील लिंबागणेश गावात ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील विहिरीच्या मोटारीची विद्युत वायर गेल्या दीड महिन्यात तब्बल दोन वेळा चोरीला गेल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावाच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या या योजनेवर परिणाम होत असून पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या वारंवार होणाऱ्या चोरीमुळे ग्रामपंचायतीवर मोठा आर्थिक बोजा पडत असून आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सरपंच बालासाहेब जाधव यांनी दिली. यापूर्वी झालेल्या चोरीबाबत नेकनुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पुन्हा चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, आज (दि.०४) नेकनुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे व लिंबागणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड यांनी भायाळा साठवण तलाव परिसरातील चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, डॉ. गणेश ढवळे, विक्रांत वाणी, विनायक वाणी, शिवाजी वाणी तसेच पाणीपुरवठा कर्मचारी सुखदेव वाणी उपस्थित होते.

डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले की, भायाळा साठवण तलावातून लिंबागणेश व पोखरी गावांना पाणीपुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत सार्वजनिक विहिरीच्या मोटारींच्या वायरची वारंवार चोरी होणे हे गंभीर असून चोरट्यांनी पोलिस प्रशासनालाच आव्हान दिले आहे. यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून चोरट्यांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करून चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसाठी पांडुरंग आंधळेंचे चौदाव्या दिवशीही उपोषण; प्रशासन  उदासीन

0

पालीच्या बिंदुसरा धरणात पाच तास जलसमाधी आंदोलन

बीड  – ऊसतोड कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ऊसतोड कामगार  पांडुरंग वामनराव आंधळे (Pandurang Andhale hunger strike) हे जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे मागील १४ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध म्हणून व ऊसतोड कामगार पांडुरंग वामनराव आंधळे यांना पाठिंबा देण्यासाठी श्री.बाळासाहेब मोरे पाटील (संस्थापक अध्यक्ष, शिव शाहू ऊसतोड कामगार संघटना) यांच्या नेतृत्वाखाली पाली येथील बिंदुसरा प्रकल्पात तब्बल पाच तास जलसमाधी आंदोलन (Sugarcane workers protest Maharashtra) करण्यात आले. या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

📌 प्रमुख मागण्या:

ऊस तोडणी व भरणी दर ₹500 प्रति टन करण्यात यावा व वाहतूक दरात दुप्पट वाढ करावी

ऊसतोड भरणी व वाहतुकीचा करार दरवर्षी करण्यात यावा

ऊस तोडणीदरम्यान प्रसूती झाल्यास माता भगिनींना ₹25,000 प्रसूती भत्ता देण्यात यावा

ऊसतोड कामगारांची अधिकृत नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे

तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 2014-15 गळीत हंगामासाठी जाहीर केलेली 20% दरवाढ तात्काळ लागू करावी

या जलसमाधी आंदोलनादरम्यान मंडळ अधिकारी शितलताई चाटे या उपस्थित होत्या व त्यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. मात्र, बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके हे प्रत्यक्ष उपस्थित नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये काही काळ असंतोष निर्माण झाला.

यानंतर माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड) यांच्या मध्यस्थीने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करण्यात आली. तहसीलदारांनी प्रतिनिधी मंडळासह उपोषणकर्ते पांडुरंग आंधळे यांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले असून, कामगारांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

या आंदोलनात बाळासाहेब मोरे पाटील, माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदाताई पांचाळ (विश्व कल्याण महिला सेवाभावी संस्था), सीताबाई भोसले (महिला जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)प्रदीप बांगर, बाळसिंह परदेशी, केशव तांदळे, रेवन येडे, माऊली शिरसाट,सतीश (भाऊ) जोगदंड, ज्ञानेश्वर तांदळे,आयुब पठाण, मोहन आघाव,संभाजी कदम,रोशन केकान,
अरुण साठे कर्जणीकर,अमोल चौरे, महादेव नाईकवाडे,संपत नागरगोजे,
अमोल सावंत,अविनाश मुंडे, बाळासाहेब कळसकर आदींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे आरोप; कॉल रेकॉर्डमुळे राजकीय खळबळ

0

मुंबई — महाराष्ट्रात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे. बलात्काराच्या गंभीर आरोपांखाली अटक झालेल्या अशोक खरात याच्या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी सुरू असून दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे.


