Home Blog Page 183

शरद पवारांची निवडणूक आयोगाने फेटाळली चिन्हाची मागणी

0

नवी दिल्ली — निवडणूक आयोगाने आज 15ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. अनेक दिवसांपासून या निवडणूकांच्या तारखांची सर्व राजकीय पक्षांकडून वाट पाहिली जात होती.

दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा करण्यात आले आहे.

यादरम्यान निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला. तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्ह फ्रीज करणार का? कारण तशी अशी शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आली होती‌.
यावर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 2 मागण्या केल्या होत्या, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लहान आहे ते मोठं करण्याची पहिली मागणी त्यांनी केली होती. दुसरी मागणी त्यांनी पिपाणी हे चिन्ह फ्रीज करण्याची केली होती. पहिली मागणी आम्ही मान्य केली आहे. आम्ही त्यांना लिखित स्वरूपात विचारल होतं की तुमचं चिन्ह कसं असाव ते सांगा.. त्यांनी दिलेल्या आकारातील पाहिला आकार आम्ही मान्य केला आहे. पिपाणी हे चिन्ह पूर्ण वेगळं आहे… त्याला आम्ही हात लावला नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.

विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजलं 20 नोव्हेंबरला मतदान

0

नवी दिल्ली — निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरलाच निकाल लागणार आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

आज 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसाठी पत्रकार परिषद घेत असल्याचं निवडणूक आयोगानं पत्रक प्रसिद्ध केलं आहे. प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया कधी सुरू होते, तर निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यावर. निवडणूक आयोगानं विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आचारसंहिता लागू होते. आता हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता काय असते? अशा आचारसंहितेची गरज काय? यातले नियम काय सांगतात? जाणून घेऊयात.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये किती मतदार आहेत? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार असतील. येथे 5 कोटी पुरुष मतदार आहेत. येथील एक लाख मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात प्रत्येक बूथवर सुमारे 960 मतदार असतील. मुंबईत मतदान केंद्र वाढवण्यात आले आहेत.

राजीव यांनी सांगितले की झारखंडमध्ये 2 कोटी 60 लाख मतदार आहेत. येथे 1 कोटी 31 लाख पुरुष तर 1 कोटी 29 लाख महिला मतदार आहेत. झारखंडमध्ये 29 हजार 562 बूथवर मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत?

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत, त्यापैकी बहुमतासाठी 145 जागा आवश्यक आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54, काँग्रेसला 44 आणि इतरांना 29 जागा मिळाल्या होत्या.

झारखंडमध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत?

झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) 30 जागा जिंकल्या होत्या आणि भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या, तर 26 जागा इतर पक्षांना गेल्या होत्या. निवडणुकीत झामुमो सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता.

मतदानासाठी महत्त्वाच्या घोषणा

जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी आपले प्रयत्न राहाणार असल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. सिनिअर सिटिझन्स आणि दिव्यांग व्यक्तींना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेचं व्हिडिओ शुटिंग केलं जाणार आहे. मतदान केंद्राबाहेर जास्त रांग असेल तर मतदारांच्या सुविधेसाठी खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदावारांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. पैसे, मद्य, ड्रग्स वाटप्यावर कडक नजर ठेवली जाणार आहे. मतदान केंद्र दोन किलोमीटरच्या आत असावेत असं सूचना करण्यात आल्या आहेत.

पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या

यूपीमध्ये 13 नोव्हेंबरला 9 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये 20 नोव्हेंबरला विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

वायनाडमध्ये 13 नोव्हेंबरला लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.

पोटनिवडणुकीचा निकालही 23 नोव्हेंबरला लागणार आहे.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये किती मतदार आहेत? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार असतील. येथे 5 कोटी पुरुष मतदार आहेत. येथील एक लाख मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात प्रत्येक बूथवर सुमारे 960 मतदार असतील. मुंबईत मतदान केंद्र वाढवण्यात आले आहेत.

