बीड — सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्या प्रकरणी वाल्मीक कराड यांच्यासह आठ जणांवर दाखल करण्यात आलेल्या खंडणी, खून आणि ॲट्रॉसिटी प्रकरणाची पुढील सुनावणी 12 मार्च रोजी विशेष मकोका न्यायालयात होणार आहे.
सरपंच संतोष देशमुखांनी आवादा या पवनचक्की प्रकल्पाच्या कंपनीत खंडणी मागणाऱ्यांचा विरोध केला होता. म्हणून त्यांचे दिनांक 6 डिसेंबर रोजी टोल नाक्यावर वरून अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडीने अवघ्या 80 दिवसांत पूर्ण करून दि. 28 फेब्रुवारी रोजी दीड हजार पानांचे दोषारोप-पत्र विशेष मकोका न्यायालयात सादर केले आहे.
या हत्या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक बाबुराव कराड आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू महादेव चाटे यांच्यासह सराईत गुन्हेगारी टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले आणि प्रतीक भीमराव घुले, सुधीर ज्ञानोबा चाटे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे आणि फरार असलेला कृष्णा शामराव आंधळे यांच्या विरुद्ध दि. 28 फेब्रुवारी रोजी दीड हजार पानांचे दोषारोप-पत्र विशेष मकोका न्यायालयाचे दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या न्यायालयात दाखल झालेले आहे.
दि. 1 मार्च रोजी विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली असून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 12 मार्च रोजी केज न्यायालयात ठेवली आहे. राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील ॲड उज्वल निकम आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. बाळासाहेब कोल्हे हे काम पहात आहेत.