या प्रकरणात केवळ गुन्हेगारीच नव्हे तर राजकीय संबंधांचाही मुद्दा पुढे येऊ लागला आहे. खरातसोबत अनेक नेत्यांचे फोटो समोर आल्यानंतर आधीच खळबळ उडाली होती. आता कॉल रेकॉर्डवरून आणखी वाद वाढला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठे आरोप करत काही कॉल डिटेल्स सार्वजनिक केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, रुपाली चाकणकर यांचे तब्बल १७७ कॉल्स खरातला झाले असून त्यांच्या बहिणीचे २३६ कॉल्स असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच एकनाथ शिंदे यांचे १७ कॉल्स झाल्याचे सांगण्यात आले असून त्यामध्ये १० इनकमिंग आणि ७ आऊटगोईंग कॉल्स असल्याचा आरोप आहे. या संभाषणातील सर्वाधिक वेळ २१ मिनिटांचा असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
याचबरोबर चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांचे प्रत्येकी ८ कॉल्स, तर आशिष शेलार यांचा एक कॉल असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे यावर प्रतिक्रिया देत ही माहिती जनतेसमोर यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनीही कॉल रेकॉर्ड संदर्भात स्पष्टीकरण देण्याची गरज व्यक्त केली आहे.
या सर्व आरोपांमुळे अशोक खरात कॉल रेकॉर्ड वाद अधिकच गडद झाला असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता SIT तपासातून नेमकी सत्यता काय समोर येते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

जनविश्वास विधेयकाला लोकसभेत मंजुरी

0

नवी दिल्ली — केंद्र सरकारने आणलेले ‘जन विश्वास विधेयक २०२६’ गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत चर्चेला उत्तर दिल्यानंतर आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले. लोकसभेने याआधीच बुधवारी या विधेयकाला हिरवा कंदील दिला होता.
व्यवसाय सुलभता (Ease of Doing Business) वाढवणे आणि किरकोळ चुकांसाठी होणारी फौजदारी कारवाई कमी करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. या बदलांमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच लघु व मध्यम उद्योगांवरील जाचक अटींचा बोजा कमी होईल, असा विश्वास पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.

८० कायद्यांमध्ये मोठे बदल
२७ मार्च २०२६ रोजी लोकसभेत मांडलेल्या या विधेयकाद्वारे सुमारे ८० केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. कोळसा, वाणिज्य, जहाजबांधणी, नागरी विकास आणि वाहतूक अशा २३ मंत्रालयांतील ७९ कायद्यांमधील एकूण ७८४ तरतुदींमध्ये बदल केले जाणार आहेत. यापैकी ७१७ तरतुदींमधून तुरुंगवासाची शिक्षा रद्द करण्यात आली आहे, तर ‘Ease of Living’ अंतर्गत ६७ बदल करण्यात आले आहेत.
तुरुंगवासा ऐवजी दंड
या विधेयकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक गुन्ह्यांसाठी तुरुंगवास रद्द करून त्याऐवजी आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. ‘श्रेणीबद्ध’ पद्धतीनुसार पहिल्या चुकीसाठी सल्ला, दुसऱ्या चुकीसाठी ताकीद आणि त्यानंतरच दंड आकारला जाईल.
न्यायनिर्णय अधिकारी आणि अपील व्यवस्था
नवीन कायद्याची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी ‘न्यायनिर्णय अधिकारी’ नेमले जाणार असून ते चौकशी करून दंड ठरवतील. तसेच निर्णयांविरुद्ध अपील करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे.
दरम्यान, महामार्ग असुरक्षित ठरवल्यास आधी पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद होती, ती आता बदलून १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत नागरी दंड करण्यात आली आहे. काही किरकोळ गुन्हे पूर्णपणे वगळण्यात आले असून, किमान दंडात दर तीन वर्षांनी १० टक्क्यांनी वाढ करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

खोक्या उर्फ सतीश भोसलेची निर्दोष सुटका; वर्षभरानंतर बाहेर

0

बीड — सतीश भोसले (Beed crime news) उर्फ खोक्या तब्बल वर्षभरानंतर कारागृहाबाहेर आला आहे. बीडच्या शिरूर कासारमधील बॅटने मारहाण प्रकरण व ढाकणे कुटुंबाच्या मारहाण प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्या मागील वर्षभरापासून कारागृहात होता. खोक्याची न्यायालयाने निर्दोष सुटका (Court Acquittal)केली. आहे.

