Home Blog Page 118

कुठलाच पात्र लाभार्थी घरकुल सर्व्हेपासून वंचित राहू नये- आ.संदीप क्षीरसागर

0

सर्व ग्रामसेवकांनी खबरदारी घेण्याच्या कडक सूचना

बीड — प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या सेल्फ सर्व्हे ला ३१ मे २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे‌‌. परंतु ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे सेल्फ सर्व्हे करण्यासाठी अडचण येत आहे. त्यामुळे कुठलाही लाभार्थी सर्व्हेपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने सर्व ग्रामसेवकांना कडक सूचना द्याव्यात, असे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले आहेत.
ग्रामीण भागातील पात्र नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मोबाइलद्वारे सेल्फ सर्व्हे करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तांत्रिक अडचणींमुळे आणि विलंबामुळे कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता सेल्फ सर्व्हे करण्यासाठी प्रशासनाकडून मुदतवाढही देण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागातील अनेक पात्र लाभार्थी हे अशिक्षित आहेत तसेच अनेकांकडे स्मार्टफोन नाहीत, आणि अनेकांना तांत्रिक माहिती नसल्यामुळे सेल्फ सर्व्हे करण्यासाठी अडचणी येत आहेत. या बाबींचा विचार करून गावपातळीवर, ज्या पात्र लाभार्थींना सेल्फ सर्व्हेबाबत अडचणी आहेत त्या लाभार्थींचा सर्व्हे ग्रामसेवकांनी करून द्यावा. एकही पात्र लाभार्थी सेल्फ सर्व्हेपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे कडक निर्देश ग्रामसेवकांना द्यावेत. अशा सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी बीड व शिरूर (का.) यांना दिल्या आहेत.

