बीड — जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तब्बल 14 महिने उलटूनही मुख्य संशयित आरोपी अजूनही फरार असल्याने तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते दरम्यान राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने आक्रमक भूमिका घेत फरार आरोपी कृष्णा आंधळेचा शोध लावण्यासाठी मोठे पाऊल उचलत बक्षिसाची घोषणा केली आहे
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यभर खळबळ उडाली होती. या प्रकरणातील अनेक आरोपींना अटक झाली असली तरी, प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा कृष्णा आंधळे गेल्या 14 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत आहे. या दिरंगाईवर न्यायालयानेही तीव्र नाराजी व्यक्त करत सीआयडीला जाब विचारल्यानंतर तपासाला नवे गतीमान मिळाले आहे.
या पार्श्वभूमीवर सीआयडीने कृष्णा आंधळेबाबत खात्रीशीर माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भीती न बाळगता नागरिकांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तपास यंत्रणांनी आता पारंपरिक पद्धतींसोबत तांत्रिक तपास अधिक तीव्र केला आहे. मोबाईल ट्रॅकिंग, आर्थिक व्यवहार आणि संपर्क साखळी तपासण्यासोबतच खबऱ्यांचे जाळेही अधिक मजबूत करण्यात आले आहे. फरार आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुका तोंडावर आल्याने या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमीही लाभली आहे. 28 एप्रिल रोजी मतदान आणि 29 एप्रिलला निकाल जाहीर होणार असल्याने, या आधी आरोपीला अटक होणे महत्त्वाचे मानले जात आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी कृष्णा आंधळेची अटक निर्णायक ठरणार आहे.
आता सीआयडीने जाहीर केलेल्या बक्षिसानंतर नागरिकांकडून माहिती मिळते का आणि फरार आरोपी कधी पोलिसांच्या जाळ्यात अडकतो, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

