Home Blog Page 161

तलाठी ग्राम महसूल अधिकारी तर कोतवाल महसूल सेवक म्हणून ओळखला जाणार

0

बीड — महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने केलेल्या मागणीनुसार तलाठी गट क संवर्गानुसार पद नामात बदल करण्यात आला असून यापुढे तलाठी हा ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखला जाणार आहे. तर कोतवालांना यापुढे महसूल सेवक म्हणून ओळखले जाणार आहे. या संदर्भातील शासनादेश 14 ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या विविध कलमानुसार अनेक जबाबदाऱ्या तलाठ्यांना पार पाडाव्या लागतात. महसूल विभाग व शेती यांच्यातील महत्त्वाचा दुवा‌ म्हणून तलाठी ओळखला जातो. मात्र महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने केलेल्या मागणीनुसार तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी अशी नवी ओळख या पदाला मिळणार आहे. अटींच्या अधीन राहून या नव्या पदनामाला मान्यता देण्यात आली आहे. पदनाम बदलामुळे भविष्यात वेतनश्रेणी वाढी संदर्भात प्राप्त होणारी कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही पदनाम बदलानंतर वेतनश्रेणी/वेतनस्तर देण्याच्या अनुषंगाने भविष्यात वेतन त्रुटी समिती पुढे मागणी करता येणार नाही व ती विचारात घेतली जाणार नाही. सातव्या वेतन आयोगानुसार तलाठी पदाचीच वेतनश्रेणी लागू राहणार आहे. तिच्यात बदल करण्याची मागणी विचारात घेतली जाणार नाही. तसेच तलाठी पदाच्या गट क संवर्गात कोणताही बदल होणार नाही. अशा अटी घालून पदनामात बदल करण्यात आला आहे.
याबरोबरच ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या कोतवाल पदाचे पदनाम महसूल सेवक करण्यात आले आहे. तीन जुलै 2024 रोजी कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करणे व इतर मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीतील निर्देशानुसार अप्पर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची 29 ऑगस्ट 2024 रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतील शिफारशीनुसार महसूल सेवक म्हणून नवी ओळख कोतवालांना मिळणार आहे. मात्र या पदनाम बदलामुळे भविष्यात शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही. कोतवाला मानधनामध्ये तसेच सेवा विषयक बाबी मध्ये कोणताही बदल अथवा मागणी विचारात घेतली जाणार नसल्याचे 14 ऑक्टोबर रोजी शासनाने काढलेल्या शासनादेशात म्हटले आहे.

दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

0

मुंबई -मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले.काही महिन्यां पूर्वीच  ते कँसरसारख्या आजारातून बरे झाले. या कठीण काळात त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्या जिद्दीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. मात्र,आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली. अतुल परचुरे यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी छाप पाडली होती.

अतुल परचुरे यांनी पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा व्यक्ती आणि वल्लीमध्ये हुबेहुब साकारली होती. अतुल परचुरे यांचं ‘नातीगोती’ हे नाटक चांगलंच गाजलं. यावेळी त्यांच्याबरोबर दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू असे दिग्गज कलाकार होते.
अनेक मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. ‘वासूची सासु’, ‘प्रियतमा’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणूनही काम केलं. ‘सलाम-ए-इश्क’, ‘पार्टनर’, ‘ऑल द बेस्ट: फन बिगिन्स’, ‘खट्टा मीठा’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली.अलिबाबा आणि चाळीशीतले चोर हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा मराठी चित्रपट होता. याशिवाय ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं.दरम्यान, अतुल यांनी एका मुलाखतीद रम्यान सांगितलं होतं की, त्यांच्या यकृतामध्ये 5 सेंटीमीटर लांबीची कर्करोगाची गाठ असल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. त्यावर डॉक्टरांनी त्यांची तब्येत ठीक होईल असं सांगितलं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला. सुरुवातीला आजार न दिसल्यामुळे त्यांच्या स्वादुपिंडावर परिणाम झाला आणि चुकीच्या उपचारांमुळे आणखीनच त्यांची परिस्थिती बिकट झाली होती. अशातच डॉक्टरांनी त्यांना दीड महिना वाट पाहायला सांगितली होती. मात्र, अतुल यांनी डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार सुरू केले होते.अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी समोर येताच कलाविश्व हादरून गेलं आहे.

