जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कारवाईत बडे मासे वगळल्याचा केला आरोप
बीड — घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करण्याच्या नावाखाली गोदावरी नदीपात्रात लाखो ब्रास वाळूचे अवैध उत्खनन होत असून या अवैध वाळू उपशाची एसआयटी कडून चौकशी करावी अशी मागणी आपण केली होती, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने थातूरमातूर कारवाई केली. गेवराई तहसिलदारांच्या नेतृत्वात गोदावरी नदीपात्रात सुमारे १०० कोटी रुपयांचे वाळू उपसा सिंडीकेट चालवणारे मुख्य आरोपी या प्रकरणातून बाजूला सारून इतर लोकांवर जिल्हा प्रशासनाने कार्यवाही केली असून आपण हे प्रकरण तडीस जाईपर्यंत लावून धरणार आहोत. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आपण हा प्रश्न उपस्थित करणार असून वेळ पडली तर न्यायालयात दाद मागू अशी प्रतिक्रिया आ. विजयसिंह पंडित यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
श्री क्षेत्र राक्षसभुवन (शनिचे) येथून घरकुल बांधकामाच्या नावावर गोदावरी नदीपात्रातून सुरु असलेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणी आ. विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, या प्रकरणात सुमारे १०० कोटी रुपयांचे तहसिलदारांच्या नेतृत्वात महसुल व पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे वाळू माफियांसह सिंडीकेट कार्यान्वित असल्याचे सिद्ध होताच जिल्हा प्रशासनाने कारवाई केली मात्र या कारवाईतून सिंडिकेट चालवणारे मुख्य आरोपी दूर ठेवण्यात आल्याचा आरोप आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी केला.
अवैध वाळू उपसा करणाऱ्या तहसील आणि त्यांच्या कंपनीच्या विरोधात आपण ही मोहीम यापुढेही चालवणार असून हा प्रश्न तडीस जाईपर्यंत आपण याची पाठ सोडणार नसल्याचे सांगून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आपण हा प्रश्न उपस्थित करणार असून वेळ पडली तर न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.