एका वर्षांमध्ये पूर्ण माझ्या जीवनाची कमाई आणि मी पूर्णपणे बरबाद झालो. आज पूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं आहे. घरातील लेकरा बाळाचा आई-वडिलांना राहिला छत नाही. सगळं हिसकावून घेतलं, असं सतीश भोसले म्हणाला. जेलमधून सुटून आल्यानंतर सतीश भोसले हा त्याच्या शिरूर कासार येथील राहत्या घरी आला. यावेळी वनविभागाने अतिक्रमण म्हणून खोक्याचे घर पाडलेले उध्वस्त झालेला घर संसार पाहून हे पूर्णपणे उध्वस्त झाल्याच्या भावना सतीश भोसलेने व्यक्त केल्या.

सत्याचा विजय झालेला आहे. माझ्यावर आरोप केले होते. कोर्टात सत्य आहे ते समोर आले. माझी निर्दोष मुक्तता झाली माझा न्यायदेवतेवर विश्वास होता. न्याय देवतेने मला न्याय दिला त्याबद्दल खूप खूप आभार मानतो. वायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता ही खोटी होती. मला टार्गेट करून माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर अन्याय केलेला आहे, असंही सतीश भोसले म्हणाला.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याच दरम्यान एका व्यक्तीला आपल्या साथीदारासोबत बॅटने अमानुष मारहाण करताना खोक्या भोसलेचा व्हिडीओ समोर आला. याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेत खोक्याला अटक केली होती. या प्रकरणासोबतच शिरूर तालुक्यातील पिता-पुत्रांना मारहाण आणि वन्य प्राण्यांची शिकार ( Hunting of Wild Animals) करून हरणाचे मांस घरात आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

गाडीच्या डॅशबोर्डवर पैशांची बंडल दाखवणे, हेलिकॉप्टर मधून एन्ट्री आणि पंचतारांकित हॉटेलमधील लॅविश लाइफस्टाइल असा थाट खोक्या भोसलेचा रिल्समधून समोर आला होता. खोक्या भोसले कारागृहात असताना त्याचे शिरूर मधील वनविभागाच्या जागेत असलेले घर जमीनदोस्त करण्यात आलं. यावेळी सुरेश धस यांनी खोक्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती. दरम्यान, वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्याची निर्दोष मुक्तता तर बॅटने मारहाण केल्याप्रकरणी जामीन मंजूर झाला.

सिग्नल प्रकरणी कारवाई,१३ कोटींच्या बसस्थानक गळतीकडे दुर्लक्ष; जिल्हाधिकाऱ्यांचा ‘विवेक’ कधी जागा होणार? कंत्राटदारावर कधी गुन्हे दाखल करणार? 

0

बीड — शहरातील ६४ लाख रुपये खर्चाच्या हायटेक सिग्नल ( HighTech  signal) कोसळल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांनी दिले असतानाच, १३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या गळती (  Bus Stand Leakage) प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दुहेरी मापदंडाबद्दल डॉ.गणेश ढवळे यांनी तिव्र नापसंती व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणात कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून संबंधित आगार व बस व्यवस्थापन आधिका-यांवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री, पालकमंत्री, परिवहन मंत्री, जिल्हाधिकारी बीड यांना डॉ.गणेश ढवळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

नगर नाका परिसरात अवकाळी पावसात सिग्नल कोसळल्याच्या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते व काही नगरसेवकांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. मात्र, याच शहरातील मुख्य बसस्थानकाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उद्घाटनापूर्वीच गळती सुरू झाल्याच्या तक्रारीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.