भगवानगडाचे चतुर्थ महंत कृष्णा महाराज शास्त्री

0

शिरूर — पाथर्डी  तालुक्यातील एकनाथवाडी येथील श्री क्षेत्र निरंजन संस्थानचे महंत ह. भ. प. श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांची श्री क्षेत्र भगवानगडाचे चतुर्थ उत्तराधिकारी (महंत) पदी श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी त्यांचा पुढील उत्तरधिकारी म्हणून कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड केली आहे.असून त्यांना सोमवारी एकनाथवाडी या ठिकाणाहून ग्रामस्थांनी सकाळी ८ वाजता रथामध्ये बसवून ढोल ,ताशा, टाळ, मृदंग, हरी नामाचा जयघोष करत महिला भगिनी व पुरुष मंडळी हातामध्ये झेंडे, पताका घेऊन कृष्णा महाराज यांना भगवानगडावरती पोहोचवले. एकनाथ वाडी पासून निघाल्यानंतर रस्त्यामधील मुंगसवाडे, श्रीपतवाडी ,मालेवाडी, खरवंडी कासार, किर्तनवाडी या ठिकाणी कृष्णा महाराज शास्त्री यांचे लोकांनी भव्य असे स्वागत करण्यात आले. रस्त्याने जिकडे तिकडे गर्दीच गर्दी होती. ठिकठिकाणी जेसीबीच्या साह्याने फुलाचा वर्षावही करण्यात आला. श्री संत भगवान बाबा की जय, नामदेव महाराज शास्त्री की जय अशा घोषणा देत सर्व भाविक मंडळी भगवान गडाकडे पायी वाटचाल करत होती.

कृष्णा ‌महाराज यांच्या विषयी सांगायचे म्हणजे त्यांचे मूळ गाव तेलंगणा असून ते बारा वर्षांपूर्वी भगवानगडावरती आले. ज्ञानेश्वरी चे संपूर्ण शिक्षण भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठामध्ये झाले. त्यांचे
एम ए पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. त्यांनी बारा वर्षे ज्ञानेश्वर चे संपूर्ण शिक्षण डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडून घेतले आहे. त्यांना तीन वर्षांपूर्वी एकनाथवाडी येथील निरंजन संस्था या ठिकाणी महंत म्हणून राहिले आहेत. भगवान गडावरील उत्तराधिकारी या विषयीचे ऑफिसिली ठराव झालेले आहेत. गडावरती श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मंदिराचे काम सुरू असून ते काम 2026 ला पूर्ण होणार आहे. त्याच वर्षी भगवानगडाचा अमृत महोत्सव असून या अमृत महोत्सवामध्ये नवनियुक्त महंत कृष्णा महाराज शास्त्री यांना गादीचे हस्तांतर करण्यात येईल असे डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले. पुढील काळामध्ये कृष्णा महाराज शास्त्री हे भगवानगड व भगवानगडाचा विकास करतील याचा संपूर्ण विश्वास मला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड केली आहे. भविष्यामध्ये अशाच माणसाची गरज भगवानगडाला आहे. अशा पद्धतीचा शब्दही त्यांनी मला दिला आहे, असे यावेळी शास्त्री यांनी सांगितले. एकनाथवाडी ग्रामस्थांनी कृष्णा महाराज शास्त्री अचानक गडावरती नियुक्त झाल्यामुळे त्यांच्यामध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले. परंतु एकीकडे त्यांना आनंद झाला.

यावेळी दोन ते तीन हजार महिला भगिनी, पुरुष मंडळी, संत मंडळी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता कृष्णा महाराज हे भगवानगड वरती पोहोचल्यानंतर भगवानगडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी जी महाराज यांनी एकनाथवाडी ग्रामस्थ यांचे भगवान बाबांची प्रतिमा देऊन स्वागत केले. या स्वागतावेळी भगवानगडाचे संपूर्ण विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

