Home Blog Page 163

मुकबधीर,गतीमंद पंचवीस वर्षीय मुलीवर चौघांचा बलात्कार; दोघांना अटक

0

आष्टी — मूकबधिर व गतिमंद 25 वर्षीय मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून दोन जण अद्याप फरार आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सपोनि मंगेश साळवे यांना 25 वर्षीय गतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याची गोपनीय माहिती फोनवरुन मिळाली. सपोनि साळवे यांनी तात्काळ पोउपनि देवदास सातव, पोलीस अंमलदार सुदाम पोकळे यांना घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी पीडित मुलीसह तिच्या आई वडीलांना पोलिस ठाण्यात आणून घडलेल्या घटनेची माहिती देऊन तक्रार नोंदवणे बाबत सांगीतले. मात्र पीडितेच्या आई-वडीलांनी तक्रार देण्यास नकार दिला. या घटनेची माहिती सपोनि साळवे यांनी पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मिना यांना दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिडीतेची वैद्यकीय तपासणी करुन सरकार तर्फे पोउपनि देवीदास सातव यांच्या फिर्यादीवरुन अंभोरा पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून अवघ्या दोन तासात दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळून गजाआड केले. उर्वरित फरार दोघांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याची माहिती अंभोरा पोलिसांनी दिली आहे.

पावसाची परतीच्या दिशेने वाटचाल — हवामान विभाग

0

पुणे — राजस्थानमधून सरासरीपेक्षा सात दिवस उशिराने परतीचा प्रवास सुरू करणाऱ्या मोसमी पावसाने महाराष्ट्रातून मात्र नियोजित वेळेत परतीचा प्रवास सुरू केला आहे. शनिवारी (५ ऑक्टोबर) नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पाऊस माघारी फिरला आहे.

हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेत म्हणजे १० ऑक्टोबरपर्यंत मोसमी वारे राज्यातून माघारी परतण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण राजस्थानमधून सरासरी १७ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाचा माघारीचा प्रवास सुरू होतो. मात्र यंदा सात दिवस उशिराने २४ सप्टेंबरपासून माघारीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर एक दिवस २४ सप्टेंबरपर्यंत माघारीचा प्रवास सुरू राहिला. राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून मोसमी पाऊस माघारी फिरला होता. त्यानंतर मोसमी पावसाचा परतीचा प्रवास रेंगाळला. त्यानंतर दोन तारखेला पुन्हा काही भागांतून मोसमी पाऊस माघारी फिरला, दोन ऑक्टोबरपर्यंत मोसमी पावसाने लेह, लडाख, जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांतून माघार घेतली होती. चार ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मोसमी पावसाचा परतीचा प्रवास रेंगाळला. आज, शनिवारी (५ ऑक्टोबर) रोजी आणखी काही भागातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे. संपूर्ण गुजरात,

उत्तराखंडसह मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधून मोसमी पावसाने माघार घेतली आहे. राज्यातील नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे.

महाराष्ट्रातून माघारीचा प्रवास सुरू झाला आहे. राज्यातून सरासरी पाच ऑक्टोबर रोजी मोसमी पावसाची माघारीची प्रक्रिया सुरू होते आणि १० ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मोसमी वारे पूर्णपणे माघारी जातात. यंदा नियोजित वेळेत मोसमी पावसाचा माघारीचा प्रवास सुरू झाला आहे. पोषक हवामान राहिल्यास १० ऑक्टोबरपर्यंत माघारीचा प्रवास पूर्ण होण्याचा अंदाज आहे. अगदीच माघारीचा प्रवास लांबला तर १५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मोसमी पाऊस पूर्णपणे माघारी जाण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, हवामान विभागाने रविवारी (६ ऑक्टोबर) संपूर्ण कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.

ऐतिहासिक, प्राचीन वास्तूंचे नुकसान केल्यास मिळणार “ही” शिक्षा

0

मुंबई — राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांच्या तुरूंगवासाची तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अशा वास्तूंना हानी पोहचवून त्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात येत आहे.

