
गेवराईत शिवाजीराव पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
गेवराई — शिवाजीराव (दादा )पंडित यांनी शिक्षण आणि सहकार क्षेत्रासह विविध क्षेत्रात भरीव काम केले. मंत्री असताना रोजगार हमी योजना खाते त्यांनी यशस्वीपणे सांभाळत ग्रामीण भागाचा विकास केला. त्याचबरोबर ग्रामीण भागात शिक्षण संस्था उभारून आपल्या भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करुन घराघरात शिक्षण पोहचविले असल्याचे गौरवोद्गार राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी काढले. माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कीर्तन महोत्सवाचा समारोप ह.भ.प. महादेव महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. या कार्यक्रमात तालुक्यातील संत महंतांचा सत्कार करण्यात आला. शिवछत्र परिवारावर प्रेम करणारे हजारो लोक यावेळी उपस्थित होते.

गेवराई येथे शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८८ व्या अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज, श्री क्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ.प. महादेव महाराज, माजी आमदार विलासराव खरात, अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या प्रारंभी गेवराई तालुक्यातील सर्व संत महंतांचा जयसिंग पंडित, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित यांच्यासह सोहळा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गेवराई तालुक्यातील विविध संस्थानचे संत महंत, नागरिक आणि अभिष्टचिंतन सोहळा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य अभिष्टचिंतन सोहळ्या नंतर काल्याचे कीर्तन संपन्न होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला.

यावेळी बोलताना हरिभाऊ बागडे म्हणालेकी, दादांचे ८८ वर्ष वय झाले असतानाही दादा आज तीच ऊर्जा घेऊन काम करत आहेत. म्हणून शिवाजीराव (दादा ) यांची शताब्दी याच ठिकाणी साजरी व्हावी व या कार्यक्रमाला माझ्यासह राज्याचे मुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळ हजर राहून त्यांना शुभेच्छा देतील असा विश्वास व्यक्त केला. पुढे बोलतांना बागडे म्हणाले की, शिवाजीराव (दादा) चा राजकीय परिचय म्हणजे मी गेल्या ५० ते ६० वर्षांपासून त्यांची कारकीर्द पाहत आलो आहे. दादा राजकारणात आले आणि गेवराई तालुक्याचा कायपालट केला. दादांनी ४० वर्षाच्या राजकारणात विविध विकास कामे आणून गेवराई तालुक्याचा तर विकास केलाच पण मराठवाड्याच्या विकासातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. आजही दादांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मुलं या तालुक्याच्या राजकारणात सक्रिय काम करत असून त्यांचा यशस्वी वारसा चालवत आहेत. सहकार क्षेत्रात दादांचे मोठे काम आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दादांनी गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसाचे क्षेत्र वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मराठवाड्यात सहकार क्षेत्रात आदराने दादांचे नाव घेतले जाते. शिक्षण क्षेत्रातही दादांचे मोठे योगदान आहे. गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात दादांनी शिक्षण संस्थाचे जाळे निर्माण करून शेतकऱ्यांची मुले साक्षर केली. शिवाजीराव दादा मंत्री आसतांना मी पण सभागृहात होतो. त्यांनी रोजगार हमी खाते यशस्वीपणे सांभाळले. या खात्यातून ग्रामीण भागातील जेवढा विकास झाला तेवढा विकास कोणत्याच खात्यातून झाला नाही. या खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते, पाझर तलाव झाले. अन त्याच काळात झालेल्या जलसंधारणाची कामे आज राज्यातील अनेक भागात सुपीकता दिसून येत आहे. मराठवाड्यातून वाहणाऱ्या कालव्यातही दादांचा मोठा वाटा आहे. राजकारणातील स्वच्छ चरित्र अन चांगली प्रतिमा असलेल्या नेत्याममध्ये दादांचे नाव अग्रक्रमाने येत आहे. राजकीय निवडणुकीतही दादांनी कधी कोणाचा द्वेष न करता एकोप्याने राजकारण केले. शेवटी दादांना उदंड अन निरोगी आयुष्य लाभावे आशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

