बीड — शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यासह शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. गावपातळीवर सरपंचांनी या योजना वर कमाई चे साधन बनवले आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी लोकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला जात होता. मात्र गाव पातळीवर वैर नको म्हणून कोणीही तक्रार करायला धजावत नव्हतं त्यातच माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगावच्या सरपंचाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसंचन विहिरीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी पैसे घेणे महागात पडल आहे. सरपंच रुक्मानंद खेत्रे याने तक्रारदाराच्या आईच्या नावाने मंजूर झालेली विहीर अंतिम यादीत समाविष्ट करण्यासाठी आणि विहिरीच्या प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. 20 हजारांपैकी पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपयांची लाच घेताना सरपंच रुख्मानंद खेत्रे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील एका शेतकऱ्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सरकारी अनुदानावर विहीर मिळावी, अशी मागणी आपल्या आईच्या नावे केली होती. यासाठी प्रयत्न करत असताना, गावचे सरपंच रुख्मानंद खेत्रे यांनी “तुला विहीर मंजूर करून देतो” असे सांगून, गावच्या यादीत नाव टाकण्यासाठी आणि मंजुरीसाठी संबंधित इंजिनिअर व मॅडम यांच्यासाठी प्रत्येकी 10 हजार रुपये, म्हणजे एकूण 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
या प्रकरणाची तक्रार शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानंतर पडताळणी करून शुक्रवारी दुपारी माजलगाव येथील गजानन नगर भागात सरपंच खेत्रे यांच्या राहत्या घरी सापळा रचण्यात आला. या वेळी 20 हजार रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून 10 हजार रुपयांची लाच घेताना सरपंच रुख्मानंद खेत्रे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ, समाधान कवडे, उपनिरीक्षक सुरेश सांगळे, मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अमोल खरसाळे, संतोष राठोड आणि प्रदीप सुरवसे यांनी केली आहे.

