बीड — बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या बदलीचे आदेश शासनाने बुधवारी जारी केले. शहरात सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण हटाओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अचानक बदलीची बीड शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
शैलेश फडसे यांनी बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा नगरपालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपलेला होता. त्यामुळे काही काळ नगरपालिकेचा संपूर्ण कारभार प्रशासनाच्या माध्यमातून चालत होता. या काळात मुख्याधिकाऱ्यांच्या विविध निर्णयांवर अनेकदा आक्षेप घेतले गेले होते.
मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील समन्वयाचा अभाव देखील चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर सौ. प्रेमलता पारवे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. नव्या पदाधिकाऱ्यांसमोर प्रशासन समजून घेणे आणि शहरातील कामांना गती देणे हे मोठे आव्हान होते.
नगरपालिकेने स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांच्या कामांना वेग दिल्यानंतर शहरातील अतिक्रमण हटाओ मोहीम हाती घेण्यात आली. नाल्यांची सफाई आणि शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, या मोहिमेच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवरून काही नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
याच पार्श्वभूमीवर बुधवारी शासनाने मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या बदलीचे आदेश काढले. फडसे यांची बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदावरून सहआयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बदली करण्यात आली आहे.
अतिक्रमण मोहिमेच्या काळातच झालेल्या या बदलीमुळे बीडच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.




