Home Blog Page 28

गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री झाली तर अधिकाऱ्याचे थेट निलंबन

0

मुंबई — बंदी असलेल्या गुटखा आणि तत्सम अंमलीपदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला असून  बंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिला .

अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होत आहे, असे निर्दशनास आल्यास त्या कार्यक्षेत्राच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकही मंत्री झिरवाळ यांच्या निर्देशानंतर काढण्यात आले.

या अंतर्गत सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांना प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने व अवैध मार्गाने विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकावर प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनीही परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

सह आयुक्त (अन्न), सहायक आयुक्त (अन्न) व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील अन्न आस्थापनांची तपासणी करावी. तसेच त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठा व वितरण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी व प्रतिबंधित अन्नपदार्थांचे बंदीबाबत आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.

“सह्याद्री देवराईला” भीषण आग; आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

0

बीड — तालुक्यातील पालवन परिसरातील ‘ सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आज बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे डोंगरावरील हजारो झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि असंख्य पशू-पक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीवर या आगीमुळे अक्षरशः पाणी फेरलं गेलं आहे. आज सायंकाळच्या सुमारास पालवन डोंगर रांगेत अचानक धुराचे लोट दिसू लागले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच या आगीने संपूर्ण सह्याद्री देवराई प्रकल्पाला वेढले. ही आग इतकी भीषण होती की, दुरूनच आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसत होता. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने वन विभागाला याची माहिती दिली.
माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी ताफा घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक ग्रामस्थ आणि वन कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, वाळलेले गवत असल्यामुळे आग विझवण्यात मोठे अडथळे येत आहेत.

कापूस, सोयाबीन व तूर पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी 25 डिसेंबरला शेतकरी हक्क मोर्चा

0

बीड — राज्यातील शेतकरी सध्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून जात असून शेतीमालाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असताना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन व तूर या प्रमुख पिकांचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने गुरुवार, दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बीड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती मोर्चा संयोजकांनी दिली.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत 

शेतकऱ्यांच्या कापसाला किमान ₹12,000 प्रति क्विंटल भाव देण्यात यावा.
सोयाबीनसाठी किमान ₹7,000 प्रति क्विंटल दर व तुरीला 12000 रु निश्चित करण्यात यावा.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) कडून होणारी अडवणूक थांबवून सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात यावा.
हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या बाजार समित्या व व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
बाजारात कमी दराने खरेदी झालेल्या शेतमालाचा विक्रीदर व खरेदीदरातील फरक सरकारने अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना भरून द्यावा. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, सबसिडी, अनुदान व पीक विमा यांची थकीत रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी.या मागण्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष न दिल्यास शेतकऱ्यांमध्ये तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. शेतकरी हक्क मोर्चाला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

ठाकरे बंधू अखेर एकत्र; शिवसेना-मनसे युतीची ऐतिहासिक घोषणा

0

मुंबई — महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ चर्चेत असलेली शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर प्रत्यक्षात उतरली असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संयुक्तपणे या राजकीय युतीची अधिकृत घोषणा केली.
महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण आज आला आहे,” असे स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी यावेळी सांगत, मराठी माणसाच्या हितासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचे जाहीर केले.

या ऐतिहासिक निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले की, कोणतेही मतभेद, वाद किंवा भांडण यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. याच विचारातून एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. “जे काही उरले आहे, ते सर्व जाहीर सभेत मांडू. सध्या निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ लवकरच कळवली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उपरोधिक टीकाही केली. राज्यात लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्यांची चर्चा सुरू असताना, त्यात आणखी दोन टोळ्या वाढल्या असून त्या राजकीय पक्षांतील असल्याचा टोला त्यांनी नाव न घेता लगावला. सत्तेच्या राजकारणात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींवर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली.

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या घोषणेनंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. मुंबईसह राज्यभरात फटाके, ढोल-ताशे आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला जात असून, अनेक ठिकाणी एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