दादांचा लक्षात राहणारा विकास; बीड जिल्हा होतोय भकास

0

बीड — जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर विकासाची गंगा वाहत राहील अशी अपेक्षा केली जात होती. मात्र ही गंगा उलटी वाहू लागल्याचं पाहायला मिळत आहे. विकासाच्या नावाखाली पवनचक्क्या सौर ऊर्जा कंपन्यांनी नंगानाच सुरू करत शेतकरी उध्वस्त करण्याचं काम सुरू केलं आहे.तर जिल्हा प्रशासन मात्र शेपूट हलवत कंपन्यापुढे गोंडा घोळत आहे. वेळप्रसंगी शेतकऱ्यांना चावा घ्यायला देखील मागेपुढे पहात नसल्याचं चित्र सामान्य बनला आहे. गायरान जमिनी कसणारा शेतकरी उध्वस्त तर केलाच केला शिवाय दंडेलशाहीला सशुल्क संरक्षणाच्या नावाखाली प्रोत्साहन देत शेतकरी खंडणीखोर ठरवला जात आहे. प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची मावेजा मिळावा एवढीच अपेक्षा धरल्याने हे होत आहे. बाधित जमिनीचा मावेजा मिळावा ही मागणी करणं देखील गुन्हा ठरू लागली आहे. तर जिल्ह्यातील खरे खंडणीखोर, दरोडेखोर, चोर मात्र अजूनही कायद्याला ठेंगा दाखवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दादा…! बीड जिल्ह्याने नेहमीच तुमची असो की काकाची राष्ट्रवादीला नेहमीच साथ दिली. त्या मोबदल्यात मात्र जिल्ह्याला काहीच मिळालं नाही हे वास्तव आहे. सध्या तर आपण पालकमंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना नागवण्याचं काम पवनचक्की सौर ऊर्जा कंपन्यांनी सुरू केला आहे. पवनचक्की कंपन्या म्हणजे गोऱ्या इंग्रजांची काळी आपत्य असल्याचं संतप्त शेतकरी आता बोलत आहेत. इंग्रजांच्या धोरणाचाच वापर कंपन्यांनी जिल्ह्यात सुरू केला आहे.फोडा तोडा राज्य करा ही नीती कंपन्यांकडून राबवली जात आहे.
जिल्ह्यातील 595 हेक्टर गायरान जमीन कंपन्यांना लीजवर देण्यात आली आहे. कंपन्यांना 2200 एकर जमीन हवी आहे. 1472 एकर जमीन आगाऊ देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे कंपन्यांना दिलेल्या गायरान जमिनी शेतकऱ्यांचं पोट भरण्याचं काम करत होती. या शेतकऱ्यांना देखील पिटाळून लावण्यात आलं.अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव मधील शेतकऱ्यांची घरं उध्वस्त केली. 1981 पासून भूमिहीन शेतकरी कसत असलेली गायरान जमीन कंपनीच्या घशात घातली येथील शेतकऱ्यांनी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तीच स्थिती सार्वत्रिक बनली.पवनचक्क्या कंपन्यांनी पाळलेले पाच 25 गुंड, 50 — 60 पोलिसांचा फौज फाटा, शेतकऱ्यांकडे एरवी डूंकून न पाहणारे तहसीलदार, गिरदावर, तलाठी यांची कुमक, सोबत कंपन्यांचे अधिकारी, मजूर, कर्मचारी तितक्याच संख्येने काळ्या स्कॉर्पिओ गाड्या शेतकऱ्यांची उभी पिक उध्वस्त करीत शेतकऱ्याच्या जमिनीवर हल्लाबोल करत ताब्यात घ्यायचा त्यात गोंधळलेला शेतकरी दबावात घेऊन आपलं काम करून घ्यायचं, नाहीच एखाद्या शेतकऱ्याने काम करू दिलं तर गुंडा मार्फत दमदाटी करायची, दमदाटी करूनही भागत नसेल तर पोलीस यंत्रणेचा वापर करायचा, शेतकरी धमकावल्यानंतरही काम करू देत नसेल तर गुन्हे दाखल करण्याची धमकी देत पोलीस ठाण्यात नेऊन डांबून ठेवायचा , बाधित शेतकऱ्यांचा मावेजा बुडवायचा हे चित्र सध्या निर्माण झाला आहे.
यातच कहर म्हणून पाटोदा तालुक्यातील बेडूकवाडी येथील शेतकऱ्यावर खंडणी सारखा गुन्हा दाखल करण्यात देखील. पोलीस यंत्रणा कमी पडली नाही. पवनचक्की कंपन्यांनी पाळलेल्या कुत्र्यासारखी अवस्था जिल्हा प्रशासनाची झाली आहे.”छू” म्हणताच जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणा शेतकऱ्यावर तुटून पडत आहेत. इतकंच नाही तर पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथील साठवण तलावाची जमीन रेन्यू कंपनीने बळकावली आहे. या जमिनीवर चार ते पाच कोटी रुपये खर्च करून विद्युत उपकेंद्र उभे केले आहे. आधीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाण्याची सोय असणारे तलाव देखील कंपन्या बळकावणार असतील तर हा उध्वस्त करणारा विकास जनतेच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या लक्षात राहणारा आहे.

आमचे लोकप्रतिनिधी ही गप्प
ज्या जिल्ह्याने राष्ट्रवादीला भरभरून साथ आजपर्यंत दिली त्याच राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार पवनचक्की कंपन्यांच्या हैदोसामूळे रझाकारी काळाचा अनुभव शेतकरी घेत असले तरी मूग गिळून गप्प आहेत. मग हे बुजगावणे लोकप्रतिनिधी जनतेच्या काय कामाचे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे

सशुल्क संरक्षणाखाली कंपन्यांनी दरोडे घालायचे काय?
पवनचक्की कंपन्या ना दिल जाणार पोलीस संरक्षण सशुल्क असल्याचं पोलीस अधीक्षक सांगतात. कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे बुडवले तर ते शेतकऱ्यांना मिळावेत याची जबाबदारी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत का घेत नाहीत हा मोठा प्रश्न आहे.पवनचक्की कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दरोडे घालत आहेत ही बाब त्यांच्या मात्र लक्षात येत नाही किंवा त्याकडे पाहण्याची त्यांना गरज वाटत नाही. पोलीस संरक्षणाच्या नावाखाली नव्या गुंडशाहीला पोलीस प्रशासनच बळ देत आहे. यातूनच पवनचक्की कंपन्यांच्या गुंडांना देखील संरक्षण मिळत असेल तर दरोडेखोरांना देखील सशुल्क पोलीस संरक्षण देणार काय? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

अधिकारीच पवनचक्की कंपन्यांना खंडणीचे गुन्हे दाखल करा असे सल्ले देऊ लागले
जनसेवक असलेले सरकारी कर्मचारी जनतेशी इमान न राखता कंपनीचे पाय चाटण्यात धन्यता मानत आहे. कंपनीने इशारा करताच शेपट वर करून शेतकऱ्यावर भूंकत दहशत निर्माण करू लागले आहेत. आता तर शेतकऱ्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करा असे हरामखोरी सल्ले देखील ते देऊ लागले आहेत.
दादा….! कंपन्यांपुढे गोंडा घोळणाऱ्या या नोकरशाहीच्या शेपटात फुकारी घालून सरळ करा