तलाठी ग्राम महसूल अधिकारी तर कोतवाल महसूल सेवक म्हणून ओळखला जाणार

0

बीड — महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने केलेल्या मागणीनुसार तलाठी गट क संवर्गानुसार पद नामात बदल करण्यात आला असून यापुढे तलाठी हा ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखला जाणार आहे. तर कोतवालांना यापुढे महसूल सेवक म्हणून ओळखले जाणार आहे. या संदर्भातील शासनादेश 14 ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या विविध कलमानुसार अनेक जबाबदाऱ्या तलाठ्यांना पार पाडाव्या लागतात. महसूल विभाग व शेती यांच्यातील महत्त्वाचा दुवा‌ म्हणून तलाठी ओळखला जातो. मात्र महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने केलेल्या मागणीनुसार तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी अशी नवी ओळख या पदाला मिळणार आहे. अटींच्या अधीन राहून या नव्या पदनामाला मान्यता देण्यात आली आहे. पदनाम बदलामुळे भविष्यात वेतनश्रेणी वाढी संदर्भात प्राप्त होणारी कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही पदनाम बदलानंतर वेतनश्रेणी/वेतनस्तर देण्याच्या अनुषंगाने भविष्यात वेतन त्रुटी समिती पुढे मागणी करता येणार नाही व ती विचारात घेतली जाणार नाही. सातव्या वेतन आयोगानुसार तलाठी पदाचीच वेतनश्रेणी लागू राहणार आहे. तिच्यात बदल करण्याची मागणी विचारात घेतली जाणार नाही. तसेच तलाठी पदाच्या गट क संवर्गात कोणताही बदल होणार नाही. अशा अटी घालून पदनामात बदल करण्यात आला आहे.
याबरोबरच ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या कोतवाल पदाचे पदनाम महसूल सेवक करण्यात आले आहे. तीन जुलै 2024 रोजी कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करणे व इतर मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीतील निर्देशानुसार अप्पर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची 29 ऑगस्ट 2024 रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतील शिफारशीनुसार महसूल सेवक म्हणून नवी ओळख कोतवालांना मिळणार आहे. मात्र या पदनाम बदलामुळे भविष्यात शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही. कोतवाला मानधनामध्ये तसेच सेवा विषयक बाबी मध्ये कोणताही बदल अथवा मागणी विचारात घेतली जाणार नसल्याचे 14 ऑक्टोबर रोजी शासनाने काढलेल्या शासनादेशात म्हटले आहे.

दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

0

मुंबई -मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले.काही महिन्यां पूर्वीच  ते कँसरसारख्या आजारातून बरे झाले. या कठीण काळात त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्या जिद्दीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. मात्र,आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली. अतुल परचुरे यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी छाप पाडली होती.

अतुल परचुरे यांनी पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा व्यक्ती आणि वल्लीमध्ये हुबेहुब साकारली होती. अतुल परचुरे यांचं ‘नातीगोती’ हे नाटक चांगलंच गाजलं. यावेळी त्यांच्याबरोबर दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू असे दिग्गज कलाकार होते.
अनेक मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. ‘वासूची सासु’, ‘प्रियतमा’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केलं. ‘सलाम-ए-इश्क’, ‘पार्टनर’, ‘ऑल द बेस्ट: फन बिगिन्स’, ‘खट्टा मीठा’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली.अलिबाबा आणि चाळीशीतले चोर हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा मराठी चित्रपट होता. याशिवाय ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं.दरम्यान, अतुल यांनी एका मुलाखतीद रम्यान सांगितलं होतं की, त्यांच्या यकृतामध्ये 5 सेंटीमीटर लांबीची कर्करोगाची गाठ असल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. त्यावर डॉक्टरांनी त्यांची तब्येत ठीक होईल असं सांगितलं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला. सुरुवातीला आजार न दिसल्यामुळे त्यांच्या स्वादुपिंडावर परिणाम झाला आणि चुकीच्या उपचारांमुळे आणखीनच त्यांची परिस्थिती बिकट झाली होती. अशातच डॉक्टरांनी त्यांना दीड महिना वाट पाहायला सांगितली होती. मात्र, अतुल यांनी डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार सुरू केले होते.अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी समोर येताच कलाविश्व हादरून गेलं आहे.

एसटीची दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा

0

मुंबई — दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळा कडून दरवर्षी 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो.

यंदा देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांना दिलासा देत एसटी महामंडळानं भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्याभरात एसटीनं प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे.

हंगामी भाडेवाढीचा निर्णय रद्द करण्यात आल्यानं महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम मिळणार नाही. भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्याचा प्रवास महागणार होता. आता मात्र त्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक कुटुंबे गावी, पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे बेत आखतात. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करते. दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करत असते. महामंडळाच्या धोरणानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार आहे. गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ केली जात असते, त्या प्रमाणं या वर्षी देखील निर्णय घेण्यात आला होता. आता तो निर्णय रद्द करण्यात आला आहे.
यंदा देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. एसटीची प्रस्तावित 10 टक्के भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होती. मात्र, ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरीकरीता भाडेवाढ लागू करण्यात आलेली नव्हती.
सध्या दिवसाला सुमारे 23 ते 24 कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न महामंडळाला मिळते. हंगामी भाडेवाढीमुळे दिवसाचे उत्पत्र 6 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे महिन्याभरात महामंडळाला 950 ते एक हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, सध्या घेण्यात आलेल्या सध्या महिन्याला 850 कोटी रुपये महामंडळाला उत्पन्न मिळते.दिवाळीमधील सणांच्या काळात सर्वसामान्य प्रवासी एसटीला प्राधान्य देत असतात. 10 टक्के हंगामी भाडेवाढ केल्यानं प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, यंदा एसटीच्या निर्णयामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