एसटीची दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा

0

मुंबई — दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळा कडून दरवर्षी 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो.

यंदा देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांना दिलासा देत एसटी महामंडळानं भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्याभरात एसटीनं प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे.

हंगामी भाडेवाढीचा निर्णय रद्द करण्यात आल्यानं महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम मिळणार नाही. भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्याचा प्रवास महागणार होता. आता मात्र त्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक कुटुंबे गावी, पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे बेत आखतात. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करते. दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करत असते. महामंडळाच्या धोरणानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार आहे. गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ केली जात असते, त्या प्रमाणं या वर्षी देखील निर्णय घेण्यात आला होता. आता तो निर्णय रद्द करण्यात आला आहे.
यंदा देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. एसटीची प्रस्तावित 10 टक्के भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होती. मात्र, ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरीकरीता भाडेवाढ लागू करण्यात आलेली नव्हती.
सध्या दिवसाला सुमारे 23 ते 24 कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न महामंडळाला मिळते. हंगामी भाडेवाढीमुळे दिवसाचे उत्पत्र 6 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे महिन्याभरात महामंडळाला 950 ते एक हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, सध्या घेण्यात आलेल्या सध्या महिन्याला 850 कोटी रुपये महामंडळाला उत्पन्न मिळते.दिवाळीमधील सणांच्या काळात सर्वसामान्य प्रवासी एसटीला प्राधान्य देत असतात. 10 टक्के हंगामी भाडेवाढ केल्यानं प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, यंदा एसटीच्या निर्णयामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

धक्कादायक! वैद्यनाथ मंदिराच्या शिखराची तोडफोड

0

परळी — बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परळीच्या माजी नगराध्यक्षांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काळसापर्यंत जाऊन तोडफोड केली आहे. दसऱ्याच्या दिवशी सकाळी ही घटना घडली आहे.
मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने अनेक बंधन घातली आहेत. मात्र परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यासह आठ ते दहा जणांनी विजया दशमीच्या दिवशी सकाळी वैद्यनाथ मंदिर कमिटीच्या कार्यालयासमोर असलेल्या गेटचे कुलूप तोडून शिखरावर पोहोचले. यानंतर हातोड्याने शिखराच्या पूर्व बाजूची भिंत फोडून दीपक देशमुख आपल्या साथीदारांसह आत घुसले. याचा व्हिडिओ दीपक देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
शिखराच्या तोडफोडप्रकरणी मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कमिटीच्या कार्यालयास माहिती दिली, त्यामुळे बाबासाहेब देशमुख यांनी तात्काळ याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रविवारपर्यंत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, याप्रकरणी लेखी तक्रार आल्याचे परळी शहराचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी सांगितले.
दरम्यान घडलेल्या घटनेबद्दल दीपक देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,पंचम ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ येथे दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर कळसातील महादेव दर्शन शिव भक्तांसाठी खुले केले. अनेक वर्षापासून बंद असलेल्या कळसातील भुयारात महादेवाची पिंड बंदिस्त होती. अनेक दिवसांपासून भक्तांची व माझी मागणी होती की, हे द्वार दर्शनासाठी खुले करावे. वैद्यनाथ देवल कमिटीच्या विश्वस्तांना अनेकवेळा निवेदन दिले, परंतु काहीही दाद न दिल्यामुळे मी व माझ्या सहकारी शिवभक्तांनी मंदिरात असणाऱ्या कळसातील महादेव दर्शन सर्वांसाठी खुले केले आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी!

0

मुंबई — राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरू आहे.

शनिवारी रात्री म्हणजेच दसऱ्याच्या रात्री ही गोळीबाराची घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालया समोरच शनिवारी रात्री सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची माहिती समोर येत आहे. करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या हत्येच्या तपासासाठी जवळपास पाच ते सहा पथक गुन्हे शाखेकडून तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर हा हल्ला कोणी केला असेल, यामागे कारण काय आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. एसआरएच्या प्रकल्पासंबंधीच्या कथित वादामुळे त्यांची हत्या झाली असावी असाही अनेकांचा दावा होता. मात्र, आता लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. हिंदी भाषेतील पोस्ट टाकून बिश्नोई गँगने ही हत्या आम्ही केल्याचं म्हटलं आहे.
आम्हाला सलमान खानसोबत कोणतेही युद्ध नको होते, पण बाबा सिद्दीकींच्या हत्येचे कारण त्यांचे दाऊद इब्राहिम यांच्याशी असलेले संबंध होते. बाबा सिद्दीकी यांची कथित शालीनता हा निव्वळ भ्रम आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिम सोबत मकोका कायद्यातही त्याचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. सलमान खान आणि दाऊदच्या टोळीला जो कोणी मदत करेल त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असा दावा बिश्नोई गँगने केला आहे.

२५० सोलर हायमास्टने बीड शहर उजळणार

0

 

 

डीपीसीतून ६ कोटींचा निधी; ना.धनंजय मुंडे यांचे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले आभार

बीड — शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी डीपीसीतून ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून २५० सोलर हायमास्ट बसविण्यात येणार असल्याने शहर उजळणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून निधी मिळाला असून पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. त्यातील अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. अलिकडे शहरातील अनेक भागात पथदिवे बंद असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. हे पथदिवे सुरू करून अंधार दूर करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. या मागणीची दखल घेऊन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर डीपीसीतून ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्यातून २५० सोलर हायमास्ट बसविण्यात येणार आहेत. तसेच, शहरातील अनेक जुन्या पोलवरील एलईडी पथदिवे बंद आहे. त्याठिकाणी देखील एलईडी पथदिवे बसविले जाणार आहेत. या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून दिवाळीच्या आधीच बीड शहर उजळणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

बीड मतदारसंघात कोट्यवधींची कामे सुरू

बीड विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे प्रत्यक्षात सुरू आहेत. अनेक कामे पूर्णत्वास गेली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. रस्ते, नाल्या, पथदिव्यांसह विजेची कामे, सभागृह, अंगणवाडी, दवाखान्यांसह विविध दुरुस्तीच्या कामांचा देखील यामध्ये समावेश आहे. या कोट्यवधींच्या विकासकामांसाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला आहे.

पाच वर्षात जमलं नाही ते विजयसिंहांनी महिनाभरात करुन दाखविले

0

गेवराई तालुक्यातील १२०६० निराधारांचे अर्ज मंजुर

गेवराई — तालुक्यातील निराधारांच्या प्रश्नांवर सातत्याने राजकीय पोळी भाजण्याचे काम आजवर सत्ताधार्‍यांकडुन होत होते. राज्यातील सत्तांतरानंतर विजयसिंह पंडित यांनी राजकीय प्रतिष्ठापणाला लावुन संजय गांधी निराधार अनुदान समितीचे गठण केले. दादासाहेब घोडके यांच्या अध्यतेखालील समिती कार्यरत होताच त्यांनी अतिशय तत्परतेने निराधारांची प्रकरणे हाताळली.

प्रशासकीय यंत्रणेला समिती सदस्यांनी अक्षरश: खांद्याला खांदा देवुन दिवसरात्र एक करत गेवराई तालुक्यातील प्राप्त झालेल्या १५६३० एकुण अर्जांची बारकाईने तपासणी करुन १२०६० अर्ज मंजुर करत खर्‍या अर्थाने निराधारांना न्याय देण्याचे काम केले. विरोधकांना सत्तेत असतांनाही पाच वर्षात जे जमलं नाही ते विजयसिंह पंडित यांनी महिण्याभरात करुन दाखविल्याची चर्चा गेवराई तालुक्यात आहे.

गेवराई तालुक्यातील निराधारांचा प्रश्न सातत्याने एैरणीवर आला की, त्यावर राजकीय वाद आजवर होत आले आहेत. केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी अक्षरश: विधवा, दिव्यांग आणि निराधारांना तहसिल कार्यालयात बोलावुन आमदारांच्या हाताने मंजुरी पत्र वाटप करण्याचे केविलवाने प्रकारही आजवर गेवराईत घडलेले आहेत. निराधारांमध्ये सुद्धा राजकारण करुन विशिष्ट गटाच्या लोकांना प्राधान्य देण्याचे प्रकार यापुर्वी घडले होते. लाच घेवुन अर्ज मंजुर केलेल्याचे आरोप यापुर्वीच्या समितीवर मोठ्या प्रमाणावर झाले. बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी मोठा मोर्चा काढुन या प्रश्नाला वाचा फोडली होती. शेवटी राज्यातील सत्तांतरानंतर त्यांनी राजकीय प्रतिष्ठापणाला लावुन पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन नविन समिती गठीत केली. दादासाहेब घोडके यांच्या अध्यक्षतेखाली नवनियुक्त समिती सदस्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत तहसिल कार्यालयात आजवर प्रलंबित असलेल्या सुमारे १५६३० अर्जांची प्रत्यक्ष तपासणी केली.

गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीने दि. २० सप्टेंबर रोजीच्या बैठकीत १२०६० अर्ज मंजुर केले आहेत. यामध्ये श्रावण बाळ निराधार ६८७४, संजय गांधी निराधार ५१५४ आणि इंदिरा गांधी वृद्धपकाळ निराधार योजने मधील ३२ अर्जांचा समावेश आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज मंजुर करण्याची गेवराई तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. समिती सदस्यांनी लाभार्थ्यांकडुन कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे विरोधकही आमच्यावर आरोप करु शकत नाहीत. तालुक्यातील निराधारांना यामुळे खर्‍या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना समितीचे अध्यक्ष दादासाहेब घोडके यांनी व्यक्त केली. त्यांनी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, माजी आ. अमरसिंह पंडित आणि बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले. यावेळी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर नवले, सरवर पठाण, भारत गर्जे, बळीराम शिंदे, गोकुळ चोरमले, शाहीन पठाण, अनिरुद्र तौर, अंबादास सांगळे, शामसुंदर शिंदे आदींची उपस्थिती होती. गेवराई तालुक्यातील निराधारांकडुन आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

मराठवाडयात 10 कोटी 10 लाख रूपयांची वीज चोरी उघड

0

6 कोटी 9 लाख रूपये दंडाची रक्कम वसूल

छ. संभाजीनगर — महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्यामराठवाडयातील आठ जिल्हयात माहे एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या सहा महिन्यात कालावधीत वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 2,673 वीज मिटरची तपासणी करण्यात आली. यात 1,451 मिटरमध्ये वीज चोरी आढळून आली. यात 14013697 युनिट वीज चोरी प्रकरणी 10 कोटी 10 लाख रूपयांच्या अनुमानित वीज बिल दंडाच्या रक्कमेची आकारणी करण्यात आली आहे. तर 6 कोटी 9 लाख 86 हजार रूपये वसूल करण्यात आले आहेत.व 65 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वीज चोरीची रक्कम लाख रूपयांमध्ये पुढील प्रमाणे
वीज चोरी पथक ग्राहक वीज चोरीची रक्कम
छत्रपती संभाजीनगर शहर 328 229
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 151 150
जालना 199 152
छत्रपती संभाजीनगर 678 531
परिमंडल

बीड 85 59
धाराशिव 115 72
लातूर 219 148
लातूर परिमंडल 419 279

नांदेड 165 88
हिंगोली 76 34
परभणी 113 78
नांदेड परिमंडल 354 200
मराठवाडा एकूण 1451 1010

मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर,धाराशिव व बीड जिल्हयात एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत भरारी पथक आणि दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविली. विघुत कायदा 2003 नुसार कलम 126 अंतर्गत शेजा—याकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुस—या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो. तसेच कलम 135 मध्ये मिटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सव्हिेसवायर टॅप करणे व कलम 138 मध्ये महावितरणचे मिटर, वायरसह इतर वस्तु चोरी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. वीज चोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. अनधिकृत विजेचा वापर करू नये. अनधिकृतपणे विजेचा वापर करतांना आढळून आल्यास विघुत कायदयानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
आगामी काळात वीज चोराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणचे प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.

