बीड — ग्रामपंचायतीच्या निधीचा गैरवापर, १५ व्या वित्त आयोगाच्या कामात अपहार आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शिरूर कासार (जि. बीड) तालुक्यातील खोकरमोहा ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीहरी अर्जुनराव मिसाळ यांना विभागीय आयुक्तांनी सरपंच पदावरून अपात्र घोषित केले आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?
खोकरमोहा येथील रहिवासी सुधाकर विठ्ठलराव मिसाळ यांनी सरपंच श्रीहरी मिसाळ यांच्याविरुद्ध विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) अन्वये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत सरपंचांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कोणतीही कामे न करता ७ लाख ४७ हजार ६५५ रुपयांचा अपहार केल्याचे म्हटले होते. तसेच, ‘तंटामुक्त गाव योजना’ खात्यातून १० लाख ९१ हजार रुपये काढून त्याचाही अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.
चौकशीत काय निष्पन्न झाले?
या प्रकरणाची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत करण्यात आली. चौकशी अहवालात खालील धक्कादायक बाबी समोर आल्या:
निधीचा अपहार: १५ व्या वित्त आयोगातून कामे न करताच निधी हडपल्याचे सिद्ध झाले.
कागदपत्रांची दडपछाप: चौकशी समितीला महिला ग्रामसभा, मासिक सभा यांचे प्रोसिडिंग रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नाही.
फौजदारी गुन्हा:
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सरपंचांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४०९ व ४२० अन्वये आधीच गुन्हा (F.I.R. No. 0217/2024) दाखल करण्यात आला आहे.
प्रशासकीय कारवाई: तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याला यापूर्वीच निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित आहे.
विभागीय आयुक्तांचा अंतिम आदेश
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सीईओ बीड यांचा फेरचौकशी अहवाल विचारात घेऊन विभागीय आयुक्त जितेंद्र पाथळकर यांनी ५ मार्च २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सरपंचांनी पदाचा दुरुपयोग करून शासकीय निधीचा अपहार केल्याचे स्पष्ट झाल्याने, त्यांना तात्काळ प्रभावाने सरपंच पदावरून अपात्र करण्यात आले आहे. तसेच, अपहार केलेली रक्कम संबंधितांकडून व्याजासह वसूल करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