वृद्ध महीलेस लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

0

बीड — केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील वृद्ध महिला पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेली असताना तिच्या अंगावरील दागिने चोरून नेल्याची घटना 18 जून 2025 रोजी घडली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
मालनबाई तुकाराम लाड, वय 80. रा लाडेवडगांव ता. केज या पत्राचे शेडमध्ये रात्री एकट्याच झोपलेल्या असताना अनोळखी चार चोरट्यांनी त्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश केला. त्याच्या अंगावरील सोन्याचे दागीने कानातील फुले चोरुन घेवुन गेले होते. याप्रकरणी युसुफ वडगांव पोलीस ठाण्यात कलम 309 (6) भा.न्या. संहीताप्रमाणे दिनांक 18 जून 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि महेश विघ्ने यांचे पथक सदरील गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. सदरील गुन्हा हा श्याम अजिनाथ शिंदे रा मांडवा ता वाशी जि.धाराशिव याने त्याचे साथीदाराचे मदतीने केल्याचे गुप्तबातमीदार व तांत्रिक विश्लेषण व्दारे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीचे मागावर होते. दरम्यान 20 डिसेंबर रोजी गुप्त बातमीदारमार्फत माहीती मिळाली की, आरोपी श्याम अजिनाथ शिंदे हा केज येथील बसस्टॅन्ड वर येणार आहे. माहीती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ केज येथे जावुन बसस्थानक परीसरात सापळा लावला. आरोपी श्याम अजिनाथ शिंदे हा बसमधुन खाली उतरत असताना पथकाने गराडा घालुन त्याला पकडले, त्यास गुन्हयासंदर्भाने विचारपुस करता त्याने सदरील गुन्हा त्याचे साथीदार विशाल अजिनाथ शिंदे, रा मांडवा ता. वाशी, अमोल नाना शिंदे, रमेश नाना काळे दोन्ही रा कन्हेरवाडी, पारधी वस्ती वाशी, जि. धाराशिव यांनी मिळून केल्याचे सांगीतले. त्याच्या ताब्यातुन चोरीस गेलेले 09 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीणे हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले असुन आरोपी सध्या कोठडीत आहे.हि कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय शिवाजी बंटेवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि मच्छिद्र शेंडगे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार जफर पठाण, महेश जोगदंड, दिपक खांडेकर, भागवत शेलार, पोलीस अंमलदार बप्पासाहेब घोडके, चालक पोलीस हवालदार गणेश मराडे यांनी केली.

गोदावरी पात्रात पोलिसांचा छापा; चार ट्रॅक्टर सह 14 लाखाचा माल जप्त

0

बीड — गोदावरी पात्रात म्हाळस पिंपळगाव येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी मारलेल्या छाप्यात चार ट्रॅक्टर सह 14 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. म्हाळस पिंपळगांव येथे वाळू उपसा केला जात असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली. गेवराई पोलिसांनी या ठिकाणी छापा मारताच चार ते पाच ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरला पाठीमागील बाजूस केन्या लावून अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची गाडी येत असल्याचे पाहताच तीन ट्रॅक्टर चालक यावेळी फरार झाले.तर आकाश भास्कर भिताडे वय 23 वर्षे, रा. गंगावाडी, ता. गेवराई जि. बीड या ट्रॅक्टर चालकास पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी मारलेल्या या छाप्यात स्वराज कंपनीच्या चार ट्रॅक्टर केन्यासह असा 14 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उप विभागीय पोलीस अधीकारी अनिल कटके पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि, सतीष कोटकर, पोउपनि प्रदीप आढाव, ग्रेडपोउपनि श्रीमंत उबाळे, जितेंद्र ओव्हाळ, गोरक्ष डोके यांनी केली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि प्रदिप सांळुके हे करीत आहेत.

ईव्हीएम मशीनवरील नावाच्या क्रमवारीत बदल; जि प निवडणुकीत अंमलबजावणी

0

मुंबई — राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने उमेदवारांच्या नावांच्या क्रमाबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. नव्या गॅझेटनुसार, ईव्हीएम मशीनवर आता उमेदवारांची नावे त्यांच्या पक्षाच्या दर्जाप्रमाणे लावली जाणार आहेत. याची अंमलबजावणी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी मध्ये करण्यात येणार आहे.
या गॅझेटनुसार राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या नावाला प्रथम प्राधान्य मिळणार आहे. त्या खाली राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवाराचे नाव असणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत याची अंमलबजावणी केली जाणार आहे.यापूर्वी ईव्हीएमवर उमेदवारांची नावे त्यांच्या आडनावाच्या अद्याक्षराप्रमाणे लावली जात असत. यामुळे अनेकदा राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची नावे खाली जात असत. आता नवीन निर्णयानुसार, सर्वात वर राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार, त्यानंतर राज्यस्तरीय प्रादेशिक पक्षांचे उमेदवार आणि शेवटी अपक्ष उमेदवारांची नावे असतील. मतदारांना आपला उमेदवार शोधणे सोपे जावे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे ईव्हीएमवर पहिल्यांदा राष्ट्रीय पक्षांची नावे येणार आहेत. एक पेक्षा जास्त राष्ट्रीय पक्ष असल्यास त्यांच्या त्यांच्या उमेदवाराच्या आडनावा नुसार त्यांनी ईव्हीएमवर एक, दोन, तीन असा क्रमांक मिळणार आहे. त्यानंतर प्रादेशिक पक्षांना स्थान देण्यात येणार आहे. सर्वात शेवटी अपक्षांचे नाव असेल. त्यामुळे पुर्वी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचे नाव खाली जात होते. ते आता जाणार नाही. पहिल्या तीन मध्ये नक्की दिसणार आहे.