डॉ. गणेश ढवळे यांनी सुमारे पाच महिन्यांपूर्वी, १ नोव्हेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी व कारवाईचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

“सिग्नल कोसळल्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणारे जिल्हाधिकारी बसस्थानक गळती प्रकरणात मौन का बाळगतात? त्यांचा ‘विवेक’ कधी जागा होणार?” असा सवाल डॉ. ढवळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत सोमवारपासून आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

बसस्थानकाच्या निकृष्ट कामाबाबत करण्यात आलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

बसस्थानकाच्या निकृष्ट कामाबाबत तक्रारी असूनही विभाग नियंत्रक अनुजा दुसाने आणि आगार व्यवस्थापक निलेश पवार या संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला पाठीशी घालत कोणतीही कठोर कारवाई केली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. “काम अपूर्ण असून दुरुस्ती केली जाईल” असे कारण देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा डॉ. ढवळे यांनी केला आहे

बसस्थानक प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी दि.६ सोमवार रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून या प्रकरणामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चमकोगिरी पुरताच “विवेक” जागा असणारे जिल्हाधिकारी कारखानदारांचे कठपुतळी बाहूले — अजित नवले

0

बीड — कारखान्यांना गाळपासाठी ऊस देवून दीड दोन महिन्यांनंतरही काटखान्यांकडून पैसे मिळत नसल्याने किसान सभेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आणि जिल्हाधिकाऱ्यानी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या शेतकरी प्रश्नावरील या उदासीन भूमिकेचा निषेध करत किसान सभेचे शिष्टमंडळ चर्चेविनाच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर पडले. याच्या शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर जिल्हयातील प्रशासन हे साखर कारखानादाराचे कटपुतली आहे का? असा घणाघाती सवाल राज्य सचिव डॉ.अजित नवले यांनी या प्रसंगी केला.

वृक्ष लागवडीचा इव्हेंट साजरा करून चमकोगिरी चा पॅटर्न राबवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना आत्महत्याग्रस्त बीड जिल्ह्यात काम करत असल्याचा विसर पडला. शेतकरी प्रश्नावर मात्र त्यांच्यातला विवेक हरवल्याच विदारक चित्र पाहायला मिळालं. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर अळवला जात आहे.


सरकारने कर्जमाफी, पीकविमा, अतिवृष्टी अनुदान याबाबत केलेले फसवे दावे याबाबत किसान सभा राज्यभर आंदोलनाची सुरुवात बीड मधून करणार असल्याचे या प्रसंगी डॉ.नवले यांनी सांगितले. विविध प्रश्नाला घेत अखिल भारतीय किसान सभेने बुधवार दि 1 रोजी रखरखत्या उन्हात कलेक्टर कचेरीवर धडक मोर्चा काढला.
पिक विमाधारक सर्व शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या प्रमाणात १७५०० रु. पेक्षा जास्त अथवा अतिवृष्टी नुकसानाच धरतीवर घोषित केल्याप्रमाणे किमान १७५०० रुपये सरसकट पिकविमा मिळावा, शासनाने घोषित केलेले अतिवृष्टी अनुदान सर्व वंचित शेतकऱ्यांना १५ दिवसांच्या आत सर्व अडचणींचे निराकरण करून मिळायलाच हवे, मागच्या तीन-चार महिन्यापासून जिल्ह्यातील विविध कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाही ही ऊस बिलाची रक्कम पुढच्या आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई मिळणे अजून बाकी आहे. त्यासाठी शासनाने अशा शेतकऱ्यांना घोषित केलेली मदत १० एप्रिल पर्यंत वितरित करावी.या मागण्या घेत जिल्ह्यातील शेतकरी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली बुधवार दि १ रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान सभेचे राज्य सचिव कॉ.डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी शेतकरी विरोधी भुमीका घेत कसल्याही प्रकारची आश्वासक,  सुसंवादी, आकडेवारीनिहाय चर्चा न करता वेळ काढुपणा करत थातूरमातुर उत्तरे देत अप्रत्यक्षपणे साखर कारखानदारांची पाठराखण करत असल्याचे शिष्टमंडळाच्या लक्ष्यात आल्याने शेतकरी आणि शिष्टमंडळ संतप्त होत चर्चेविना दालनाबाहेर पडले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना डॉ.नवले यांनी ऊस देयक अदा प्रश्नी जिल्ह्यातील प्रशासन हे  शेतकऱ्यांच्या पाठीशी नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी या अस्मानी आणि सुलतानी संकटात एकजुटीने पूर्ण ताकदीने लढा उभारण्याची वेळ आली असून फसवी कर्जमाफी, पीक विमा ऊस दर  यासह इतर प्रश्नावर किसान सभा राज्यभर आंदोलन करणार असून त्याची सुरुवात बीड मधून करण्यात येईल असे ही सांगितले.
या प्रसंगी किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष ऑड.अजय बुरांडे यांनी साखर कारखानदार ऊस रिकव्हरी लपवून शेतकऱ्यांची होणारी लूट रोखण्यासाठी अनेक आंदोलने करून दर वाढवून घेतला मात्र नियमानुसार गाळप पश्चात 15 दिवसात देयक अदा करणे बंधनकारक असताना अद्याप ऊस देयक अदा केले नसल्याने शेतकरी आक्रमक असल्याचे सागितले.
या प्रसंगी कॉ.मुरलीधर नागरगोजे, मोहन जाधव, रोहिदास जाधव, कृष्णा सोळंके, भगवान बडे, बालाजी कडभाने, विष्णू देशमुख आदींसह अनेक पदाधिकारी, युवा शेतकरी, महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चमत्काराच्या नावाखाली सोन्याची अंगठी चोरणारा नाशिकचा भोंदू बीडमध्ये जेरबंद