सध्या, महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पूराण वस्तूशास्त्र विषयक स्थळे व अवशेष नियम १९६० (१९६१चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१२) मधील तरतुदींनुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगावस किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. १९६० सालापासून या दंडात वाढ झालेली नाही. या कायद्यात कठोर तरतुदींचा आवश्यकता आहे. केंद्र शासनाच्या १९५८च्या अधिनियमातील सुधारणांशी सुसंगत अशा तरतूदी करणे आवश्यक असल्याने हा वाढीव शिक्षेचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

शरद पवारांची नवी रणनीती; बीड जिल्ह्यातील इच्छुकांच्या झाल्या मुलाखती

0

पुणे –मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याने लोकसभेला आरक्षणाच्या मागणीचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणावर बसला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मराठवाड्यात उमेदवार निवडीसाठी मोठी रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे.आज बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत पुण्यात शरद पवार स्वत:मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेताना दिसले आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराशी शरद पवार स्वत: चर्चा करत आहेत. शरद पवार यांच्या कार्यपद्धत पाहिली तर त्याच्यासाठी कुणी लहान किंवा मोठा नाही. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. त्या प्रत्येकाशी शरद पवार स्वत: भेटणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सर्वांचे ऐकूण घेतल्यानंतरच ते कुणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय घेतील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.आज बजरंग सोनावणे यांच्या मतदारसंघातील उमेदवारीसाठी मुलाखती घेतल्या. ज्या ज्या ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षांचे आमदार- खासदार आहेत, त्यांची मते विचारात घेऊनच निर्णय घेतले जाणार आहेत. पण ज्यांनी ज्यांनी इच्छुक म्हणून अर्ज केलाय त्यांचाही मानसन्मान होणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून आंदोलनाला सुरुवात केली. त्यावेळी आंतरवली सराटीत उपोषणस्थळी लाठीमार झाला, त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरले. लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्यांचे गंभीर परिणाम पाहायला मिळाले. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

38 बिर्याणी हाऊस वर पोलिसांची छापेमारी; साडेचार लाखाची दारू जप्त

0

बीड — जिल्ह्यातील 38 बिर्याणी हाऊस वर पोलिसांनी आज छापेमारी करत साडेचार लाख रुपयाची अवैध दारू जप्त केली. गेल्या अनेक दिवसापासून विनापरवाना दारू विक्री केली जात होती.

बीड शहर व जिल्ह्यात चालु असलेल्या बिर्याणी हाऊस मध्ये अवैधरित्या दारु विक्री तसेच ग्राहकांना अवैधरीत्या दारु पिण्यासाठी बिर्याणी हाऊस चालकांकडुन जागा उपलब्ध करुन दिल्या जात होती.याची गोपनिय माहीती बीड पोलीसांना मिळाली होती. त्यावरुन पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगाळ यांनी 4 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील बिर्याणी हाऊसवर छापे टाकुन करवाया करण्याच्या सुचना सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदारांमार्फत पोलीस ठाणे हद्दीतील 38 बिर्याणी हाऊसवर छापे टाकुन एकुण 4 लाख 43 हजार 155 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याप्रकरणी विनापरवाना अवैध दारु कब्जात बाळगणे, विक्री करणे तसेच विनापरवाना ग्राहकांना दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन देवुन गुत्ता चालवणे या कृत्यांसाठी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत एकुण ३८ गुन्हे दाखल करण्यात आले असुन एकुण 38 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहा. पोलीस अधीक्षक धिरजकुमार बच्चु, सहा. पोलीस अधीक्षक कमलेश मिना, उपविभागीय पोलीस अधिकारी बीड, विश्वांभर गोल्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई निरज राजगुरु, उपविभागय पोलीस अधिकारी अंबाजोगई अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.शितलकुमार बल्लाळ, शिवाजी बंटेवाड, मारुती खेडकर, एस.एम जाधव, मजहर सय्यद, बालक कोळी, प्रशांत महाजन, विनोद घोळवे, रामराव पडवळ, संभाजी ढोणे, सपोनि. मधुसुदन घुगे, सोमनाथ नरके, मंगेश साळवे, भार्गव सपकाळ, अमन शिरसट, अनिल खोडेवाड, भाऊसाहेब वाघमोडे, मच्छिद्र शेंडगे, अनमोल केदार, राजकुमार ससाणे व पोलीस अंमलदार यांच्या मदतीने यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली आहे.

तरुणांना रोजगार मिळवून देणाऱ्या अभ्यासक्रमासाठी आग्रही -डॉ.योगेश क्षीरसागर

0

नाळवंडी येथे भाऊसाहेब डावकर यांच्या पुढाकारातून ४० शाळांना संगणक वाटप

बीड — देशभरात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. स्पर्धेच्या युगात आपल्या विद्यार्थ्यांना टिकायचे असेल तर दर्जेदार शिक्षण देणे काळाची गरज बनली असून ती आपली जबाबदारी आहे. आपल्या शिक्षण संस्थांमध्ये तरुणांना रोजगार मिळवून देणारे विविध अभ्यासक्रम आणण्यासाठी आपण कायम आग्रही असतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे.