सर्वोच्च दिलासा: माणिकराव कोकाटेची आमदारकी वाचली

0

मुंबई — सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेल्या राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटेला सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या अंतरिम आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यामुळे कोकाटे यांची आमदारकी वाचली आहे.
सर्वोच्च न्यायालयाची नाताळ सुट्टी सुरू झाली असताना सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील विशेष खंडपीठासमोर आज तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होत आहे. त्यात कोकाटे यांच्या अर्जावरही होणारी सुनावणी झाली.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की ‘आमदार म्हणून अपात्र ठरणार नाहीत, एवढ्यापुरतेच आम्ही हायकोर्टाच्या आदेशाला तूर्तास स्थगिती देत आहोत. पण माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही लाभाचे पद धारण करता येणार नाही’, असं सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.
कोकाटे यांच्या अर्जावर प्रतिवादींना नोटीस जारी करून सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी तहकूब केली. ज्यांच्या तक्रारीवरून उपजिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांत एफआयआर नोंदवला, त्यांच्या वकिलांनी हस्तक्षेप करून कोकाटे यांना दिलासा मिळू नये, असा प्रयत्न केला. मात्र, ‘प्रथमदर्शनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात मूलभूत चूक दिसत आहे. सविस्तर सुनावणीत सर्व बाबींचा कायदेशीर विचार केला जाईल’, असं स्पष्ट करून सरन्यायाधीश सूर्यकांत व न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठाने कोकाटे यांना दिलासा दिला आहे.
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी कमी उत्पन्न दाखवत अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. या प्रकरणी फेब्रुवारी 2025 मध्ये माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. यावर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात अपिल केलं होतं. सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली. माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालय मणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

येणारा काळ लोकविश्वास आणि लोक विकासाचा – अमरसिंह पंडित

0

भीमकन्येच्या नेतृत्वात नव्या राजकारणाची घडी बसली

बीड — येणारा काळ लोकांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचा आणि आम्ही दिलेले आश्वासन पूर्तीचा असणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार या कडक शिस्तीच्या नेतृत्वात बीडचा कायापालट आपणाला करायचा आहे, यासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे अशा सूचना नवनिर्वाचितांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिल्या. भिमकन्येच्या नेतृत्वात नव्या राजकारणाची घडी यानिमित्ताने बसली असून येणाऱ्या काळात बीड तालुक्यात नव्या दमाच्या नेतृत्वांना संधी देण्याची भुमिका पक्ष घेत असल्याचे सुतोवाच अमरसिंह पंडित यांनी यावेळी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता ताई पारवे आणि २१ नगरसेवकांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. पक्षाच्यावतीने शिवछत्र येथे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.

बीड नगर परिषद निवडणुकीतील नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता ताई पारवे यांच्यासह २१ नगरसेवकांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी आ. विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप, सचिन मुळूक, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष सुहास पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपराव गोरे, राजेंद्र राऊत, बळीराम गवते यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता ताई पारवे, नवनिर्वाचित नगरसेवक फारुक पटेल, शेख निजाम, शेख मुजीब यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, बीड शहरातील आजवरच्या राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षम व्यवस्थेचा लोकांना विट आला होता, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्याचा कायापालट करू हा विश्वास लोकांना दिला होता या विश्वासावरच बीड शहरातील नागरीकांनी या नव्या दमाच्या लोकांना निवडून दिले आहे. पिण्याचे पाणी, रस्ते आणि स्वच्छता या मुलभूत सुखसूविधा यापुढील काळात कमी पडू दिल्या जाणार नाहीत. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात ज्या पध्दतीचे विकास कामे होतील त्याच पध्दतीची विकास कामे पराभूत नगरसेवकांच्या प्रभागातही केले जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी बोलताना अनिलदादा जगताप म्हणाले की, लोकांनी विश्वासाने आपल्याला निवडून दिलेले आहे. यापुढील काळात चांगल्या पध्दतीचे काम करून वचने पूर्ण करू असेही ते यावेळी म्हणाले. नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबविल्यामुळे आपल्याला हे घवघवीत यश मिळालेले आहे. अहंकारी व्यक्तिमत्वाला आपण त्यांची जागा दाखवून दिली असून बारामतीच्या धरतीवर बीड जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपण सर्व मिळून काम करू असे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे म्हणाले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात राष्ट्रवादीचे माध्यम प्रमुख भागवत तावरे म्हणाले की, बीड नगर परिषद निवडणुकीचा निकाल ही नव्या राजकारणाची नांदी आहे, शिवछत्र परिवाराच्या नेतृत्वावर लोकांनी टाकलेला विश्वास आपल्याला सार्थ करायचा आहे असेही ते यावेळी म्हणाले.

