बीड — मागील दोन महिन्यांच्या कालावधीत घरातून निघून गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करून सुरक्षितपणे घरी परत पाठवण्यात बीड शहर पोलिसांना यश आले आहे.

यातील तिसऱ्या मुलीचा शोथ नांदेड शहरातून घेण्यात आला. विशेष बाब म्हणजे संबंधित मुलगी स्वतः मोबाईल वापरत नव्हती, त्यामुळे तिचा मागोवा घेणे अत्यंत आव्हानात्मक ठरले. मात्र, एका अनोळखी व्यक्तीचा मोबाईल वापरून तिने इंस्टाग्रामवरून एका मित्राला संदेश पाठवला होता. त्या मित्रालाही तिची ओळख नव्हती, त्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला.
सदर संदेशात तिने नांदेड येथे असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार नांदेड पोलिसांची मदत घेऊन शोधमोहीम राबविण्यात आली. स्थानिक माहितीदारांच्या मदतीने ती एका विद्यार्थिनीच्या रूमवर राहत असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करून मुलीला ताब्यात घेतले.
मुलगी शोधल्यानंतर तिचे कुटुंबाशी पुनर्मिलन करून घरी परत पाठवणे हे आणखी मोठे आव्हान असते. अनेक वेळा मुली घरच्यांविरुद्ध बंड करून शासकीय वसतिगृहात राहण्याचा पर्याय निवडतात. अशा वेळी पोलिस आणि बालकल्याण विभाग यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
बीड शहर पोलिसांनी प्रभावी समुपदेशन व समन्वय साधून तीनही मुलींची यशस्वी घरवापसी केली आहे.
तपासादरम्यान असे निदर्शनास आले की, किशोरवयीन मुलींसोबत पालकांनी संवाद साथताना समजून घेण्याऐवजी कठोर भूमिका घेतली जाते. योग्य संवादाचा अभाव, तसेच सोशल मीडियाचा प्रभाव यामुळे मुली घरापासून दूर जाण्याची शक्यता वाढते. याबाबत पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी. वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस अंमलदार गहिनीनाथ बावनकर, मंगेश शिंदे, राम पवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.