बीड तालुक्यातील नाळवंडी येथील निवासी आश्रमशाळेत शुक्रवारी (दि.५) जिल्हा परिषद गटातील ४० शाळांना संगणक संच वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.योगेश क्षीरसागर हे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ॲड.राजेंद्र राऊत हे होते. व्यासपीठावर अरुण लांडे, सुधीर काकडे, पंचायत समितीचे माजी सदस्य अच्युतराव शेळके, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्दीकी, युवा नेते अशोक वाघमारे, माजी नगरसेवक रमेश चव्हाण, सुनिल सुरवसे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम कातांगळे, माजेद कुरेशी, सरपंच भारत कानडे, सरपंच रवी गंगावणे, सरपंच तेजाब चव्हाण, अशोक वैद्य, बाबासाहेब शिंदे, शाम राऊत, बाळासाहेब डोळस, संजय काळे, बाळराजे राठोड, भगीरथ बांडे, मिलिंद ठोकळ, अभिमान गुंदेकर, प्रा.अमोल घुमरे, बाळू आमटे आदींची उपस्थिती होती.

डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, माझे सहकारी भाऊसाहेब डावकर यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकी म्हणून खाजगी कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून ४० संगणक संच जिल्हा परिषद शाळांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच तांत्रिक शिक्षण मिळेल. त्यातून विद्यार्थी अभ्यासू होतील. बीड विधानसभा मतदारसंघात स्व.केशरकाकू क्षीरसागर यांनी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा आणली. या क्षेत्रात अलीकडे अमुलाग्र बदल झाले आहेत. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि रोजगार मिळवून देणारे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आपण कायम आग्रही असतो, असेही डॉ.क्षीरसागर म्हणाले. यावेळी भाऊसाहेब डावकर यांचा सत्कार करून मान्यवरांनी नाळवंडी जिल्हा परिषद गटातील ४० शाळांना संगणक संच वितरित केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस दलात खांदेपालटाला सुरुवात!

0

बीड –निवडणुकांच्या अनुषंगाने बीड पोलीस दलात फेरबदल केले जाऊ लागले आहेत. चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी नारायण एकशिंगे यांना बदलण्यात आले असून आष्टी पोलीस ठाण्याचा कारभार शरद भुतेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

चकलांबा पोलीस ठाण्याचे वादग्रस्त प्रभारी नारायण एकशिंगे यांना हटवून त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेतून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना नियुक्त करण्यात आले आहे.नारायण एकशिंगे यांना वाचक उपविभागीय गेवराई येथे हलवण्यात आले आहे.आष्टी पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदी असलेल्या सोमनाथ जाधव यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना नियंत्रण कक्षात हलवण्यात आले आहे. त्यांच्या जागी शरद भुतेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी हे आदेश काढले.

‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना’ लागू

0

मुंबई — राज्य मंत्रिमंडाळाच्या आज झालेल्या बैठकीत ऊसतोड कामगारांसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे.यासह 33 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली होती. त्या अंतर्गत ऊसतोड कामगार आणि वाहतूकदार, मुकादम आदींसाठी संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा योजना प्रस्तावित केली होती. त्या योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील सुमारे 10 लाख ऊसतोड कामगारांना विम्याचे कवच

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 10 लाख ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम तसेच सुमारे दीड ते दोन लाख बैलजोड्या त्याचबरोबर कामगारांच्या झोपड्या यांना सुद्धा विम्याचे कवच मिळणार आहे. आज झालेल्या निर्णयानुसार ही योजना लागू करण्यात येत असून या योजनेचा संपूर्ण खर्च स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या भांडवलातून करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार, मुकादम, कारखाना यांपैकी कुणावरही या योजनेचा कसलाही आर्थिक भार राहणार नाही.राज्याच्या बीडसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यातील सुमारे 10 लाख ऊसतोड कामगार वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच शेजारील राज्यात कमीत कमी 6 महिने स्थलांतर करून उसतोडणीला जातात. ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत दिवसरात्र अत्यंत मेहनत आणि जोखमीचे काम त्यांना करावे लागते. ऊसतोडणी व वाहतुकीदरम्यान अनेक अपघात, विजेचा शॉक, सर्पदंश, वाऱ्या-पावसाने नुकसान, रस्ते अपघात यांसारख्या शेकडो समस्यांना तोंड देताना ऊसतोड कामगारांचे अनेकदा जीव जातात, अनेकजण कायमस्वरूपी अपंग होतात आणि त्यांच्या कुटुंबाचा आधार नाहीसा होतो.त्यामुळे या ऊसतोड कामगारांना, वाहतूक कामगारांना तसेच त्यांच्या पशूंना स्वतंत्र अपघात विमा योजना असावी, त्याद्वारे मृत्यू झाल्यास आर्थिक मदत, अपंगत्व आल्यास आर्थिक मदत व उपचार अशा निरनिराळ्या तरतुदी असाव्यात असे 2022 मध्ये धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत प्रस्तावित केले होते.