0

बीड — चमत्कार दाखवतो असे सांगून एका वृद्ध व्यक्तीची सोन्याची अंगठी हातचलाखीने चोरी करणाऱ्या भोंदूला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भीमा सोनाजी जाधवर (वय ५८, रा. काशीदवाडी ता. केज) यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ते पुणे येथे उपचारासाठी जाण्यासाठी केज बसस्थानकात बसची वाट पाहत होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधत चमत्कार पाहायचा आहे का? असे विचारले. त्यांनी फिर्यादींची सुमारे ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून पांढऱ्या रुमालात ठेवत असल्याचा बनाव केला व १० मिनिटे डोळे बंद करा, चमत्कार दिसेल असे सांगून हातचलाखीने अंगठी चोरून पसार झाला. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, या गुन्ह्याचा समांतर तपास
स्थानिक गुन्हे शाखा करत होती. पोउपनि महेश विघ्ने यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोन संशयित इसमांचे फुटेज मिळाले. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हे येवला (जि. नाशिक) येथील असून मदारी खेळ व हातचलाखी करणारे असल्याचे निष्पन्न झाले. यानुसार पथक येवला येथे रवाना झाले व फुटेज मधील आरोपी अमजद नबाब मदारी (रा.
सावरगाव, ता. येवला, जि. नाशिक) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदार अशफाक राजू मदारी याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली.पोलिसांनी
आरोपीकडून चोरीस गेलेली ६ ग्रॅम सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे २४ हजार रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. आरोपीस पुढील कारवाईसाठी केज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून फरार साथीदाराचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने, पोहेकॉ महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गीते, गणेश मराडे यांनी केली.

घरामागे खेळणाऱ्या अडीच वर्षीय मुलीवर 13 वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार

0

अंबाजोगाई — तालुक्यातील डोंगर पिंपळा येथे 15 वर्षीय मुलाने दोन वर्ष पाच महिन्याच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजीच आहे या घटनेला पाच दिवसही उलटत नाहीत तोच आणखी एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर गावातीलच 13 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 31 मार्च रोजी घडली. या घटनेने खळबळ माजली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पीडित चिमुरडी तिच्या घरामागील मोकळ्या मैदानात खेळत होती. यावेळी गावातीलच 13 वर्षीय मुलाने तिला गाठून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे चिमुरडीला गंभीर दुखापत झाली आहे .तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित चिमुरडीच्या आईने 1 एप्रिल रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. याप्रकरणी मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएन एस) कलम 64(1), 65(2) तसेच पाॅक्सो कायद्याच्या कलम 4,8 आणि 13 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पाच दिवसापूर्वीच 15 वर्षाच्या मुलाने मोबाईलवर अश्लील चित्रफीत पाहून दोन वर्ष पाच महिने वयाच्या मुलीवर असाच लैंगिक अत्याचार केला. या घटनांमुळे खळबळ माजली असून लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल देणं किती घातक ठरू शकतं व मुले कशी गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.