बाळराजे दराडेंची मोठी कारवाई :14 कोटींच्या अपहार प्रकरणात सत्यभामा बांगर ताब्यात

0

बीड — महात्मा फुले अर्बन बँकेच्या माध्यमातून १४ कोटींच्या अपहारप्रकरणात ४१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील मुख्य आरोपी असलेल्या सत्यभामा बांगर यांना आज सकाळी राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. सपोनि बाळराजे दराडे यांनी ही अटक केल्याची माहिती असून आज श्रीमती बांगरला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून मल्टीस्टेट आणि सहकार क्षेत्रातील भोंगळ कारभार उजेडात येत आहे. महात्मा फुले बँकेसह चौदा सहकारी संस्था मध्ये चौदा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे दोन दिवसापूर्वी उघडं झाले होते. बांगर यांच्यासह ४१ लोकांवर गुन्हे दाखल झाले असून सत्यभामा बांगर यांना यात अटक झाली आहे.रामकृष्ण बांगर, सत्यभामा बांगर, बाळा बांगर यांनी महात्मा फुले अर्बन बँक, डेअरी, शैक्षणिक संस्था स्थापन केल्या होत्या. मागील तीस चाळीस वर्षेपासून बांगर यांचे साम्राज्य अबधित होते. वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने बांगर यांनी करोडो रुपयांचा अपहार केला. मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. अखेर हा सर्व गैरभार उजेडात आल्यानंतर बांगर कुटुंबीय फरार झाले होते. सत्यभामा बांगर तुळजापूरला दर्शन घेऊन रात्री मध्यरात्री घरी आल्या होत्या. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आज सकाळी सपोनि बाळराजे दराडे यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या सत्यभामा बांगर यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी घेऊन जाण्यात येत असून त्यानंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे.

भावाच्या दहाव्याला दिलेले पैसे कधी देणार? असं विचारत दोन भावजयांना संपवलं!

0

अहमदनगर — धारधार कोयत्याने वार करत सख्ख्या दिराने दोन भाऊजयांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात ही घटना घडली आहे. जमिनीच्या आणि पैशाच्या किरकोळ वादातून दिराने भाऊजयांचा निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी कोयता हातात घेऊन फिरत असल्याची घटना गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

विशेष म्हणजे ही घटना गावातील मुख्य बाजारपेठेच्या चौकापासून काही अंतरावर घडली. घटनास्थळी रक्ताचे मृतदेह अक्षरक्षः रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
दत्तात्रय प्रकाश फापाळे वय 50 वर्षे याने सख्खी लहान भावजयी उज्ज्वला अशोक फापाळे वय 38, चुलत भावजयी वैशाली संदीप फापाळे वय 40 वर्ष यांचा सोमवारी दुपारी अडीच वाजता धारदार कोयत्याने हत्या केली. आरोपी दत्तात्रय फापाळे ऊर्फ बापू हा अविवाहित आहे. लहान भाऊ अशोक याचे लग्न झाले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. त्याची पत्नी मृत उज्ज्वला आणि दोन मुले आळंदी येथे मोलमजुरीचे काम करत उदरनिर्वाह करतात. फाफळे कुटुंबाची बदगी गावात शेती आहे. त्या शेतीमध्ये दत्तात्रय आणि उज्ज्वला वर्षाआड शेती पीक घ्यायचे. शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्ज्वला आली होती. उज्ज्वला गावाला आल्यापासून दीर दत्तात्रयचे भावाच्या दहाव्याला दिलेल्या पैशावरून वाद व्हायचे. याच रागातून दत्तात्रय याने आधीच घरात कोयता आणला होता.

वैशाली व उज्ज्वला एकाच भावकीतल्या होत्या. उज्ज्वला दोन दिवसांपूर्वी गावी आली होती. वैशाली घटनास्थळाशेजारील दवाखान्यात उपचार घेऊन उज्ज्वलाशी गप्पा मारत होती. उज्ज्वलावर पहिला वार होताच ती सोडवायला गेली आणि तिच्यावरही सपासप तीन वार झाले आणि त्यातच तिचा जीव गेला, दोघींचे देह रक्ताच्या थारोळ्यात पडले. खुनाची घटना झाली त्यावेळी या महिला किंचाळत होत्या. त्यानंतर तो भर गावातून जंगलाच्या वाटेने निघून गेला. घटनेनंतर गावादेखत आरोपी पायी गेला. दरम्यान कोयता हातात घेऊन गावातून फिरत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी काय झाला आहे कोयता घेऊन फिरत असताना एकाही व्यक्तीने त्याला अडवले नाही की त्याचा कोणी पाठलाग केला नाही. सध्या पोलीस तपास करत आहेत.