पवनचक्की कंपन्या शेतकऱ्यांचे पैसे बुडवत आहेत. त्यांचे पैसे मिळावेत यासाठी कंपनी विरोधात कारवाई करण्याचे आदेश द्या. शेतकऱ्यांनी पवनचक्की विरोधात केलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्याचे देखील आदेश द्या. कंपनीने शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेच तर जबाबदार अधिकारी यांच्या पगारातून तो पैसा शेतकऱ्यांना मिळेल याची व्यवस्था करा.अशी मागणी देखील जनतेतून होत आहे. दादा..‌! शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा कंपन्यांनी सुरू केलेला विकासाला आता तरी आळा घालावा…! अशी मागणी जोर धरू लागली आहे. नाहीतर पालकमंत्री दादांचा विकास खास…! जिल्हा झालाय भकास..! असं म्हणण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्या असे आर्त हाक शेतकऱ्यातून मारली जात आहे

पिस्तूल बाळगणारे दोन आरोपी जेरबंद

0

बीड — जिल्हयातील अवैध व्यवसायांच्या विरुध्द करण्यात येणाऱ्या कारवायांचाच एक भाग म्हणून अवैध शस्त्रे बाळगणा-यांविरुध्द पोलीस अधिक्षक श नवनीत काँवत यांनी मोहिम उघडलेली आहे. त्यानुसार सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित करुन बीड जिल्हयात कोणत्याही प्रकारे अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही याची खबरदारी घेऊन जे कोणी अवैध शस्त्रे बाळगतील अशांविरुध्द कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांना गोपनिय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, परळी वैजनाथ येथील रेल्वे स्टेशन परीसरात दोन इसम येत असून त्यांच्याजवळ अवैध गावठी कट्टा आहे. सदर माहितीच्या आधारे दिनांक १६ मे रोजी सकाळी  वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परळी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लाऊन दोन इसम नामे अमोल रामहरी कांदे, वय ३२ वर्षे, रा. माणिकनगर, परळी , पांडूरंग प्रकाश शेंडगे, वय ३० वर्षे, रा. एलआयसी कॉलनी, रिंगरोड लातूर यांना पकडले. त्या दोघांची अंगझडती घेतली असता आरोपी अमोल कांदे याचे पॅन्टच्या आतमध्ये कमरेला एक गावठी कट्टा खोवलेला मिळून आला. तसेच त्यासोबत ०३ जीवंत काडतूस देखिल मिळून आले. दोन्ही आरोपी यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा/पिस्टल (अग्नीशस्त्र) व ०३ जीवंत काडतूस असा एकूण ४३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर अवैध गावठी कट्टा/पिस्टल बाबत सदर अटक आरोर्पीकडे विचारपूस करता त्यांनी तो सतीष मुंडे, रा. डाबी, ता. परळी व मनोहर मुंडे, रा. बेलंबा, ता. परळी यांच्याकडून विकत घेतल्याचे प्राथमिक तपासात कबुल केले असून सदर चारही आरोपींविरुध्द पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी वैजनाथ येथे पोलीस अंमलदार श्री विष्णू बाजीराव सानप यांच्या फिर्यादीवरुन गुरनं. १०४/२०२५, कलम ३, २५ भारताचा शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तसेच गावठी पिस्टलसह पकडलेल्या वरील दोन इसमांना अटक करण्यात येऊन मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली. पिस्टल विकणारे दोन आरोपी १) सतीष मुंडे व २) मनोहर मुंडे यांचा गुन्हयाचे तपासी अधिकारी  प्रविण जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी हे शोध घेत आहेत. सदरील कारवाई  काँवत, पोलीस अधिक्षक बीड, मा. श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधिक्षक, अंबाजोगाई, श्री शिवाजी बंटेवाड, प्रभारी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री सुशांत सुतळे, पोह/विकास राठोड, पोलीस अंमलदार श्री विष्णू सानप, श्री नितीन वडमारे, विक्की सुरवसे यांनी केली आहे.