धक्कादायक! वैद्यनाथ मंदिराच्या शिखराची तोडफोड

0

परळी — बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परळीच्या माजी नगराध्यक्षांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काळसापर्यंत जाऊन तोडफोड केली आहे. दसऱ्याच्या दिवशी सकाळी ही घटना घडली आहे.
मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने अनेक बंधन घातली आहेत. मात्र परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यासह आठ ते दहा जणांनी विजया दशमीच्या दिवशी सकाळी वैद्यनाथ मंदिर कमिटीच्या कार्यालयासमोर असलेल्या गेटचे कुलूप तोडून शिखरावर पोहोचले. यानंतर हातोड्याने शिखराच्या पूर्व बाजूची भिंत फोडून दीपक देशमुख आपल्या साथीदारांसह आत घुसले. याचा व्हिडिओ दीपक देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
शिखराच्या तोडफोडप्रकरणी मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कमिटीच्या कार्यालयास माहिती दिली, त्यामुळे बाबासाहेब देशमुख यांनी तात्काळ याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रविवारपर्यंत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, याप्रकरणी लेखी तक्रार आल्याचे परळी शहराचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी सांगितले.
दरम्यान घडलेल्या घटनेबद्दल दीपक देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,पंचम ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ येथे दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर कळसातील महादेव दर्शन शिव भक्तांसाठी खुले केले. अनेक वर्षापासून बंद असलेल्या कळसातील भुयारात महादेवाची पिंड बंदिस्त होती. अनेक दिवसांपासून भक्तांची व माझी मागणी होती की, हे द्वार दर्शनासाठी खुले करावे. वैद्यनाथ देवल कमिटीच्या विश्वस्तांना अनेकवेळा निवेदन दिले, परंतु काहीही दाद न दिल्यामुळे मी व माझ्या सहकारी शिवभक्तांनी मंदिरात असणाऱ्या कळसातील महादेव दर्शन सर्वांसाठी खुले केले आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी!

0

मुंबई — राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरू आहे.

शनिवारी रात्री म्हणजेच दसऱ्याच्या रात्री ही गोळीबाराची घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालया समोरच शनिवारी रात्री सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची माहिती समोर येत आहे. करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या हत्येच्या तपासासाठी जवळपास पाच ते सहा पथक गुन्हे शाखेकडून तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर हा हल्ला कोणी केला असेल, यामागे कारण काय आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. एसआरएच्या प्रकल्पासंबंधीच्या कथित वादामुळे त्यांची हत्या झाली असावी असाही अनेकांचा दावा होता. मात्र, आता लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. हिंदी भाषेतील पोस्ट टाकून बिश्नोई गँगने ही हत्या आम्ही केल्याचं म्हटलं आहे.
आम्हाला सलमान खानसोबत कोणतेही युद्ध नको होते, पण बाबा सिद्दीकींच्या हत्येचे कारण त्यांचे दाऊद इब्राहिम यांच्याशी असलेले संबंध होते. बाबा सिद्दीकी यांची कथित शालीनता हा निव्वळ भ्रम आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिम सोबत मकोका कायद्यातही त्याचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. सलमान खान आणि दाऊदच्या टोळीला जो कोणी मदत करेल त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असा दावा बिश्नोई गँगने केला आहे.

२५० सोलर हायमास्टने बीड शहर उजळणार

0

 

 

डीपीसीतून ६ कोटींचा निधी; ना.धनंजय मुंडे यांचे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले आभार

बीड — शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी डीपीसीतून ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून २५० सोलर हायमास्ट बसविण्यात येणार असल्याने शहर उजळणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून निधी मिळाला असून पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. त्यातील अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. अलिकडे शहरातील अनेक भागात पथदिवे बंद असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. हे पथदिवे सुरू करून अंधार दूर करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. या मागणीची दखल घेऊन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर डीपीसीतून ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्यातून २५० सोलर हायमास्ट बसविण्यात येणार आहेत. तसेच, शहरातील अनेक जुन्या पोलवरील एलईडी पथदिवे बंद आहे. त्याठिकाणी देखील एलईडी पथदिवे बसविले जाणार आहेत. या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून दिवाळीच्या आधीच बीड शहर उजळणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

बीड मतदारसंघात कोट्यवधींची कामे सुरू

बीड विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे प्रत्यक्षात सुरू आहेत. अनेक कामे पूर्णत्वास गेली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. रस्ते, नाल्या, पथदिव्यांसह विजेची कामे, सभागृह, अंगणवाडी, दवाखान्यांसह विविध दुरुस्तीच्या कामांचा देखील यामध्ये समावेश आहे. या कोट्यवधींच्या विकासकामांसाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला आहे.

