योगेश क्षीरसागरांना पांडुरंग पावले पण मतदार संघाचे ग्रह फिरले!

गटात तटाच्या राजकारणात जनता भरडली जाणार

बीड — कुठल्याही कुटुंबात दूही नसावी हे जरी खरं असलं तरी योगेश क्षीरसागर व जयदत्त क्षीरसागर यांच्यातील दिलजमाई पुन्हा गावागावांमध्ये गटातटाच्या राजकारणाला ऊत आणणारी ठरणार आहे. याच धोक्याच्या घंटेचा आवाज कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत घुमल्याचं आज पाहिला मिळालं.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेत योगेश क्षीरसागर यांना निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला. काका पुतण्या मधली दरी मिटली असली तरी गावागावातील पेटणाऱ्या राजकारणाचं काय? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. योगेश क्षीरसागरांचे कार्यकर्ते व जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यकर्ते यांच्यातील दुफळी कशी एकसंघ होणार हे मात्र कोडच आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकारणाची पद्धतीच आजपर्यंत गटातटाच्या राजकारणाची राहिली आहे. 2 हजार उंबऱ्याच्या गावात असो की वस्ती तांड्यावर असो प्रत्येक ठिकाणी जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांचे दोन गट हमखास असायचे. विकासाचं काम एखाद अण्णांनी दिलं की दुसरा गट ते काम बंद पाडायचा. यातून रट्टा रट्टी देखील व्हायची. पोलीस केस बारा भानगडी होऊन शेवटी हा वाद बंगल्यावर जाऊन मिटायचा मात्र या घटनेमुळे दोन्ही कडील गटातील कार्यकर्त्यांची पूरती जिरायची विकास काम जिथे अडवल्या गेलं तिथंच ते कायमचं बंद पडायचं. दोन्ही गटांना तुमच्या गावातले लोक चांगले नाहीत असं सांगितलं जायचं. यातून कार्यकर्त्यांचा गावाचा विकास कायमचा खोळंबलेलाच राहायचा यामूळे बंगल्यावरून खेळलेल्या राजकारणात पोळी मात्र नेहमीच बंगल्याची भाजली गेली. कार्यकर्त्यांच्या घराची राजकारणातील जोरामुळे घर पेटतीच राहिली. गेल्या पाच वर्षात गावा गावामध्ये शांतता निर्माण झाली. गावात विकास योजना राबवताना त्यात अडथळा आला नाही. गावात शांतता राहिल्यामुळे कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांनी स्व कष्टाने आपल्या कुटुंबाच्या विकासाकडे लक्ष दिले. यातून अनेक गावांचा कायापालट झाला. सहकार्याची भावना निर्माण झाल्यामुळे शेतीत देखील नवनवे प्रयोग केले जाऊ लागले एकूणच विकासाला बसलेला तिढा सुटला गेला. आता पुन्हा बीडच्या मतदारसंघांमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. काका पुतण्यामध्ये प्रेम कायम राहावं त्याला कुणाचा आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. मात्र राजकारणात योगेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते वेगळे व जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांत एकोपा कसा निर्माण होणार? निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी योगेश साठी जिवाचं रान निवडून आणण्यासाठी करायचं दूर्देवाने ते निवडून आले तर त्यांनी काम स्वतःच्या कार्यकर्त्याना न देता काकांच्या लोकांना का द्यायचं?काकांच्याना दिलंच तर स्वतःच्या लोकांचं काय? यातून काम आडवा आडवी होऊन विकासाला खिळ पूर्वी सारखीच बसणार आहे.
हिच कैफियत मांडण्याचा कांहीं कार्यकर्त्यांनी प्रयत्न भर पत्रकार परिषदेत केला. मात्र ही बाब माध्यमांसमोर येऊ नये याची काळजी घेत पत्रकार परिषद आवरती घेतली गेली. माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना देखील बगल दिली.यावेळी जाणिवपूर्वक निर्माण केलेल्या गोंधळात कार्यकर्त्यांच्या रास्त भावना दाबल्या गेल्या.
जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकारणाच्या याच पद्धतीमूळे त्यांना मानणारा वर्ग मोठा असला तरी मतदार कंटाळलेला आहे. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे असा सूर जनतेतून उमटू लागला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles