बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी केज न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात काही धक्कादायक गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, तपासादरम्यान पोलिसांनी वाल्मिक कराड याला या प्रकरणाचा प्रमुख आरोपी ठरवला आहे. यासाठी पोलिसांनी विविध पुरावे आणि व्हिडिओ क्लिप्सचा आधार घेतला आहे.
आरोपपत्रात संतोष देशमुख यांची हत्या, खंडणी यांचा एकत्रित उल्लेख करण्यात आलेला आहे. पोलिसांनी 1400 पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. आरोपपत्रानुसार, संतोष देशमुख यांची हत्या खंडणीच्या कारणावरून झाली, असे दर्शवले गेले आहे.आरोपी वाल्मीक कराड यानेच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्लॅनिंग केलं. यानंतर विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांनी संतोष देशमुखांचा निर्घृण खून केला. या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हाच होता, असं आरोप पत्रात म्हटलं आहे
पाच गोपनीय साक्षीदारांचा पुरावा
या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या दिलेल्या जबाबावरून वाल्मिक कराड याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. साक्षीदारांनी सांगितले की, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांची नांदूर फाट्यावर भेट झाली
होती, जिथे विष्णू चाटे यांनी सुदर्शन घुले याला वाल्मिक कराडचा संदेश दिला. या संदेशानुसार, “संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा,” असं सांगितलं गेलं.
सीआयडीचा महत्त्वाचा व्हिडिओ पुरावा
तपासादरम्यान सीआयडीला एक महत्त्वाचा व्हिडिओ मिळाला आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी सुदर्शन घुले हा संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ आरोपी जयराम चाटे याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला होता. या डिजिटल पुराव्यामुळे सीआयडीने निष्कर्ष काढला आहे की, संतोष देशमुख यांची हत्या करणारी एक संघटित टोळी होती.
मात्र या आरोप पत्रातून दोन आरोपींचं नाव वगळण्यात आलं आहे. रणजीत मुळे आणि सिद्धार्थ सोनवणे अशी आरोप पत्रातून नावं वगळलेल्या आरोपींची नावं आहेत.
दरम्यान रणजीत मुळे हा अॅट्रोसिटी प्रकरणातील आरोपी होता. तर सिद्धार्थ सोनवणे हा खूनाच्या प्रकरणात आरोपी होता. मात्र दोघांविरोधात आरोप पत्र दाखल झालं नाही. दोघांची नावं सीआयडीने आरोप पत्रातून वगळली आहेत. आता पुरवणी आरोप पत्रात या दोघांची नावं येतात की त्यांना मुख्य आरोपींविरोधात माफीचा साक्षीदार बनवलं जातं? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दोघांना माफीचा साक्षीदार बनवलं तर मुख्य आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते, असं कायदेतज्ज्ञांचं मत आहे

