मुंबई — महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अजित पवार विरोधात वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यामधील वादग्रस्त जमीन व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या कार्यक्षेत्रातच हा गैरव्यवहार झाला असल्याने चौकशी निष्पक्ष होणार नाही,” असा ठाम आरोप करत त्यांनी प्रशासनालाही धारेवर धरले आहे.
दमानिया म्हणाल्या, “मुंढवा येथील जमीन ही गायकवाड कुटुंबाची महार वतन जमीन होती. नोंदणी न झालेल्या पॉवर ऑफ ॲटर्नीवरून शितल तेजवानीने केलेला व्यवहार बेकायदेशीर आहे. या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली होती, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे निलंबन व्हायला हवे.त्यांनी पुढे सांगितले की, “खोट्या कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणात सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. ‘आमेडिया’ ही लिमिटेड लायबलिटी पार्टनरशिप कंपनी असून पार्थ पवार यांचा त्यात ९९ टक्के हिस्सा आहे. त्यामुळे त्यांना सर्व माहिती असणे स्वाभाविक आहे. मात्र एफआयआरमध्ये त्यांचे नावच नाही, हे त्यांना वाचवण्याचे डावपेच असल्याचे स्पष्ट दिसते.
आता या प्रकरणावरून राज्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, दमानिया यांनी अजित पवार-पार्थ पवार यांच्या ६९ कंपन्यांच्या सर्व जमीन व्यवहारांचा तपशील “मालिका स्वरूपात” उघड करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ‘पवार विरुद्ध दमानिया’ अशी नवी राजकीय लढाई पेटण्याची चिन्हे दिसत आहेत

