बीड — उत्तर प्रदेशातील ललितपूर येथील मजुरांना ऊसतोड मजूर म्हणून आणले. त्यांना कामाचा कोणताही मोबदला न देता, मारहाण व धमकी देत डांबून ठेवलं याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार यांनी बुधवारी कारवाई करून १५ मजुरांची सुटका केली. वेठबिगारीची ही घटना धारूर तालुक्यात उघडकीस आली.
धारूर तालुक्यातील आमला-हिंगणी (बु.) येथील ओम चंद्रकांत सोळंके याने एका व्यक्तीच्या मदतीने उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील काही मजुरांना नोव्हेंबर महिन्यात ऊसतोड मजूर म्हणून आणले.त्यांच्याकडून काम करून घेत असताना त्यांना कोणताही आर्थिक मोबदला दिला नाही. कामाच्या मजुरीची मागणी केल्यास मजुरांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली जात होती. या संदर्भात मजुरांच्या कुटुंबीयांनी या प्रकाराची माहिती ललितपूर जिल्हाधिकाऱ्यांना दिली. दरम्यान या प्रकरणाची माहिती बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पत्र व दूरध्वनीद्वारे दिली.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात नायब तहसीलदार सुरेश पाळवदे, मंडळ अधिकारी लहु केदार, सोपान वाघमारे, संबंधित तलाठी व दिंद्रुड पोलीस सहभागी होते. या पथकाने कारवाई करून सर्व मजुरांची सुखरूप मुक्तता केली. जाचातून सोडवण्यात आलेल्या आलेल्या मजुरांना माजलगाव तहसील कार्यालयात आणून त्यांच्या जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर एक रात्र विश्रांती दिल्यावर सर्व मजुरांना विशेष वाहनाने त्यांच्या उत्तर प्रदेशातील मूळ गावी सुखरूप रवाना करण्यात आले.या प्रकरणी आरोपी ओम चंद्रकांत सोळंके याच्याविरुद्ध दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार सिद्धेश्वर डोईफोडे तपास करीत आहेत. आरोपी अद्याप फरार आहे.