बीड: पाच लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण

0

बीड — वाहनांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे चौघांनी पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी संगनमत करून अपहरण करत बेदम मारहाण केल्याची घटना गिरामनगर भागात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणां विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
पंजाब पांडुरंग शिंदे वय 33, रा. गिरामनगर, पांगरी रोड, बीड यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनेश पोपट ठोसर, विठ्ठल गायकवाड हे दोघेही रा. उखंडा, लिंबादेवी, ता. बीड, बालाजी बहिरवाळ रा. धानोरा रोड, बीड, मयूर खोमणे चऱ्हाटा फाटा, बीड अशी अपहरण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
रात्री सव्वा नऊला घरी असताना दिनेश पोपट ठोसर, विठ्ठल गायकवाड बालाजी बहिरवाळ व मयूर खोमने या चौघांनी घराबाहेर बोलावून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसवून त्यांना नगर रोडवरील देवराज बारमध्ये नेण्यात आले. तेथे आरोपींनी पाच लाख रुपयांची मागणी करत पुन्हा एकदा मारहाण केली.यावेळी बालाजी बहिरवाळ याने बीअरच्या बाटलीने शिंदे यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. मारहाण झाल्यानंतर शिंदे यांनी जीव वाचवण्यासाठी अंधाराचा फायदा घेत बारमधून पळ काढला व जवळील स्टोन क्रशरवर लपून बसले.काही वेळाने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी आरोपी दिनेश ठोसर, विठ्ठल गायकवाड, बालाजी बहिरवाळ व मयुर खोमणे यांच्या विरोधात अपहरण, मारहाण, जबरदस्ती, खंडणी मागणी व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

तिप्पटवाडी तलाव मावेजा वाटप घोटाळा प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या आदेशाला धुमाळांकडून केराची टोपली!

0

मावेजा दोनदा लाटला; नामदेव टिळेकर श्रीनिवास मुळे, निलेश बागडेंना वाचवण्याचे प्रयत्न

बीड — तालुक्यातील तिप्पटवाडी येथील गाव तलाव क्र–1 मधील जमीन संपादनाच्या एकाच प्रकरणात नियमबाह्य मावेजा वाटप करत दुहेरी लाभ देण्याचा प्रताप उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी केला. या प्रकरणात अव्वल कारकून श्रीनिवास मुळे तसेच कनिष्ठ लिपिक निलेश बागडे यांनी टिळेकरांना साथ दिली. या भ्रष्टाचार प्रकरणात समिती गठीत करून तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र तीन महिने होत आले तरी उपजिल्हाधिकारी धुमाळ आयुक्तांचा आदेश पादळी तुडवत त्रिमूर्तींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तिप्पटवाडी येथे गाव तलाव क्रमांक -1 साठी जमीन संपादित करण्यात आली होती. याप्रकरणी संबंधितांना भूसंपादन कायदा 1894 नुसार दिनांक 30 जानेवारी 2014 रोजी निधी वाटप केला होता. त्यानंतर भूसंपादन कायदा 2013 लागू झाला त्यामध्ये कलम 23 व 30 नुसार भूसंपादन कायदा 1894 नुसार वाटप केलेली रक्कम वजा करत 2013 च्या नवीन कायद्यानुसार निवडा केला अन् निधी मागणीसाठी उपजिल्हाधिकारी(रोहयो) यांचेमार्फत शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने या अगोदर भूसंपादन कायदा 1894 नुसार निधी वितरित केला असल्याने 2013 नवीन कायद्यामध्ये सदर प्रकरण बसत नाही त्यामुळे निधी मागणी प्रस्ताव नाकारण्यात आला.
शासनाने निधी मागणी प्रस्ताव फेटाळल्यानंतर या प्रकरणी कार्यकारी अभियंता, ल.पा.जि.प. बीड यांच्याकडे निधी मागणी सादर करून शासनाची फसवणूक कनिष्ठ लिपिक निलेश बागडे यांनी केली अन् निधी मंजूर करून आणला त्यानंतर उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, अव्वल कारकून श्रीनिवास मुळे, कनिष्ठ लिपिक निलेश बागडे यांनी संगनमताने रक्कम रु.4925058/-चा निधी नियमबाह्य वितरित केला. या मावेजा वाटपातील भ्रष्टाचार प्रकरणी विभागीय आयुक्त छ. संभाजीनगर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून तीन महिन्यात सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश सह–आयुक्त (पुनर्वसन) छत्रपती संभाजीनगर यांनी दिले आहेत.