सामान्य लोकांच्या मतांचा आदर करत मुलभूत सुविधा आणि सुरक्षा देणार — आ.विजयसिंह पंडित

बीड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या महायुतीला बीडकरांनी आश्वासक आणि अपेक्षित प्रतिसाद दिला आहे. हा विजय पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कारभार आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे. बीडकरांनी विकासाच्या भुमिकेवर विश्वास ठेऊन युतीला दिलेला हा जनाधार आहे. प्रचाराच्या दरम्यान सामान्य लोकांनी नागरी सुविधा संदर्भात विविध मागण्या केल्या. त्यावर आम्ही येणाऱ्या काळात काम करणार असून सामान्य लोकांच्या मतांचा आदर करत मुलभूत सुविधा आणि सुरक्षा आम्ही देऊ. मागील काळात लोकांना वेठीस धरण्याचे काम प्रस्थापितांकडून केले जात होते. नगर परिषदेच्या सत्तेच्या माध्यमातून लोकांची अडवणुक केली जात होती. त्याला आता पूर्णविराम मिळाला असून येणाऱ्या काळात लोकांची कसलीही अडवणुक यापुढे होणार नाही असा विश्वास आ. विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केला. नगर परिषद निवडणुकीच्या विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता ताई पारवे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष सुहास पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपराव गोरे, राजेंद्र राऊत, बळीराम गवते यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जवळगाव खून प्रकरणाचं गुढ उकललं; ज्याने सांभाळलं त्यानेच मारून टाकलं

0

बीड — अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव शिवारातील गायरान जमिनीत सापडलेल्या अनोळखी प्रेताचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेला दोन दिवसात यश आले.कौटुंबिक वाद आणि मृताच्या त्रासाला कंटाळून त्याच्याच वडिलांच्या सख्ख्या साडूने भाडोत्री मारेकऱ्यांच्या मदतीने हा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
बर्दापूर पोलीस ठाण्यांतर्गत जवळगाव शिवारात 18 डिसेंबर रोजी अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता या व्यक्तीचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्ट वरून समोर आले. त्यानंतर अज्ञात लोकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली. एलसीबीने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख स्वप्निल ऊर्फ चिंगू अशोक ओव्हाळ वय 30 वर्ष,रा.रेणापूर, जि. लातूर अशी पटवली. तपासादरम्यान पोलिसांना संशय आल्याने त्यांनी स्वप्निलचा नातेवाईक गोरोबा मधुकर डावरे याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, खुनाचे धक्कादायक कारण समोर आले.स्वप्निल हा गोरोबा डावरे याच्या साडूचा मुलगा होता. साडू आणि साळपिण्याचे निधन झाल्यामुळे गोरोबाच स्वप्निलचा पालक म्हणून सांभाळ करत होता. स्वप्निलचे लग्नही गोरोबानेच लावून दिले होते. मात्र, स्वप्निलला दारूचे व्यसन होते. तो दारू पिऊन पत्नीला आणि गोरोबाला सतत त्रास द्यायचा. एकदा तर त्याने गोरोबाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला होता.याच रागातून गोरोबाने स्वप्निलचा काटा काढण्याचे ठरवले.गोरोबाने लातूर आणि नांदेड येथील तीन साथीदारांच्या मदतीने स्वप्निलला रेणापूरहून जवळगाव येथे आणले. तिथे त्याला बेदम मारहाण करून गळा आवळून त्याची हत्या केली आणि मृतदेह शेतात फेकून दिला. या प्रकरणात पोलिसांनी गोरोबा मधुकर डावरे वय 45 वर्ष, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई, संतोष लिंबाजी मांदळे वय 34 वर्ष, रा. लातूर, किशोर गोरोबा सोनवणे वय 29 वर्ष, रा. लातूर, अमोल विनायक चव्हाण वय 26 वर्ष, रा. नांदेड या आरोपींना अटक केली आहे. दरम्यान ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांचे मार्गदर्शना खाली स पो नि ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताने पोलीस अंमलदार सचिन आंढळे, विकी सुरवसे, चालक अतुल हराळे यांनी केली.