बदलापूरची माजलगावात पुनरावृत्ती: अंगणवाडीत चिमुरडीवर अत्याचार!

0

माजलगाव — बदलापूर अत्याचार प्रकरणा नंतरही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. याच प्रकरणाची पुनरावृत्ती माजलगाव मध्ये घडली आहे. पाच वर्षाच्या चिमुकलीवर अंगणवाडीत अत्याचार झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. या प्रकरणी एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून माजलगाव मध्ये देखील बदलापूर घटनेची पुनरावृत्ती झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. शहरालगत असलेल्या एका शाळेत अंगणवाडी आहे. त्यामध्ये परिसरातील लहान मुले-मुली दररोज येतात. या परिसरातीलच एक पाच वर्षाची चिमुरडी नियमित शाळेत येते. तिच्यावर शाळेतील एका अज्ञात इसमाने 27 सप्टेंबर रोजी मधल्या सुटीतील डबा खाल्यानंतर अत्याचार केला. घटनेनंतर चिमुरडी ताप येऊन आजारी पडली. त्यामुळे तिला दवाखान्यात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरने तपासणी केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पालकांनी मुलीला विचारले असता चिमुकलीने शाळेत पांढरे कपडे घातलेल्या व्यक्तीने घाणेरडे कृत्य केल्याचे पालकांना सांगितले. शाळेतील पांढरे कपडे घातलेला त्या माणसाला ओळखत असल्याच चिमुरडीने सांगितले.या माहितीने हादरलेल्या पालकांनी गुरुवारी थेट माजलगाव शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचार पाॅस्को एक्ट नूसार गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ व त्यांचे सहकारी करत आहेत. या घटनेने मात्र जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

बापू आंधळे खून प्रकरणातील सहा आरोपींना जामीन

0

छत्रपती संभाजी नगर — परळीतील मरळवाडी चे सरपंच बापूराव आंधळे खून प्रकरणातील सहा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस जी मेहरे यांनी जामीन मंजूर केला आहे.

गाजलेल्या या बहुचर्चित खून प्रकरणी ग्यानबा उर्फ गोट्या गिते यांच्या फिर्यादीवरुन परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीत म्हटले होते की, 29 जुन 2024 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आरोपी महादेव गिते यांच्या घरासमोर बापुराव आंधळे यांना पैसे घेण्यासाठी बोलावले होते.
त्यानंतर आरोपी शशिकांत उर्फ बबन गिते व इतरांनी कट रचून बापुराव आंधळे याचा गोळया घालून खुन केला.त्याचप्रमाणे फिर्यादी ग्यानबा गिते यांच्यावरही गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरुध्द कलम 302, 307, 120 (ब), 201 भारतीय दंड विधान अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात सहा आरोपींना अटक करण्यात आली होती.
या सहा आरोपींचा जामीन अर्ज अंबाजोगाई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यातील पाच आरोपींनी ॲड. सुदर्शन जी. साळुंके यांच्यामार्फत तर एकाने ॲड. पी. पी. मोरे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. ॲड. साळुंके यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना आरोपींना केवळ राजकीय कारणास्तव अटक केल्याचे सांगीतले.तर न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे की, सरकार पक्षातर्फे आरोपी विरुध्द केलेले आरोप अविश्वसनीय आहेत. अर्जदार आरोपी हे प्रत्यक्ष मारेकरी नाहीत. गुन्ह्याचा तपास पुर्ण झालेला असून आरोपी हे जामीनावर सोडण्यास पात्र आहेत. सुनावणी नंतर न्यायालयाने आसाराम गव्हाणे, मयुर कदम, अनिल सोनटक्के, ज्योतीराम औताडे, रोहित गायकवाड, रजतकुमार जेधे या सहा जणांचा प्रत्येकी 50 हजाराच्या जात मुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात आरोपींतर्फे ॲड. सुदर्शन जी. साळुंके व ॲड. पी.पी. मोरे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील ॲड. ए. बी. गिरासे यांनी काम पाहिले. बीड जिल्ह्यातील परळीच्या बॅंक काँलनीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गिते याचाही समावेश होता. गिते हा खून झाल्यापासून अद्याप फरार आहे. सरपंच बापू आंधळे यांची आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.