पाच वर्षात जमलं नाही ते विजयसिंहांनी महिनाभरात करुन दाखविले

0

गेवराई तालुक्यातील १२०६० निराधारांचे अर्ज मंजुर

गेवराई — तालुक्यातील निराधारांच्या प्रश्नांवर सातत्याने राजकीय पोळी भाजण्याचे काम आजवर सत्ताधार्‍यांकडुन होत होते. राज्यातील सत्तांतरानंतर विजयसिंह पंडित यांनी राजकीय प्रतिष्ठापणाला लावुन संजय गांधी निराधार अनुदान समितीचे गठण केले. दादासाहेब घोडके यांच्या अध्यतेखालील समिती कार्यरत होताच त्यांनी अतिशय तत्परतेने निराधारांची प्रकरणे हाताळली.

प्रशासकीय यंत्रणेला समिती सदस्यांनी अक्षरश: खांद्याला खांदा देवुन दिवसरात्र एक करत गेवराई तालुक्यातील प्राप्त झालेल्या १५६३० एकुण अर्जांची बारकाईने तपासणी करुन १२०६० अर्ज मंजुर करत खर्‍या अर्थाने निराधारांना न्याय देण्याचे काम केले. विरोधकांना सत्तेत असतांनाही पाच वर्षात जे जमलं नाही ते विजयसिंह पंडित यांनी महिण्याभरात करुन दाखविल्याची चर्चा गेवराई तालुक्यात आहे.

गेवराई तालुक्यातील निराधारांचा प्रश्न सातत्याने एैरणीवर आला की, त्यावर राजकीय वाद आजवर होत आले आहेत. केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी अक्षरश: विधवा, दिव्यांग आणि निराधारांना तहसिल कार्यालयात बोलावुन आमदारांच्या हाताने मंजुरी पत्र वाटप करण्याचे केविलवाने प्रकारही आजवर गेवराईत घडलेले आहेत. निराधारांमध्ये सुद्धा राजकारण करुन विशिष्ट गटाच्या लोकांना प्राधान्य देण्याचे प्रकार यापुर्वी घडले होते. लाच घेवुन अर्ज मंजुर केलेल्याचे आरोप यापुर्वीच्या समितीवर मोठ्या प्रमाणावर झाले. बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी मोठा मोर्चा काढुन या प्रश्नाला वाचा फोडली होती. शेवटी राज्यातील सत्तांतरानंतर त्यांनी राजकीय प्रतिष्ठापणाला लावुन पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन नविन समिती गठीत केली. दादासाहेब घोडके यांच्या अध्यक्षतेखाली नवनियुक्त समिती सदस्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत तहसिल कार्यालयात आजवर प्रलंबित असलेल्या सुमारे १५६३० अर्जांची प्रत्यक्ष तपासणी केली.

गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीने दि. २० सप्टेंबर रोजीच्या बैठकीत १२०६० अर्ज मंजुर केले आहेत. यामध्ये श्रावण बाळ निराधार ६८७४, संजय गांधी निराधार ५१५४ आणि इंदिरा गांधी वृद्धपकाळ निराधार योजने मधील ३२ अर्जांचा समावेश आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज मंजुर करण्याची गेवराई तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. समिती सदस्यांनी लाभार्थ्यांकडुन कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे विरोधकही आमच्यावर आरोप करु शकत नाहीत. तालुक्यातील निराधारांना यामुळे खर्‍या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना समितीचे अध्यक्ष दादासाहेब घोडके यांनी व्यक्त केली. त्यांनी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, माजी आ. अमरसिंह पंडित आणि बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले. यावेळी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर नवले, सरवर पठाण, भारत गर्जे, बळीराम शिंदे, गोकुळ चोरमले, शाहीन पठाण, अनिरुद्र तौर, अंबादास सांगळे, शामसुंदर शिंदे आदींची उपस्थिती होती. गेवराई तालुक्यातील निराधारांकडुन आनंद व्यक्त करण्यात येत आहे.