उपजिल्हाधिकारी धुमाळ, यांच्याकडून विभागीय आयुक्ताच्या पत्राला केराची टोपली

विभागीय आयुक्तांनी 3 महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतरही धुमाळ उपजिल्हाधिकारी (समन्वय) बीड हे संचिका लपवून ठेवत केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. नामदेव टिळेकर व श्रीनिवास मुळे निलेश बागडे यांच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याचं काम करत आहेत.

मावेजा वाटपातील भ्रष्टाचारी अधिकारी–कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ नये यासाठी उपजिल्हाधिकारी धुमाळ प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या समक्ष तक्रारीच्या अनुषंगाने कसल्याही प्रकारची मांडणी न केल्याने प्रकरण निकाली निघण्यास विलंब होत आहे. सदर प्रकरणी त्वरित कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करणार आहे.

           अजय सरवदे ,जिल्हाध्यक्ष,

        वंचित बहुजन आघाडी बीड

भरधाव कंटेनर माणसं चिरडत जाऊन पलटला; एक ठार ,25 जखमी

0

केज — एक भरधाव कंटेनर जो समोर आला त्याला चिरडत गेला. युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला अखेरीस लोखंडी सावरगाव जवळ वळणावर तो पलटी झाला. या थरारक अपघातात 25 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. तर चिंचोली माळी येथील महिला मृत्युमुखी पडली आहे. जखमीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास केज शहरातील रस्त्यावर घडली ‌.


या बाबतची माहिती अशी की, 16 मे रोजी की, नेकनुरकडून एक भरधाव वेगात कंटेनर क्र.डी डी- 01/झेड-9771 येत असल्याची माहिती नेकनुर पोलिसांनी केज पोलिसांना दिली. ते कंटेनर अडविण्यासाठी केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राकेश बनसोडे, वाहतूक शाखेचे शहा, पाशा, शिवाजी कागदे, आणि इतर पोलिस हे केज चौकात थांबले होते. मात्र भरधाव वेगातील कंटेनरने शिक्षक कॉलनी जवळ असलेल्या होंडा शो- रूम जवळ एका टमटम क्र. एम एच- 23/एच- 545 ला जोराची धडक दिली. त्यातील प्रवाशी जखमी झाले. त्या नंतर पुढे त्या कंटेनरने शासकीय विश्राम गृहा समोर उभ्या असलेल्या मोटार सायकल क्र.एम एच- 44/ए डी- 1460 आणि क्रएम एच- 44/ए सी- 5814 या दोन मोटार सायकलींना धडक दिली.

त्या नंतर जुन्या उपविभागीय पोलिस उपअधिक्षक कार्यालया समोर रस्त्याने चालत असलेल्या मीना प्रवीण घोडके वय 37 वर्ष रा. चिंचोलीमाळी ता. केज या महिलेला चिरडले. या दुर्घटनेत या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्या नंतर धारूर चौकात उभ्या असलेल्या एका कार क्र. एम एच- 23/ए एस- 0897 ला धडक दिली. त्या नंतर ते तसेच पुढे गेले. त्या नंतर चंदनसावरगाव येथेही दोघांना धडक दिली.


त्यानंतर युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि मच्छिंद्रनाथ शेंडगे, पो. उपनिरीक्षक राहुल पतंगे, बालासाहेब घोरपडे, राऊत, आतकरे, डोंगरे, जाधव, हनुमंत गायकवाड यांनी रस्त्यावर अडथळे लावून तो कंटेनर रोखण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्या नंतर सदर कंटेनर हा लोखंडी सावरगाव येथील कळंब कडे जाणाऱ्या चौकात पलटी झाला. कंटेनर पलटी होताच त्याला आग लागली.अपघातातील जखमीवर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे हलविले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.

