मुंबई — महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करणे आता महाग झाले आहे. कारण, एसटी महामंडळाच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.
एसटी बसची तिकीट दरवाढ आजपासून लागू झाली आहे. यामुळे आता लालपरीचा प्रवास महाग झाला आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
एसटी महामंडळाकडून 15 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाऱ्या बैठकीत 14.95 टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली आहे. परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटीएची बैठक झाली. या बैठकीत एसटीच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटीचा प्रवास महागला असून 15 टक्के दरवाढ झाल्याने 100 रुपयांच्या तिकीटासाठी आता 115 रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ आजपासूनच (24 जानेवारी 2025) लागू करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं, प्राधिकरणाची बैठक पार पडली. या बैठकीत एसटी तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली आहे. एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. यामध्ये आता 14.95 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. यासोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 3 रुपयांनी करण्यात आली आहे. नवे दर 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.
दिवसेंदिवस डिझेल, सीएनजीचे दर वाढत आहेत त्यामुळे प्रत्येकवर्षी ही भाडेवाढ अपेक्षित असते. पण गेल्या तीन ते चार वर्षांपासून ही दरवाढ न झाल्याने एकत्रित रित्या एसटीच्या तिकीट दरात 14.95 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एसटी बसेसचे उत्पन्न आहे त्यापेक्षा खर्च अधिक आहे. एसटी महामंडळाला दिवसाला 3 कोटी रुपायंचे नुकसान होत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून भाडेवाढ करण्यात न आल्याने ही एकत्रित भाडेवाढ करण्यात आली आहे असंही मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.