बीड — मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या मकोका कोर्टात तब्बल तीन तास सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कराडच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला
तर आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी तब्बल पावणे दोन तास युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने कोणताही निर्णय न देता पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडच्या जामीन अर्जाला न्यायालयात जोरदार विरोध केला. या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे याने दाखल केलेल्या दोषमुक्ती अर्जावरही निकम यांनी सडेतोड युक्तिवाद केला. आजची सुनावणी तब्बल तीन तास पार पडली.. यामध्ये वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तिवाद केला.
अटक करताना कराडला अटकेची कारणे सांगितली गेली नव्हती. मात्र, निकम यांनी हा दावा खोडून काढला. तसेच आवादा कंपनीचे कर्मचारी सुनील शिंदे यांनी रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलची तारीख चुकीची असल्याचा आरोपींचा दावा निकम यांनी सीडीआर सादर करून फेटाळला. सीडीआरनुसार कराडने त्या दिवशी फोन केल्याची नोंद आहे, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या संभाषणाशी संबंधित प्रत्यक्ष पुरावे योग्य वेळी सादर केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
विष्णू चाटेच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद
विष्णू चाटेच्या वकिलांनी त्याच्यावर कोणताही गुन्हा नसल्याचा दावा केला. यावर निकम यांनी चाटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली. खंडणीच्या प्रकरणात विष्णू चाटे हा वाल्मीक कराडचा ‘उजवा हात’ होता आणि त्याने कराडला पूर्णपणे सहकार्य केले, असे निकम यांनी न्यायालयाला सांगितले. मकोका कायद्याच्या तरतुदी या गुन्ह्याला लागू होतात, आरोपीला नाही, असे स्पष्ट करत त्यांनी चाटेचा दोषमुक्ती अर्ज फेटाळण्याची मागणी केली.