या अपघातातील जखमी
1) कृष्णा हरिदास कापरे वय 20 वर्ष, रा. कापरेवाडी ता. केज, 2) श्रद्धा मधुकर चिंचकर वय 18 वर्ष रा. येवता ता. केज,3) सुनील सुंदर घुले वय 59 वर्ष रा. केळगाव ता. केज, 4) बळीराम आप्पराव पांचाळ वय 40 वर्ष रा. ढाकेफळ ता. केज, 6) सोनू बाबु शेख वय 20 वर्ष रा. केज, 7) विकास वसुदेव काकडे वय 22 वर्ष रा. कापरेवाडी ता. केज, 8) कुमार गायकवाड 55 वर्ष रा. देवगाव ता. केज, 9) शेषेराव मारुती चंदनशिवे वय 55 वर्ष रा. शिरपुरा ता. केज, 10) सरिता रावसाहेब मुंडे 57 वर्ष रा. चारदरी ता. धारूर, 11) फुलाबाई धोंडीराम सावंत वय 60 वर्ष रा. तुगाव ता. अंबाजोगाई, 12)रावसाहेब यादवराव मुंडे वय 79 वर्ष रा. चारदरी ता. धारूर, 13) विद्या विलासराव सूर्यवंशी वय 30 वर्ष, रा. पिसेगाव ता. केज, 14) विलासराव ज्ञानोबा सूर्यवंशी वय 40 वर्ष रा. पिसेगाव ता. केज, 15) सिद्धेश्वर वसुदेव कापरे वय 22 वर्ष रा. युसुफवडगाव ता. केज, 16 )पोलिस कॉन्स्टेबल सिद्धार्थ शिंदे वय ३० वर्ष रा. युसुफवडगाव ता. केज, 17) अतुल बाबुराव कुलकर्णी, वय 40 वर्ष रा. तांबवा ता. केज, 18) आशालता मुंडे वय 50 वर्ष रा. चारदरी ता. धारूर, 19) बाबासाहेब देशमुख वय 45 वर्ष रा. बोरीसावरगाव ता. केज, 20) सौ. देशमुख बाबासाहेब देशमुख यांची पत्नी वय ४० वर्ष रा. बोरीसावरगाव ता. केज आणि 21) शेख वय 30 वर्ष रा. केज

पोलिस उपनिरीक्षक राकेश बनसोडे थोडक्यात बचावले
अपघातातील भरधाव वेगातील कंटेनर हे केज येथील धारूर चौकात येत असल्याची माहिती मिळताच त्याला अडविण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक राकेश बनसोडे हे रोडवर येऊन थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु ते कंटेनर सरळ अंगावर येत असल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून चपळाईने बाजूला झाले त्यामुळे ते थोडक्यात बचावले !

केजला रिंग रोडची गरजेचा
केज शहरातून दोन हाय- वे जात असल्याने आणि शहरात मोठी गर्दी असते. तसेच वाहने व दुचाकी रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात. यामुळे अशा घटना टाळण्यासाठी शहरा बाहेरून एखादा रिंग रोडची आवश्यकता आहे.

कंटेनर चालक जखमी

कंटेनर पलटी.झाल्या नंतर त्याचा चालक जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत.

मराठा आरक्षण: स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्याचे सर्वोच्च आदेश

0

नवी दिल्ली — मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निर्देश दिले आहेत की, या याचिकांवर तातडीने सुनावणी करण्यासाठी एका नवीन खंडपीठाची स्थापना करावी. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला.
सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SCBC) प्रवर्गांतर्गत वैद्यकीय प्रवेशांसाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर त्वरित नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत.

या याचिकांवर वेळेत सुनावणी न झाल्यामुळे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या वर्षी जानेवारी महिन्यात तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाल्यानंतर या याचिकांवर सुनावणी होऊ शकली नाही. याच कारणास्तव याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना मराठा आरक्षण कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर जलद सुनावणीसाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

यापूर्वी, जानेवारी महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली. न्यायमूर्ती उपाध्याय हे पूर्ण किंवा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते, जे गेल्या वर्षी एप्रिलपासून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) कायदा, २०२४ च्या विरोधातील याचिकांवर सुनावणी करत होते. त्यांच्या बदलीमुळे सुनावणी रखडली होती.

याचिकाकर्त्यांनी आगामी शैक्षणिक सत्राची निकड आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्णय घेण्यास होणारा विलंब याकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते. वैद्यकीय प्रवेशाला उशीर होण्याची शक्यता सुनावणीदरम्यान स्पष्टपणे मांडण्यात आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने योग्य ते निर्देश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.

याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पूर्ण झाला होता. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या जवळपास एक तृतीयांश असलेल्या मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देणारा २०२४ चा कायदा गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी होता. आता या प्रकरणावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे.

तेलंगणाकडे गाई घेऊन जाणारा टेम्पो पकडला

0

बीड — दहा गाईसह दोन वासरे घेऊन जाताना बुधवारी रात्री बीड शहरात टॅम्पो पकडण्यात आला. यातील जनावरे व टेम्पो असा जवळपास 11 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेम्पो क्र.एम.एच.17 सीव्ही.7664 यामधून अवैध रित्या दहा गाई आणि दोन वासरे हैद्राबादकडे नेली जात होती. हा टेम्पो शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पकडण्यात आला. यातील जनावरे व टेम्पो असा एकूण 10 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी माधव कारभारी खेमणर रा. चन्नेगाव ता. संगमनेर जि. अहिल्यानगर, संकेत बाळासाहेब लांबगे रा.लोणी प्रवरा ता. राहता जि. अहिल्यानगर, असनगरी श्रीसाई लांब रा. इल्ली मेंदू, इब्राहीम पटनम रा. तेलंगणा, उपारी सतई रा. जहगा इलिमेंदू इब्राहीम पटनम रा. तेलंगणा, मल्लया असनगरी रा. जहगा इलिमेंदू रा. तेलंगणा
या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरे शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. वैभव जाधव यांच्या फिर्यादीवरून हि कारवाई करण्यात आली आहे.

प्रेयसीने फोन उचलला नाही; पहाटेच घरात घुसून केली मारहाण

0

बीड — खासगी रुग्णालयात काम करणारे दोघे जण तीन वर्षे रिलेशन शिपमध्ये राहिले. परंतु आता तरूणीने फोन न उचलल्याने तिला पहाटेच्या सुमारास घरात घुसून गळा दाबत मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तिच्या दाजीला ही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार 12 मे रोजी पहाटेच्या सुमारास स्वराज्यनगर भागात घडला. याप्रकरणी दारूड्या तरूणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लक्ष्मण सपकाळ (वय 25 रा. सुर्डी ता. गेवराई) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता ही वडवणी तालुक्यातील रहिवासी असून लक्ष्मण व ती एकाच खासगी रूग्णालयात काम करतात. तीन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे फोनवर ही बोलणे होत असे. लक्ष्मण हा पीडिता सध्या बीडमध्ये राहत असलेल्या किरायाच्या घराकडेही चकरा मारत असे. 12 मे रोजीही तो दारूच्या नशेत होता. मला तुझ्या रूमवर यायचे आहे, असे म्हणत तो पीडितेला त्रास देत होता. तिने सकाळी ये म्हणल्यानंतर ही लक्ष्मणने ऐकले नाही.पहाटे 4 वाजताच तो पीडितेच्या रूमवर गेला. तिला जातीवाचक शिवीगाळ करत गळ्याला पकडून मला चापटाने मारहाण केली. तू माझा फोन उचलत का करत नाहीस, असे म्हणून मला शिवीगाळ केली. त्यानंतर पीडितेने तिच्या दाजीला बोलावून घेतले. यावेळी त्यांनाही तुझा काय संबंध आहे आमच्यामध्ये का बोलतोस, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हेड कॉन्स्टेबलना मिळणार गुन्ह्याच्या तपासाचे पीएसआय चे अधिकार; गृह विभागाचा मोठा निर्णय

0

मूंबई – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही झपाट्याने वाढत असताना, पोलीस यंत्रणेवरचा ताणही वाढतो आहे. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने अनेक गुन्ह्यांचे तपास रखडत आहेत.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबलनाही आता गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यापूर्वी केवळ पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच तपासाचे अधिकार होते. मात्र, आता गृहविभागाने एक अधिकृत राजपत्र जारी करत हेड कॉन्स्टेबलनाही तपासाचा अधिकार दिला आहे.
हेड कॉन्स्टेबल हा पदवीधर असावा,
किमान 7 वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी,
गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक येथे 6 आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी,
हे सर्व निकष पूर्ण केल्यानंतरच त्यांना तपास देण्यात येईल.
शहरी भागात अधिकारी संख्या तुलनेत चांगली असली तरी ग्रामीण भागात ती अपुरी आहे. त्यामुळे एका अधिकाऱ्याकडे अनेक प्रकरणांचा ताण येतो. याच गोष्टींचा विचार करून सरकारने सुशिक्षित हेड कॉन्स्टेबलच्या अनुभवाचा वापर करून छोट्या गुन्ह्यांचे तपास त्यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. गृह खात्याच्या मते, यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील ताण कमी होईल आणि गुन्हे उकलण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.